चाबकाचे फटके पळता घोडा

By admin | Published: April 2, 2015 06:16 PM2015-04-02T18:16:41+5:302015-04-02T18:16:41+5:30

‘‘तंबाखू खाल्ली की होतं काय, निकोटीन लगेच रक्तात मिसळतं. आणि अँड्रेनल ग्रंथींना उत्तेजित करतं.

Hawk horse | चाबकाचे फटके पळता घोडा

चाबकाचे फटके पळता घोडा

Next

 - आनंद पटवर्धन

(मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या सहकार्याने)
 
‘‘तंबाखू खाल्ली की होतं काय, निकोटीन लगेच रक्तात मिसळतं. आणि अँड्रेनल ग्रंथींना उत्तेजित करतं. त्यामुळे एवपनेफ्रीन या हार्माेन्सचं स्रवण होतं. एवपनेफ्रीन मध्यवर्ती मज्जा संस्थेला उत्तेजित करतं आणि त्यामुळे रक्तदाब वाढतो. श्‍वासावर परिणाम होतो आणि हृदयाची धडधड वाढते.’’
माधवसरांनी पुन्हा एकदा उजळणी पूर्ण केली. आता ते पुढे काय सांगणार आहेत याची मला उत्सुकता होती.
‘‘हे सगळं होण्याचं कारण म्हणजे तंबाखूचा अर्क लगेचच मेंदूपर्यंत पोचतो. हा अर्क मेंदूपर्यंत पोचला की एक प्रकारचा ‘झटका’ किंवा ‘किक’ बसते. याचे कारण निकोटीनचा अँड्रेनल ग्रंथींवर होणारा थेट परिणाम. एखादं हिंस्र जनावर अंगावर येतंय असं दिसलं किंवा रस्त्यावरून ओलांडताना वेगाने बस अंगावर येणार असं जाणवलं की माणूस जसा जास्त सतर्क होतो तशी परिस्थिती निर्माण होते. नाडीचे ठोके वाढतात. शरीरभर रक्त वेगानं आणि अधिक फोर्सने वाहू लागतं.
कमी जास्त प्रमाणात तंबाखू खाल्ल्याने हाच अनुभव प्रत्येकाला येत असतो. म्हणूनच तंबाखूचा एक विडा किंवा  पहिला झुरका घेताच एकदम तरतरी आल्यासारखी वाटते. हा उत्साह ही किक कृत्रिम आहे याचे भान राहत नाही. अनेक अर्थाने निकोटीन हे कोकेनच्या नशेसारखे असतं. फरक असला तर तो तीव्रतेचा, किमतीचा आणि नशेचा कालावधी टिकून राहण्याचा असतो.
हळूहळू जीवनात ही तरतरी येण्याची सतत गरज वाटू लागते. आणि तंबाखूने मिळालेली तरतरी थोडाच काळ टिकल्याने विडी/सिगरेट ओढण्याची किंवा तंबाखू खाण्याची वारंवार गरज वाटू शकते. त्याच्या बरोबर अजून गंमतीचा भाग येतो. तो म्हणजे विशिष्ट प्रसंग आणि विडी/सिगरेट/तंबाखू सेवन यांचे एक समीकरण मनात घटत बसते. उदाहरणार्थ चहा आणि सिगरेट, शौचाला जाणे आणि तंबाखूचा विडा. ते असोसिएशन इतके पक्के असते की सिगरेट ओढल्याशिवाय अनेकांना मग चहा पिण्याची मजा येतच नाही. तंबाखूचा विडा खाल्ल्याविना पोट साफ होत नाही. हे सगळे मनाचे खेळ असतातच पण त्याचबरोबर मेंदूतील रसायनांना लावलेली सवय ते मोडू शकत नाहीत. कारण मनाला कितीही समजावलं तरी मेंदूतील रसायनं सहजासहजी आपली सवय सोडत नाहीत.
त्याचा परिणाम असा होतो की निकोटीन बंद झाले तरी अचानक जबरदस्त तल्लफ येऊ शकते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तंबाखूजन्य पदार्थांची अतिसहज उपलब्धता! कोपर्‍याकोपर्‍यावर पानाचे ठेलेच काय, पण चहाच्या गाडीवर, किरणामालाच्या दुकानात आणि मॉलमध्येसुद्धा हे पदार्थ उपलब्ध असतात. व्यसन करणार्‍याला खुणावत असतात.’’  - माधवसरांनी तपशिलात बरीच माहिती दिली.
हे सारं ऐकून अस्वस्थ होत मी तिथून बाहेर पडलो.
