शूटिंग ह्युमन लाईफ!

By admin | Published: October 13, 2016 08:30 PM2016-10-13T20:30:54+5:302016-10-14T12:53:09+5:30

फोटोग्राफर म्हटलं म्हणजे लोक हमखास विचारतात, वाइल्ड लाइफ शूट करतोस का? - मी हल्ली सांगतो, आता माझा इंटरेस्ट बदललाय...

Shooting Human Life! | शूटिंग ह्युमन लाईफ!

शूटिंग ह्युमन लाईफ!

Next

- अनिरुद्ध करमरकर


दिल्ली. देशाची राजधानी. सत्तेचा केंद्रबिंदू. तिथल्या एका मोठ्या झोपडपट्टीत पोचलेलो आम्ही. माझे सहकारी मुलाखती घेत आणि मी फोटो काढत फिरत होतो. पॉवरग्रीडच्या खाली वसलेली ही वस्ती, पण या लोकांच्या घरात वीज नाही. घरं तरी कसली? - हे घर आहे का, असा आपल्याला प्रश्न पडावा. उघड्या मोठ्या गटारी, भयंकर घाण, आपण कचरा टाकायलाही जाणार नाही इतका घाण परिसर. इटुकल्या जागेत सहाजण राहत होते. त्या सहा माणसांचं सगळं सामानसुमान, तो संसार एका पोत्यात मावेल इतकाच होता...
असह्य होतं तिथं श्वास घेणंही. प्रचंड गरम होत होतं, घाणीचे वास नाकात जात होते. पण पोरं खेळत होती, बागडत होती.
आम्ही गेलो तेव्हा नुकताच १५ आॅगस्ट होऊन गेला होता. अनेकांनी घरात, घरावर झेंडे लावलेले दिसले. मला नवलच वाटलं. स्वत:शीच म्हणत होतो, इतक्या वाईट अवस्थेत राहतात हे लोक. मी सहज एका माणसाला विचारलंच शेवटीं की, हे झेंडे कशाला लावलेत, सरकार काय करतं तुमच्यासाठी?
त्यानं माझ्याकडे असं पाहिलं की, हा काय बावळट प्रश्न झाला. 
तो म्हणाला, ‘या झेंड्यासाठी किती लोकांनी जीव दिला माहितीये ना? हा कुण्या सरकारचा झेंडा नाही, भारताचा झेंडा आहे. सरकारं काय येतात जातात, काम करतात, करत नाही; पण आपलं प्रेम आहे या देशावर, झेंड्यावर !’
झोपडपट्टीत राहणारा, व्यवस्थेनं स्वच्छ हवा-पाणी-परिसरही नाकारलेला, शब्दश: घाणीत राहणारा एक माणूस मला सांगत होता की, या तिरंग्यावर प्रेम आहे माझं.. त्याचा केजरीवाल आणि मोदींशी काय संबंध?
ते वाक्य ऐकून मी संपलो होतो त्याक्षणी..
संपलोच होतो..
लाज वाटायला लावणारा क्षण होता. स्वत:ची, स्वत:च्या संकुचित विचारांची लाज !!
त्याच वस्तीतल्या पोराबाळांचे फोटो काढत होतो. आयाबाया लेकरांचं डासांनी तोडलेलं अंग दाखवत होत्या. त्या लहानग्यांचं खाजरं शरीर पाहवत नव्हतं. त्या गर्मीत पाण्यानं जीव कासावीस करत होता. पण गटारीजवळच्या नळाचं पाणी आम्ही शहरातली माणसं कसं पिणार ना? - म्हणून मग त्या गर्दीत उभ्या चारपाच जणींनी पटापट दहा-वीस रुपयांची कॉण्ट्री काढली आणि एका पोऱ्याला पळवलं आमच्यासाठी कोल्ड्रिंक आणायला! आणून थेट हातातच दिलं आमच्या!! आतिथ्य!! डोळ्यात पाणी आणणारं!!
स्वत:च्या जेवणाचे वांधे, अवतीभोवती प्रचंड घाण आणि टिचभर घर म्हणवणाऱ्या जागेत आमच्यासारख्या अनोळखी माणसांचं आगतस्वागत करायला सगळ्या धडपडत होत्या. त्यांच्याकडचं पाणी आम्ही पिणार नाही म्हणून हे न परवडणारं कोल्ड्रिंक !
