डोंबाऱ्याचा खेळ!

By Admin | Published: August 4, 2016 04:20 PM2016-08-04T16:20:19+5:302016-08-04T16:20:19+5:30

पालकांशी डील करणं तसं कठीणच, पण उगाच प्रत्येक वेळी विरोधाची तलवार उपसण्यापेक्षा दोन्ही डगरींवर हात ठेवता आला तर? त्यांनाही समजून घेत हळूच आपलं घोडं पुढे सरकवता आलं तर? - कसरत तर आहेच, पण त्यामुळे अपेक्षाभंग होणार नाही आणि तोलही जाणार नाही हे नक्की!

Cannon game! | डोंबाऱ्याचा खेळ!

डोंबाऱ्याचा खेळ!

googlenewsNext
>- डॉ. श्रुती पानसे
(लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत)
 
 
पालकांशी डील करणं तसं कठीणच, पण उगाच प्रत्येक वेळी  विरोधाची तलवार उपसण्यापेक्षा दोन्ही डगरींवर हात ठेवता आला तर? त्यांनाही समजून घेत हळूच आपलं घोडं पुढे सरकवता आलं तर? - कसरत तर आहेच, पण त्यामुळे अपेक्षाभंग होणार नाही आणि तोलही जाणार नाही हे नक्की!
 
पालकही ऐकतात,
पण आपण आपल्या
डोक्यातली राख झटकून
बाजूला ठेवली तरच!
 