वाटलं, इतके दुष्परिणाम आहेत, देशात तंबाखू बंद करण्यासाठी विविध प्रकाराने आंदोलनं होतात. पण मग तंबाखूजन्य पदार्थ उत्पादन करणार्‍या व्यावसायिकांची लॉबी इतकी शक्तिमान असावी की अशा आंदोलनांना मिळणारा पाठिंबा र्मयादित होत असेल!
मला अशी माहिती मिळाली की, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र संपूर्णपणे निकोटीन आणि अमली पदार्थ मुक्त करण्याचा निर्णय ३१ मे २00३पासून अमलात आणला गेला. त्या पाठीमागे डॉ. अनिल अवचट आणि मुक्ता पुणतांबेकर यांचा आग्रह कारणीभूत ठरला. बाकी एक दोन व्यसनमुक्ती केंद्र वगळली तर अल्प प्रमाणात का होईना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास परवानगी दिली जाते.
मुक्तांगणच्या निर्णयामुळे इथे येणार्‍या रुग्णांची संख्या कमी होईल असे अनेक तर्कवितर्ककेले गेले. रु ग्ण-मित्र इथे दारू आणि इतर अमली पदार्थ बंद करण्यासाठी येतात त्याच्या तुलनेत तंबाखू सिगरेट ही किरकोळ व्यसनं आहेत असं रु ग्ण-मित्रांचाच काय परंतु त्यांच्या पालकांचाही दावा होता.
त्यावेळी मुक्तांगणचे विश्‍वस्त डॉ. आनंद नाडकर्णी ठामपणे म्हणाले ‘‘एक वेळ केंद्र बंद पडलं तरी चालेल; परंतु मुक्तांगण परिसरात निकोटीनजन्य पदार्थबंदीचा निर्णय बदलला जाणार नाही.’’
लोकांचे हे सर्व तर्क मोडून पडले आहेत. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या कामकाजावर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. उलटपक्षी दाखल होणार्‍या रुग्णांची संख्या शंभरवरून पावणेदोनशेपर्यंत पोचली आहे.
एका व्याख्यानात डॉ. नाडकर्णी म्हणाले होते ते मला आठवलं.
‘‘जगात सर्वात चिवट व्यसन असेल तर ते तंबाखूचं. त्या व्यसनामुळे घरे उद्ध्वस्त होत नाहीत किंवा त्या व्यसनामुळे माणूस दिवाळखोर बनत नाही. खरे तर तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन म्हणजे टांग्याच्या घोड्याचं लगाम एका हातानं खेचून धरायचं आणि चाबकाचे फटकारे देत घोड्यांना पळवायचा प्रयत्न करायचा. अशावेळी त्या घोड्यांची जी काही अवस्था होईल, तशी शरीराची अवस्था होत असते. पण आपल्या शरीराच्या अवस्थेची जाणीवच त्या माणसाला नसते. शिवाय एक प्रकारे अशा व्यसनांना समाज मान्यता आहे. अगदी एलिट वर्गापासून श्रमजीवी स्त्री-पुरु षांना त्याचं वावडं नाही, वावगं वाटत नाही!
परंतु या व्यसनाचे विपरीत परिणाम प्रत्येक व्यक्तीवर कमी-जास्त प्रमाणात होत असतातच. प्रश्न हा आहे की या व्यसनाच्या विळख्यातून माणसं स्वत:ला मुक्त कधी करणार?’ दुर्दैवानं भारतात तंबाखूमुक्ती केंद्र असा काही प्रकार नाही. आणि सरकार मात्र कर वाढवण्यापलीकडे काहीही करत नाही.
मग हे व्यसन सुटते तरी कसे?
केवळ उत्सुकता म्हणून मी इंटरनेटवर या विषयावरील  इंग्रजी पुस्तकं शोधली. तर सध्या उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी ५६३ पुस्तकांची आहे!
काय लिहिलं असेल बरं त्यात?
वाचायला हवं!
 

Web Title: Hawk horse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.