आम्ही अंतिम सामन्याच्या निर्धारानेच खेळू
By admin | Published: October 19, 2016 04:29 AM2016-10-19T04:29:41+5:302016-10-19T04:29:41+5:30
(जेडीटी) क्लबविरुद्ध बाजी मारून बंगळुरू फुटबॉल क्लब एएफसी कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या निर्धाराने खेळेल
बंगळुरु : मलेशियाच्या जोहोर दारुल ताजिम (जेडीटी) क्लबविरुद्ध बाजी मारून बंगळुरू फुटबॉल क्लब एएफसी कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या निर्धाराने खेळेल, असा विश्वास कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केला.
विशेष म्हणजे, जर बंगळुरू एफसी अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला, तर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय संघ म्हणून बंगळुरू एफसी इतिहास निर्माण करेल. त्याचवेळी या दोन संघांदरम्यान जोहोर बाहरू येथे झालेल्या पहिल्या सत्रातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता, तर या वेळी संघ नव्या विचाराने मैदानावर उतरणार असून कामगिरीत नक्कीच सुधारणा होईल, असा विश्वासही छेत्रीने व्यक्त केला. छेत्री म्हणाला, ‘‘इतर सामन्यांप्रमाणेच या सामन्याकडे आम्ही पाहत आहोत. या सामन्यातून भारतीय फुटबॉलचा नवा अध्याय लिहिला जाऊ शकतो. काहीतरी नवीन करण्याच्या जवळ आम्ही आहोत. यासाठीच आम्हाला आमचा सर्वोत्तम खेळ करण्याची गरज आहे. हा सामना केवळ बंगळुरूचा नसून पूर्ण देशाचा आहे.’’ छेत्री म्हणाला, ‘‘विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून आम्ही मैदानात उतरू. प्रतिस्पर्धी संघ कोण आहे, हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. माझ्या मते सामन्याविषयी आपल्याला अतिउत्साही होता कामा नये आणि केवळ सामन्यावर लक्ष केंद्रित करावं.’’ बंगळुरू एफसीने जेडीटीविरुद्ध अद्याप एकही विजय मिळवलेला नसून याचा खेळाडूंच्या मानसिकतेवर काहीही फरक पडणार नाही असे छेत्रीने सांगितले. (वृत्तसंस्था)
>गेल्यावेळी जेडीटीविरुद्ध आमचा १-२ असा पराभव झाला होता. त्यांचा संघ खूप मजबूत आहे. मी सामन्यात सकारात्मक विचाराने उतरेल. इराण आणि ओमान विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही आपण विजयी होऊ शकतो, या विचाराने मी खेळलो होतो.- सुनील छेत्री