भामट्यांचं कॉल सेंटर म्हणतं, घ्या ना ऑफर

By admin | Published: April 2, 2015 06:19 PM2015-04-02T18:19:05+5:302015-04-02T18:46:51+5:30

बीडमधल्या एका तरूणाला असाच ईमेल आला. परदेशातली मोठया पगाराची नोकरी, तीन वर्षांचं कंत्राट, राहाण्या-खाण्याची सोय. ईमेलसोबत ऑफर लेटरही होतं. पठठयाने हटट धरला. सरकारी

The call center of the villagers says, do not get offer | भामट्यांचं कॉल सेंटर म्हणतं, घ्या ना ऑफर

भामट्यांचं कॉल सेंटर म्हणतं, घ्या ना ऑफर

Next
>-जयेश शिरसाठ
 
बीडमधल्या एका तरूणाला असाच ईमेल आला. परदेशातली मोठया पगाराची नोकरी, तीन वर्षांचं कंत्राट, राहाण्या-खाण्याची सोय. ईमेलसोबत ऑफर लेटरही होतं. पठठयाने हटट धरला. सरकारी नोकरीतून नवृत्त झालेले वडील नको म्हणत होते. मग मुलाने आईला मध्ये घातलं. अहो, त्याला यातच इंटरेस्ट आहे, होउ द्या त्याच्या मनासारखं, त्याने सगळी माहिती घेतलीये इंटरेटवरून, आईने मध्यस्थी केली. वर देउन टाका पैसे, कमवायला लागल्यावर एकाच पगारात परत करेल तुमचे पैसे, असंही सांगितलं. वडिलांनी आईच्या आग्रहाखातर नवृत्तीनंतर पदरी पडलेल्या पैशांपैकी सातेक लाख मुलाला दिले आणि फसले. अखेर तक्रार घेउन मुंबई गुन्हे शाखेचा सायबर सेल गाठावा लागला. आरोपी पकडले जातील, पैसे परत मिळतील याची काहीच शाश्‍वती नाही. कारण सर्व व्यवहार परस्पर झालेत!
पोलीस शोध घेत आहेत पण तो मुलगा आणि त्याचे वडील यांना झालेला मनस्ताप आणि आर्थिक नुकसान तर भरुन न येणारच आहे!
हे असं का होतंय?
नोकर्‍या देण्याचं आमिष दाखवून तरुणांना लुबाडणार्‍या भामट्यांनी एक नवीनच मोडस ऑपरेंडी सुरू केली आहे. भाडयाने घेतलेल्या एखाद्या छोट्याशा खोलीत बाकायदा कॉल सेंटरच ते सुरू करतात. त्यात पगारी तरुण नोकरीला ठेवतात. त्याचं काम एकच, फोन करायचे, इमेल्स पाठवायच्या आणि देशभरातील तरुणांना चंदन लावायचं. असं करणार्‍या भामटयांच्या संघटीत टोळया आपले खिसे भरतायत. मुंबईच्या सायबर पोलिसांनी अलिकडेच केलेल्या कारवाईतून हे धक्कादायक वास्तव समोर आलंय. 
पुर्वी परदेशी नोकर्‍यांचं गाजर दाखवलं जायचं की, तिथं राहाण्या-खाण्याची सोय, परदेशातल्या प्रवासाचा खर्च कंपनीच करेल! आता मात्र भारतात व्यवसाय असलेल्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीचं आमीष हे भामटे दाखवू लागलेत. त्यासाठी हे भामटे दिल्ली, नोयडात भाडयाने खोली घेतात. तिथे पगारी नोकरांना बसवून त्यांच्या दिमतीला मोबाईल फोन, कॉॅम्प्युटर दिले जातात.ते नोकर्‍या देणार्‍या अनेक वेबसाईटवरुन माहिती शोधतात. तिथं देशभरातल्या होतकरु तरुणांचे मोबाईल नंबर, ईमेल अँड्रेस आयते मिळतात. 
आणि मग ते या मुलांना गंडा घालतात.
सराईतपणे अगदी लेटरहेडवर ऑफरलेटरवर पाठवतात. संबंधीत कंपनीची ओळख सांगणारं लेटरहेड असतं. कंपनीचा लोगो असतो. खाली कंपनीच्या मोठया अधिकार्‍याची खरी वाटेल अशी सही असते. त्यामुळे अगदी हुशार-एक्सपर्ट लोकांचाही त्यावर विश्‍वास बसतो. ते ईमेलवर संपर्क साधतात. त्यानंतर मेडीकल टेस्ट करावी लागेल, तुमचा पासपोर्ट काढून घ्यावा लागेल अशी काहीही कारणं सांगून पैसे उकळायला सुरूवात करतात. दोघांमधला संवाद परस्पर ईमेल किंवा फोनवर होतो. पैसे भरण्यासाठी बँक खात्याचे तपशील दिले जातात. पैसे भरल्यावरच पुढली प्रक्रिया पूर्ण होईल असं सांगून दोन ते दहा हजार रूपयांपर्यंतची छोटी रक्कम उकळतात आणि मग संपर्क तोडून टाकतात. ईमेल येणं बंद होतं. फोन नंबर बंद होतात. तेव्हा कुठं संबंधीत तरूणाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येतं.
मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी दिल्लीतलं असंच एक कॉल सेंटर नुकतंच उध्वस्त केलंय. त्यातल्या सहा जणांना अटकही  झाली. 
 पुर्वी एक दोघांना लाखोंची टोपी लावली जायची. आता ही पद्धत काहीशी बदललीय. आता लाखोंना थोडया थोडया पैशांना फसवण्याचा फंडा तेजीत आहे. आज जर हजार-दिड हजार रूपये गेले तरी कोणाला फारसा फरक पडत नाही. पोलीस ठाण्यातल्या चकरा मारण्यापेक्षा या फसवणुकीकडे पुढल्या वेळी जरा सांभाळून असं म्हणत दुर्लक्ष केलं जातं. याच वृत्तीचा फायदा भामटे उचलतायत.
 
