पंचविशीच्या पल्याड

By admin | Published: July 28, 2016 05:26 PM2016-07-28T17:26:03+5:302016-07-28T17:47:44+5:30

आर्थिक उदारीकरणानंतरचा भारत! जणू एक वेगळाच देश! व्यक्तीगत महत्वाकांक्षांनी भारलेला, संधींचं आकाश खुलं झालेला आणि संधीसोबत नवे प्रश्न, नवे ताण आणून अस्वस्थता वाढवणाराही!

Panchayesh's Pallid | पंचविशीच्या पल्याड

पंचविशीच्या पल्याड

Next

 - ओंकार करंबेळकर


गंजल्याने कोसळलेल्या पोस्टाच्या पेटीचा मित्राने मोबाइलवरून काढलेला आणि मोबाइलवरूनच फेसबुकवर टाकलेला फोटो पाहिला. त्याच्याखाली त्याने लिहिले होते, ‘प्लीज लूक अ‍ॅट मी. आय अ‍ॅम अल्सो इनबॉक्स...’ दोन मिनिटे गंमत वाटली, तरी हे सगळं खरंच विचारात टाकणारं होतं. ती बाजूला पडलेली पेटी आणि मोबाइलचा वापर.. दोन वेगवेगळ्या काळाची ही प्रातिनिधिक प्रतीकेच वाटू लागली.

किराणावाला ते मॉल
यादी करून घेऊन जायची, काटकसरीनं हव्या त्याच वस्तू आणायच्या आणि घरी परत. भाजीचंही तेच. घासाघीस. मॉल आले आणि खरेदीची ही रीतच बदलून गेली. उदारीकरण आणि मुबलक वस्तूंचे उत्पादन झाल्यावर सर्वात मोठा परिणाम झाला तो लोकांच्या आर्थिक सवयींवर. मुबलक वस्तूंमुळे खरेदीचे प्रमाण वाढलेच, त्याहून अनावश्यक वस्तूही खरेदी केल्या जाऊ लागल्या. एखादी वस्तू खरेदी करताना दुसऱ्या अनावश्यक वस्तूवर नजर पडते तीही घेतली. ती विकत घेता येणे शक्य नसेल तर तितकी ताकद येण्यासाठी प्रयत्न करायला हा काळ संधी देतो, कधीकधी भाग पाडतो. अगदीच शक्य नसेल तर कर्जाचा पर्याय उपलब्ध झाला. वन स्टॉप खरेदी हीदेखील नवी सवय झाली आहे. सर्व ब्रँडच्या वस्तू, कपडे एकाच मॉलमध्ये जाऊन विकत घेता येतात. मॉलमध्ये पायऱ्यांच्या जागी आलेले सरकते जिने वास्तविक आपल्याला खरेदीच्या वेगळ्या युगात घेऊन आलेले आहेत. हॉटेल, दुकांनामधील ‘आज रोख, उद्या उधार’ या पाटीची जागा आता कार्ड स्वाइप मशीनने घेतली आहे. कोणतीही वस्तू आता क्रेडिट, डेबिट कार्डने घेता येते. पाकिटाची बहुतांश जागा प्लॅस्टिक मनीने घेतली आहे.

ईएमआय किती तुझा?
कर्ज हा शब्दच मुळी १९९१ पूर्वी त्याज्य शब्दांमध्ये गणला जाई. एखाद्या घरामध्ये कर्ज घेण्याची वेळ आली तर आता त्यांचं संपलंय असाही विचार केला जाई. परंतु या दोन दशकांमध्ये कर्जाची भरपूर उपलब्धता असल्याचे दिसून येते. घर, गाडी असो वा कोणतीही लहान-मोठी वस्तू हप्त्यावर घेण्यात कोणताही कमीपणा वाटत नाही. आपल्या आर्थिक मानसिकतेत बदल झाल्याचे हे प्रमुख लक्षण. मग त्यानंतर विचार होतो तो कर्जाच्या उपलब्धतेचा आणि त्याचे भरपूर उपलब्ध झालेले पर्याय. ईएमआय भरून केलेली खरेदी आता रुबाबात सांगता येते. बँकांकडे कर्जासाठी चपला झिजवण्याऐवजी बँकाच लोकांकडे म्हणजे त्यांच्या ग्राहकांकडे येतात. कागदपत्रांची पूर्तता झाली की कर्ज तत्काळ उपलब्ध होते. 

