चालू दे नाटकं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 08:00 AM2020-11-05T08:00:00+5:302020-11-05T08:00:23+5:30

नाटक करायचं म्हणजे स्टेजच पाहिजे, हे कुणी सांगितलं. सगळं जग रंगभूमी आहे, वाटेल तिथं नाटक करू.. व्यक्त होऊ ! मराठी रंगभूमी दिनानिमित्त नाटक करण्याची गोष्ट.

An experience about Natak | चालू दे नाटकं..

चालू दे नाटकं..

googlenewsNext

- राहुल बनसोडे

विशल्या लै बोगस माणूस होता. मी पण कमी बोगस नव्हतो. आम्ही तसे शाळेपासूनच अतरंगी असु पण कॉलेजात आमच्या दोघांच्या अतरंगीपणाला बहर आला होता. गोष्ट इंटरनेट ब्राउजिंगला एका तासाचे शंभर रुपये लागायचे त्या दिवसांतली आहे. नोव्हेंबर सुरु झाला की आमच्या खिल्लारी बैलजोडीला नवा उत्साह यायचा. एकतर आमच्या शहरात मजबूत थंडी पडायची आणि दिवस लहान होत होत पार पाच साडेपाचलाच मावळून जायचा. कॉलेज संपल्यावर थेट एखाद्या सायबरकॅफेवर जाउन टाईमपास केल्यानंतर आम्ही एखाद्या उडपी हॉटेलात जाउन दोन सिंगल वडा सांबार आणी सहा पाव आणि दोन लहान पेप्सी घ्यायचो, सांबार मोफत असल्याने ते अनलिमीटेड मिळायचे आणि सोबत पेप्सी घेत असल्याने आम्ही 'सस्ते' लोकं नाहीहोत हे इम्प्रेशनही हॉटेलवाल्यावर पाडता यायचे. एकुण बील बरोबर अठ्ठावीस रुपये व्हायचे. ह्यानंतर आम्ही उगीचच नदीच्या घाटावर अळमटळम करायचो. जुनाट पडक्या मंदीरात जायचो आणि देवासमोर बसुन एकदम ड्रॅमाटीक प्रार्थना करायचो. "हे सर्वव्यापी परमेश्वरा ह्या अवघ्या विश्वाचे हित तुझ्या हातात आहे", असे काहीसे अवघड डायलॉग म्हणत मोठमोठ्याने देवाची करुणा भाकायचो. क्वचित मोठ्या मंदीरात एखादा फुलवाला पुजेसाठी कुणी फुलं विकत घेईल ह्या आशेत दुकान मांडून बसायचा. आमच्या धीरगंभीर प्रार्थना पाहून ही पोरं देवाची नि:स्सीम भक्त आहेत असे त्याला वाटायचे. पण आम्ही चूकूनही कधी फुलं विकत घ्यायचो नाही. ही मुल मंदीरात फक्त भक्तीचे डायलॉगच म्हणायला येतात हे जेंव्हा घाटावरल्या फुलवाल्यांना कळले तेव्हा त्यांनी आमचे मंदीरात येणेच बंद करुन टाकले. पण आमच्या नाट्यपुर्ण प्रार्थना काही थांबल्या नाहीत. त्यानंतर आम्ही चर्चमध्ये जाउन मोठमोठ्याने प्रार्थना म्हणायचो, हे इथेच थांबते तर ठिक पण शहरांतली स्मशानेही आमच्या नाटकांनी सोडली नाही. 