 
विदेशात नोकरीसाठी नेणार्‍या एजण्टची ही माहिती तपासून पहा!
 
१) विदेशातील भारतीय नोकरदारांच्या संरक्षणासाठी इमिग्रेशन अँक्ट, १९८३ ची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीतील प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागाचं विदेशातील नोकरभरतीवर नियंत्रण असतं. 
२) भारतीय नागरिकांची विदेशात नोकरभरती करणार्‍या एजन्सीला प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागात रिक्रूटमेण्ट एजंट म्हणून नोंदणी करावी लागते. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केल्यानंतर त्याची पूर्णपणे छाननी आणि पडताळणी झाल्यानंतरच त्या एजन्सीची अधिकृत एजंट म्हणून नोंदणी होते. त्यासाठी नोंदणी शुल्क म्हणून २५ हजार आणि वीस लाख रुपयांची बँक गॅरंटीही द्यावी लागते. त्यानंतरच इमिग्रेशन अँक्ट अन्वये ती एजन्सी कोणत्याही भारतीय नागरिकाची विदेशात नोकरभरती करू शकते. विदेशात नोकरी करणार्‍या इच्छुक भारतीयांनी याच नोंदणीकृत एजन्सीमार्फत विदेशात नोकरी मिळवणे आवश्यक असते. 
३) नोंदणीकृत एजंटला प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागाकडे १५ कलमांचं तपशील असलेलं सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. त्यात उमेदवाराला ज्या नोकरीसाठी विदेशात नेलं जाईल त्याच ठिकाणी नोकरी देण्यापासूनच्या अनेक बाबी बंधनकारक असतात. त्यामुळे अशा एजन्सीमार्फत नोकरी मिळवणार्‍याला आवश्यक ते संरक्षण मिळतं. नियम तोडणार्‍या आणि गुन्हे करणार्‍या एजंटला दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूदही इमिग्रेशन अँक्टमध्ये असल्याने नोंदणीकृत एजन्सीकडून उमेदवारांची फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी असते. 
४) काही देशांमधील राजकीय आणि सामाजिक स्थिती लक्षात घेता वेळोवेळी तेथे नोकरीसाठी भारतीयांना परवानगी नाकारण्याचे अधिकारही प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशनला आहेत. त्यामुळे तेथे जाऊन संकटात सापडण्याचे टळू शकते; मात्र त्यासाठी नोंदणीकृत एजन्सीमार्फतच विदेशी नोकरीसाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.
 