मदर इल कम सून
१९९१ नंतर काळात उदारीकरणाने माहिती क्षेत्रामध्ये आणि दळवळणाच्या साधनांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. पत्रलेखन आता फक्त शाळा-महाविद्यालयात शिकवण्यासाठी राहिले, तर मदर इल (बहुतांशवेळा डेड) कम सून अशा त्रोटक शब्दांच्या ‘तारा’ बंदच करण्यात आल्या. ट्रंकॉल वगैरे शब्दांचा अर्थ तर आपल्याला कळणारच नाहीत इतके मागे पडलेत. काही महिने किंवा वर्षे नंबर लावून मिळणाऱ्या फोनचे एकेकाळी नवसाच्या पोरासारखे स्वागत आणि कौतुक व्हायचे. चैत्रगौरीसारख्या सजवलेल्या कोनाड्यात किंवा टेबलावर क्रोशाने विणलेल्या रुमालावर हे फोनसाहेब विराजमान होत. संदेश देण्यासाठी १९९१ नंतर पेजरने थोडाकाळ डोकावण्याचा प्रयत्न केला परंतु ते फारवेळ राहिले नाहँत. मग मोबाइल आले. माहितीचे क्षेत्र एकदम खुले झाल्यासारखे वाटू लागले. मोबाइलशिवाय दिवस कसा जाईल, असा प्रश्न पडावा इतके त्याच्यावरील अवलंबित्व वाढले आहे. मोबाइलचा हॅण्डसेट कोणत्याही वेळेस जाऊन विकत घ्यावा, हव्या त्या कंपनीची हवी ती सेवा देणारा प्लॅन निवडावा आणि तत्काळ सुरू झालेल्या मोबाइलवरून संभाषण सुरू करावे, एसएमएस करावेत, चित्रपटापासून रेल्वे-विमानाची तिकिटे काढावीत, ई-मेल करावेत, बिले भरावीत, बँकेच्या खात्यात ये-जा तपासावी असा सगळा मामला आहे हा. नाही म्हणायला बटणं दाबायच्या कंटाळ्याने एसएमएस, ई-मेलची भाषा पुन्हा टेलिग्रामसारखी मदर इल कम सूनसारखीच त्रोटक, तुटक केली आहे. 

मॅक्डी, सब आणि ग्रॅब-इट
मोठ्या शहरांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयी व्हेंडिंग मशीनवर अवंलबून राहिल्या आहेत. एटीएमसारखी चिप्स, कोल्ड्रिंक्सची ग्रॅबइट व्हेंडिंग मशीन्स मोठ्या कार्यालयात किंवा संकुलांमध्ये लावली जातात. आपल्याला हव्या त्या वस्तूसाठी नाणे सरकवायचे आणि वस्तू मिळवायची. मग ते चिप्स असतील, कोला, चॉकलेट, गोळ्या किंवा नूडल्सही... आठवड्याकाठी फिरायला गेल्यावर तेथे काहीही मागायचं नाही बरं का अशी दटावणी ऐकणारी किंवा एक भेळ खाऊन झाल्यावर गप्प बसणारी मुलं आता पालकांच्या भूमिकेत गेली आहेत. ती स्वत:च मनमुराद खातात आणि मुलांना खाऊ घालतात. बटाटेवड्याच्या शेजारी मॅकडोनल्डचा बर्गर आणि सबवेचे मोठाले सँडविच येऊन बसले आहेत. थालीपिठाबरोबर पिझ्झाचेही तितक्याच आनंदात स्वागत केले जाते. हॉटेलात जाणे ही चैनीची बाब सवयीत रूपांतरित झाली आहे. काही शहरांमध्ये शनिवारच्या रात्रीस अगदी लोक हटकून (जणू चूलबंदीच लागू झाली अशा थाटात) हॉटेलात जेवतात. या जेवणासाठी टेबल बुक वगैरे करून नंबर लावले जातात. हॉटेलंही बँकांप्रमाणे घराच्या दारात आली आहेत. आई-बाबा गावाला गेले आहेत किंवा घरी स्वयंपाक करणारे कोणीच नाही म्हणून आपल्याच शहरातील नातेवाइकांकडे जेवायला जाणे, अगदीच तसे नसेल तर शेजाऱ्यांनी त्यास अन्न देणे यातही बदल झालेला आहे. आई-बाबांची पाठ वळताच थेट पिझ्झा मागवता येतो किंवा कधी पालकच भूक लागली हे मागवून खा असे सांगून 'काळजी’ घेतात.