‘मी काय म्हणतोय / म्हणतेय ते माझ्या घरच्यांना कधीच पटत नाही. त्यांचं काहीतरी वेगळंच चालू असतं.’
‘मी आता पदव्युत्तर शिक्षण घेते आहे. सहा महिन्यात मला हवी असलेली पदवी मिळेल. त्यानंतर याच विषयात संशोधन करण्याची इच्छा आहे. तसं मी विद्यापीठात बोलून ठेवलं आहे. पण आत्ताच लग्न करायला पाहिजे, असा धोशा घरून सुरू झालाय. लग्न करायचंच आहे मला. पण आत्ता करायला माझ्या मनाची अजिबात तयारी नाही.’
‘आमच्या घरातल्यांचा पिढीजात दुकान व्यवसाय आहे. त्यामुळे मी काहीही शिकलो तरी त्यातून मला केवळ डिग्री मिळणार! आयुष्यभर तर व्यवसायच करायचा आहे’, असं माझ्या घरच्यांच्या डोक्यात अगदी पक्कंच बसलं आहे. पण मी ज्या विषयात शिक्षण घेतो आहे, ते मला आवडतं. मला त्यातच पुढे जायचं आहे. किमान दोन वर्षं तरी एखादी नोकरी करून स्वत:ला आजमावून बघायचं आहे. वेगवेगळ्या लोकांसोबत काम करून बघायचंय. माझ्यात स्वतंत्रपणे पैसे कमावण्याचे गट्स आहेत का, हे बघायचंय. मला असं वाटतं की टीमवर्कने काम करण्यामुळे आपण स्वत: खूप घडत असतो. नवनवीन माणसांशी व्यवहार करायला मिळतो. तंत्रज्ञान कळतं. दुकानातल्या गल्ल्यावर बसून हे कसं मिळणार?’
..अशी वाक्यं आपल्याला काही नवीन नाहीत. आपला परीघ वाढतो, तसं आपल्या घराबरोबरच बाहेरच्या जगाशी आपला रोजचा संपर्कयेत असतो. नव्या गोष्टी पाहायला, शिकायला मिळतात. त्यातूनच आपलं व्यक्तिमत्त्वही घडत असतं. त्या गोष्टी अजमावून पाहाव्यात, त्या दिशेनं जाऊन पाहावं, स्वत:ला तपासावं असं मुलांना वाटू लागतं. त्यासाठी ते मनाची तयारीही करतात. पण बऱ्याचदा पालकांना ते मान्यच होत नाही आणि घरात नव्या नव्या विषयांवरून वाद सुरू होतात. 
खरं तर आपल्या मुलांना काय म्हणायचंय हे ऐकून घ्यायला पाहिजे. त्यावर स्वतंत्रपणे आणि त्रयस्थपणे विचार करायला पाहिजे. आपली मुलं आता वयात येताहेत. आत्तापर्यंत जस चालू होतं, तसंच आता यापुढे चालणार नाही हे पालकांनीही समजून घेण्याची गरज आहे. कारणं वाढत्या वयानुसार, अनुभवानुसार आणि ज्ञानानुसार मुलांची खास स्वत:ची अशी मतंही तयार होतच असतात. ही मतं आपल्या मतापेक्षा भिन्न असू शकतात, त्यातही तथ्य असू शकतं हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. 
मुलांच्या मतांचा आदर केला पाहिजे, हे ज्या घरातले पालक लक्षात घेतात, त्या घरातला सुसंवाद व्यवस्थित चालू राहतो आणि मुलांना नवीन काही करून पाहण्यात फारशी अडचण येत नाही, मात्र ज्या घरात असा सुसंवाद नसतो, तिथे रोजचे खटके आणि रुसव्या-फुगव्यांशिवाय दुसरं काही पाहायला मिळत नाही.
मुलांची मतं लक्षात घेऊन घरात, आपल्या स्वत:त बदल करणारे असे पालक दुर्मीळच! बहुतेक वेळा मुलांना गप्प तरी केलं जातं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष तरी केलं जातं. 
आहे हेच कसं योग्य आहे, हा हुकमी एक्का पालकांजवळ असतोच. याचं महत्त्वाचं कारण वयात येताना त्यांनी त्यांच्या पालकांकडून अशाच पद्धतीच उत्तर ऐकलेलं असतं.
‘नहीं जाएगी मेरी लाडो अब उस घर.. कभी नही जाएगी..’ असं म्हणणारी ‘नीरजा’मधली आई अजूनही विरळीच आहे. परंतु या टप्प्यावर जर मुलांचं ऐकून घेतलं तर त्याचा चांगला परिणाम व्यक्तिमत्त्वावर होणार असतो. 
अर्थात, अनेक गोष्टी पालकांनी जशा समजून घेणं आवश्यक असतं, तसंच बऱ्याच गोष्टी मुलांनीही लक्षात घ्यायला हव्यात. इतक्या वर्षांच्या संस्कारानंतर आणि त्याच वातावरणात राहिल्यामुळे पालकांचीही मतं घट्ट तयार झालेली असतात. त्यात परंपरेचा आणि सामाजिक दबावही असतोच. त्यामुळे मुलं नवीन काही करू पाहताहेत म्हटलं की पालकांच्या पोटात गोळा येतो. अर्थात हा गोळा मुलांवरील प्रेमापोटीच आलेला असतो आणि त्यांचा आग्रहही मुलांचं भलं व्हावं यासाठीच असतो. 
तरुणांनी ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घेऊन त्यानुसार पालकांशीही व्यवहार केला, थेट विरोधाची तलवारच हाती घेण्यापेक्षा कौशल्यानं गोष्टी हाताळल्या तर पालकही निवळू शकतात, निवळतात. नवा विचार स्वीकारण्यास तयार होतात हा अनुभव आहे. 
ते जमलं मात्र पाहिजे. 
एकूणच, घरातल्यांच्या मतांशी पूर्णत: जुळवून आपलं स्वतंत्र आयुष्य आखत जाणं ही खरंच कसरतीची गोष्ट असते. मात्र, हा सगळा अपेक्षा आणि अपेक्षाभंगाचा खेळ असतो. तो कुशलतेनं खेळावा लागतो. कधी कधी दोन डगरींवर हात ठेवावा लागतो, तेही स्वत:चा भक्कम तोल सांभाळून ! 
कसं ‘पटवणार’ पालकांना?
आपली बाजू पटवून देताना मुलं काही नवं करतात, काही पालकांना हे पटत नाही. त्यातून दोन पिढ्यांमध्ये विसंवाद सुरू होतो. पालकांना पूर्णपणे नाकारून आपलं काम चालू ठेवण्याची वेळ मुलांवर येते. अशा ठिकाणी मुलांना आणि पालकांनाही ‘सर्व काही सुरळीत’ चालल्यासारखं वाटत नसतं. आपण जे काही करतोय ते पालकांना माहीत आहे, ते पाठीशी आहेत, अशी परिस्थिती असेल तर मुलांचा उत्साह दुणावतो. 
ज्या पालकांना नव्या सामाजिक-तंत्रज्ञानविषयक किंवा अगदी कौटुंबिक ट्रेण्ड्सविषयी माहीत असते, त्यांच्याशी बोलण्यात फार समस्या येत नाहीत, पण असं नेहमीच घडत नाही. नव्या पिढीला आजच्या ट्रेण्ड्सविषयी जेवढी माहिती आहे तेवढी त्यांच्या पालकांना असत नाही. त्यातून ते विरोध करत असतात.
त्यामुळे ‘मी काहीतरी नवं करतोय/करतेय’ यापेक्षा ‘आजच्या समाजाचा कॉमन ट्रेंड’ असा असा आहे, त्यात मलाही हे नव्या पद्धतीने करून बघायचंय’, असं म्हटलं तर कदाचित पटेल.
 
हे का करायचं? 
- आपल्यापेक्षा त्यांच्याकडे जास्त अनुभव आहे म्हणून..
- आपल्यावर त्यांचं निरातिशय प्रेम आहे. आपल्या जन्मापासून आपणच त्यांची ‘फर्स्ट प्रायोरिटी’ आहोत म्हणून!

Web Title: Cannon game!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.