शहराच्या सुदैवाने बरेच दिवस वापर न झालेल्या एखाद्या स्मशानातल्या शेडखाली जाउन आम्ही जन्म आणि मृत्युच्या रहस्यांवर गडगडाटी हास्य करीत भाष्य करायचो. तिथे क्वचित निवार्‍याला आलेल्या भणंग भिकार्‍यांना जीवनाचे तत्त्वज्ञान नाटकातून पटवून देण्याचा प्रयत्न करायचो. उन्हे कलायला लागली म्हणजे मात्र घरी परतणे भाग असायचे. मग घाटावरच्या अरुंद गल्लीबोळातुन पायी चालत आम्ही सिटीबसच्या मुख्य स्टॉपवर यायचो. बस आली म्हणजे विशल्या पुढनं बसमध्ये चढायचा मी मागन. गर्दी थोडी पुढे सरकली म्हणजे तो माझ्या पायावर पाय द्यायचा किंवा मी त्याच्या. त्यानंतर आम्ही एकमेकांना डोळा मारीत भांडायला सुरुवात करायचो. सुरुवात 'सरक रे कुडलाये तु?' अश्या उद्धट शब्दांनी करुन मग दरवेळी नवनव्या विषयावरुन भांडायचो. केवळ पायावर पाय पडल्याने सुरु झालेले भांडण केंद्र सरकारच्या बजेटमध्ये असलेल्या शेतीच्या धोरणापर्यंत घेउन जायचो. कधीकधी प्रसंग थेट उतरेपर्यंत ताणता यायचा. कधीकधी मात्र विशेष काही जमायचे नाही आणि आम्ही मग मध्येच कुठेतरी उतरुन रिक्षाने घरी यायचो. 

एकदा असाच प्रयोग सुरु करीत असतांना माझा पाय विशल्याच्या पायावर जोरात पडला त्याने नेहमीप्रमाणे भांडायला सुरुवात केली, आजचा प्रयोग रंग भरील अशी मी अपेक्षा ठेवुन व्यवस्थीत पर्फॉर्मन्स देत होतो पण विशल्याचे कॅरेक्टर काय विषय बदलू देईना. मी त्याला एकददोनदा लाईनवर यावे म्हणून डोळा मारला तर त्यावर 'डोळे काह्यला मारतो रे XXXX असे म्हणत थेट माझ्या कानफाडातच शिलगावली.' आपले नाटकं आपल्याच गळ्याशी आलेय हे मला समजले आणि मी गुपचूप बसमधून उतरुन गेलो, संध्याकाळी विशल्याबरोबर मजबूत भांडण झाले खरे पण त्यातुन आम्हाला एक चूक स्पष्ट कळली. आमच्या कुठल्याही नाटकात आम्ही 'नाटक करतो आहोत' हे आम्ही इतरांना जाणवू दिले नव्हते. आपल्या बसमधल्या ह्या नाटकांना लोक काय म्हणतील ह्याची कदाचित आम्हाला भीती असावी. झाल्या प्रकारानंतर मात्र आमच्या जोडीची नाटक बदलली. आम्ही दोघे मित्र आहोत आणि काहीतरी कलात्मक बोलत आहोत ह्याची लोकांना आगोदर जाणीव करुन देत आम्ही संभाषण करायचो. आजूबाजूच्यांनी इंटरेस्ट दाखवला तर मोठ्या आवाजात 'इम्प्रोव्ह' करीत रहायचो. क्वचित खुप लोकांना पहावेसे वाटत असले तरी काहींना आमच्या वागण्याची शिसारी आल्यास आम्ही त्याची नंतर माफीही मागायचो. 

पुढे विशल्याच्या आणि माझ्या वाटा वेगळ्या झाल्या. मी मुंबईला कामानिमित्ताने वरचेवर अपडाउन करु लागलो. इथे ट्रेनमध्ये न सांगता नाटक करणार एक नवा ग्रुप भेटला. विशल्या आणि माझ्या बसमधल्या नाटकांत दोन किंवा तीनच कॅरेक्टर्स असायचे. इथे एकुण सहा लोक असल्याने दरवेळी नवी स्टोरी करता यायची. क्वचित आम्ही सगळे आयुष्यात पहिल्यांदाच मुंबई पाहून परतणारे प्राथमिक शाळचे शिक्षक बनायचो, क्वचित सुयांची फॅक्टरी असणारे उद्योजक तर क्वचित भाभा अणूसंशोधन केंद्रात काम करणारे संशोधक. प्रत्येक कथानक एकदोनदा करुन झाले म्हणजे मजबूत ग्रीप यायची, त्यात इतर प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही एक मजेशीर मार्ग शोधला होता. 