विदेशात नोकरीसाठी जायचं असेल तर खबरदारी काय घ्याल?
 
१) विदेशात नोकरी ऑफर देणारा ई-मेल वाचूनच सावध व्हायला हवं. कोणतीही कंपनी अगदी प्लेसमेण्ट एजन्सीच्या माध्यमातून का होईना अशी खिरापत वाटल्यासारखी ऑफर लेटर पाठवत नाही. अनोळखी आणि अनाहुतपणे अशी पत्रे आली की खुशाल समजावं की कुछ तो गडबड है. आपली पात्रता आणि अनुभव तोकडा असताना आपणहून ही कंपनी नोकरी देणारे ई-मेल पाठवते याचा अर्थ हा आपल्या भोवती टाकलेला सापळा आहे, हे लक्षात घ्यायला हवं
२) अशा ई-मेलमधील मजकूर लक्ष वेधून घेण्यासाठी रंगीबेरंगी आणि बटबटीत टाइपचा असतो. अनावश्यक कौतुक आणि खुशामतगिरी करणारा असतो. अशा सराईट टोळ्यांच्या ई-मेलमधील मजकुरातील व्याकरण बर्‍याचदा चुकीचं आणि मजकूर अर्थहीन असतो. 
३) आपल्या स्मार्टफोनवर नोकरीची ऑफर देणारा कॉल आल्यास तो कॉल ट्र कॉलरवरून तो कुठून आला याचा शोध घेता येतो. फोनकर्त्याला कंपनीचा पोस्टल अँड्रेस विचारावा. या प्रश्नामुळे फोनकर्ता फ्रॉड असेल तर पुन्हा कॉलच येत नाही. जर विदेशातील पत्ता मिळाला तर टपालाने पत्र पाठवून खातरजमा करता येते; मात्र केवळ पत्रोत्तरावर अवलंबून राहता कामा नये. त्या देशात कुणी आपल्या ओळखीचं असेल तर त्याच्याकडे कंपनीची चौकशी करता येऊ शकते. कंपनी आणि ऑफर लेटरविषयी खात्री पटली तरच पुढचं पाऊल टाकायला हरकत नाही; मात्र कोणत्याही परिस्थितीत केवळ ई-मेलवर विसंबून बँक खात्यात रक्कम भरायची नाही, असा कानाला खडा लावा.
४) नोकरभरती करणारी एजन्सी प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागात नोंदणी केलेली आहे का, याबाबत खात्री करून घ्यावी. त्याची खातरजमा करायची असल्यास ते या विभागाच्या poeonline.gov.in या वेबसाइटवर पाहता येतं. त्यात सर्व एजन्सींची नावं, नोंदणी क्रमांक आणि संपर्क असा तपशील आहे. तुम्हाला नोकरीचा वायदा करणार्‍या कंपनीचं नाव जर या साइटवर सापडलं नाही, तर त्यांच्याशी कुठलाही व्यवहार करू नका.
 
कॉमनसेन्स वापराच.
 
‘‘ऑनलाईन जॉब ऑफर आल्यास तरूणांनी सतर्क राहायला हवं. हा ईमेल फसवा नाही ना याची शहानिशा करायला हवी. त्यासाठी ज्या कंपनीकडून किंवा संस्थेकडून ईमेल किंवा फोन आला त्या संस्थेकडे प्रत्यक्ष खातरजमा करायला हवी. ते शक्य नसल्यास इंटरनेटवर सर्च करून संबंधीत कंपनीचा फोन नंबर मिळवून तिथे विचारपूस करायला हवी.
खातरजमा केल्याशिवाय अशा ईमेल, फोन कॉलना प्रत्युत्तर करू नये, पैसे तर अजिबात भरु नये. 
- मुकुंद पवार, मुंबईच्या सायबर सेलचे वरिष्ठ निरिक्षक

Web Title: The call center of the villagers says, do not get offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.