ऐटीत आयटी 
संगणकाचा वाढलेला वापर माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला घेऊन आले. आउटसोर्सिंग, बीपीओ अशी नावेही आपल्या कानावरून गेली नव्हती अशी क्षेत्रे भारतामध्ये उदयास आली. काही क्षेत्रांमध्ये भारत हा तर केंद्रबिंदू बनला. मध्यमवर्गीय घरातले मुलंमुली आयटीत बडेबडे पॅकेज कमवू लागले. अमेरिकेत जाऊ लागले. काही तिकडे सेटल होऊ लागले, तर काही परतून घरीही येऊ लागले. या आयटीनं अनेकांची लाइफस्टाइलच बदलून टाकली. 


इडियट बॉक्सची कमाल
दूरदर्शन संचालाही फोनसारखीच किंमत होती. या दोन दशकांमध्ये टीव्हीमुळेही भारतीयांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे. टीव्हीचे आकार, प्रकार बदलले. टीव्ही म्हटला की तो रंगीत हे आलेच. खिसे फुगत गेले तसे टीव्हीचे आकार आणि संख्याही वाढत गेली. एका घरात एकच टीव्ही संच हा प्रकार मागे पडून प्रत्येकाच्या आवडीनुसार टीव्ही घरातल्या भिंतीवर लटकू लागला. पार फ्लॅटही झाला. या टीव्हीवर आवडती मालिका इंटरनेटवरही पाहण्याची सोय करून ठेवली आहे.

सोशल मीडियाचे आभास
अत्याधिक यांत्रिकीकरणाने दिवसाचे तासही कमी केलेत की काय अशी शंका येण्याइतपत आयुष्य वेगवान केले आहे. घरी बोलायला वेळ नाही, कामाचे तास यामध्ये मोकळा श्वास घेण्याची संधीच उरत नाही. सुटीचा दिवस आठवड्याचा शीण घालविण्यासाठी आणि इतर कामांमध्ये जातो. पुन्हा पुढच्या रविवारची वाट पाहत आठवडा ढकलायचा किंवा दोन रविवारांच्या मधल्या काळात काम करायचे अशा अवस्थेपर्यंत आयुष्याला गती आली आहे. त्यामुळे भेटण्यासाठी, बोलण्यासाठी पुन्हा मोबाइलसारख्या आभासी साधनांचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, एसएमएस आणि फोन याच भेटींच्या जागा आहेत. आज मी खूप आनंदी आहे पासून आज साहेबांनी मला फार झापलं इथपर्यंत सोशल मीडियावर वाचायला मिळते. परदेशातल्या आते-मामे-चुलत भावंडांच्या घरातील कोपरान्कोपरा फोटोत दिसतो. (पण सगळं आभासीच, खऱ्याखुऱ्या भेटी होत नाहीत. भेट झालीच तर थोड्या वेळानं काय बोलायचं अशी स्थिती होते.) सोशल मीडियासारखे कट्टेच आज माहितीचे आदानप्रदान करण्याची महत्त्वाची केंद्रे बनली आहेत.


(ओंकार लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.)

 

Web Title: Panchayesh's Pallid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.