ट्रेनमध्ये खेळणी, पुस्तके, चॉकलेट विकणारे फेरीवाले लोक दादरहून चढायचे आणि कल्याण येईपर्यंत धंदा करायचे. कल्याण जवळ येउ लागले की मग आम्ही ह्या लोकांकडच्या सर्व वस्तु होलसेलने विकत घ्यायचो. एखादा वीस रुपयाला एक मेंदीचा कोन विकत असेल तर आम्ही चाळीस रुपयात उरलेले सर्व वीस तीस कोन घ्यायचो, एखादा दहा रुपयांना एक चिक्की विकत असेल तर त्याच्याजवळच्या सगळ्या चिक्क्या वीस रुपयांना घ्यायचो. फेरीवालेही ते हसत हसत द्यायचे आणि कल्याणला रिकामे उतरुन जायचे. मग उरलेल्या प्रवासात मेंदीचा कोन पंचवीस रुपयांना विकून आता आपल्याला किती नफा होईल ह्याविषयी इतर पाचांशी मोठमोठ्या चर्चा करायचो. क्वचीत ह्यातून आपण लखपती कसे होउ ह्यावरही चर्चा घडायच्या. इतर लोक लक्ष देउन ऐकत रहायचे.  शेवटच्या स्टेशनावर हा माल परत घ्यायला फेरीवाल्यांचे इतर लोक येत आणि आमच्याकडचा माल घेउन सकाळी परत मुंबईच्या दिशेने जाणार्‍या गाड्यांमध्ये विकायला घेउन जात. हे एक सिक्रेट मात्र कुणालाच माहिती नव्हते.

काळ आणखी बदलला आणि ही नाटके करणारी लोक महाराष्ट्रातुन लुप्त झाली, ही कला नंतर इतर अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पहायला मिळाली. यथावकाश मी अशा नाटकांमध्ये सहभागी होणे बंद केल आणि रितसर नाट्यगृहांमध्ये होणारी नाटके पाहू लागलो, आणखी काही दिवसांनी नाटके लिहू लागलो आणि ज्याला 'रंगभूमी' म्हणतात अशा स्टेजवरच्या नाटकांशी बांधला गेलो. आज मराठी रंगभूमी दिन आहे. नाटक म्हटले की आपल्याला आठवतो तो नाट्यगृहातला अंधार, स्टेज आणि त्यावर माईक मधून संवाद म्हणणारी माणसे. पण ते स्टेज किंवा नाट्यगृह म्हणजेच रंगभूमी असे नाही. आजूबाजूला बघणारं कुणी असेल तर नाटकं कुठेही सुरु करता येउ शकते, बघणार्‍याला कल्पना देउन वा कल्पना न देता तुम्ही अभिनयातून गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करता, कुठलीही जागा रंगभूमी बनू शकते. मग ती भांडणाचे नाटक करण्याची बसची लाईन असेल किंवा भोळसट विनोद करणारा एखादा रेल्वेचा डब्बा, जीवनाचे अर्थ शोधू पहाणारे एखादे मंदीर किंवा मृत्युचा अर्थ शोधू पहाणारे एखादे स्मशान.

अवघे जग रंगभूमी आहे आणि आपल्यातल्या अनेकांची अद्याप व्यवस्थीत रिहर्सल झालेली नाही. रिहर्सल व्यवस्थीत झाली तर खूप सारी नाटके करता येतात.

( राहुल मानववंशशास्राचा अभ्यासक आणि नाट्य-कथा-पटकथा लेखक आहे.)

rahulbaba@gmail.com

Web Title: An experience about Natak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.