किती प्रेम!! - आणि तेही का? तर मी त्यांच्या मुलांचे फोटो काढत होतो. 
माझ्यासाठी कोण होती ती मुलं? 
- फक्त एक फोटो ! एक स्टोरी !
आणि त्यांच्यासाठी मात्र मी त्यांच्या दारी आलेला हाडामांसाचा माणूस होतो. माझं शहरी असणं त्यांच्या अंगावर आलं नाही, उलट त्यांचं असं ‘माणूस’ असणं माझ्या अंगावर आलं..
त्यांच्या झोपडपट्टीतल्या घरातली चांगल्यात चांगली जागा त्यांनी मला बसायला दिली. ‘कुछ खाओगे?’ - असंही पुन्हापुन्हा विचारलं. 
आता आमच्या रोडट्रिपवरून परत येऊन इतके दिवस झाले, तरी अजूनही मला प्रश्न पडतो की, हे मी केलं असतं का? शिकलीसवरलेली माणसं आपण, कसे वागतो एरवी नागरी समाजात? त्यांच्यापैकी कुणी बाई माझ्या घरी आली असती तर मी केलं असतं का असं काही त्यांच्यासाठी अगत्यानं?
- मी त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही, ही खंत माझ्या मनात कायम राहीन. माझं इतक्या प्रेमाने स्वागत करणाऱ्या त्या आयाबायांच्या मुलांना द्यायला एक साधं चॉकलेटही नव्हतं माझ्या खिशात !
वाटलं, आपण अनुभवली ती माणसांच्या मनाची श्रीमंती !
खरंतर या रोडट्रिपवर जायचं ठरल्यावर पूर्वतयारी म्हणून मी आधी ज्यांनी अशा रोडट्रिप्स केलेल्या आहेत अशा फोटोग्राफर्सचे फोटो पाहिले होते. मला काय काय करता येईल याची कल्पना मनाशी धरूनच बाहेर पडलो. पण जे इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा वेगळं काम करून परत आलो. आणि परत येताना मला ज्या विषयात आयुष्यभर खूप काम करायला आवडेल असा एक विषयही सापडला, तो सोबत घेऊनच आलो.
तुम्ही फोटोग्राफर आहात असं कळलं की लोक हमखास विचारतात, तुम्ही वाइल्ड लाइफ शूट करता का?
आता माझ्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर आहे, मी ह्यूमन लाइफ शूट करतो. ह्यूमन लाइफच इतकं इंटरेस्टिंग आहे, हे मला यानिमित्तानं जास्त जोरकसपणे समजलं.
खरंतर मला तसं हायवेवरून प्रवासाचं अप्रूप नव्हतं. महाराष्ट्रातले, मेट्रो सिटीतले हायवे, एक्स्प्रेस हायवे आपण पाहिलेले असतात. हायवे म्हणजे काय हे माहिती असतं. पण मी जो हायवे या प्रवासात पाहिला तो सहापदरी, चकाचक, भन्नाट होता.
या हायवेच्या कडेलगत राहणाऱ्या गावातल्या लोकांपैकी अनेकांना हेच माहिती नव्हतं की या सुसाट जाणाऱ्या हायवेवरून, त्याच्या विरुद्ध दिशेच्या लेन्समधून गुरं हाकत जायचं नाही. हायवेवर ठाण मांडून बसलेल्या अनेक गायी सर्रास दिसतात, कारण स्थानिक लोक गुरं हाकत रस्त्यावरून जातात. वैरणीचे, गवताचे भारे घेऊन बायका रस्ता क्रॉस करतात. डोईवर पाण्याच्या हंड्याची चळत घेऊन हायवे ओलांडणाऱ्या तर कितीतरी जणी सतत दिसतात.
तो हायवेही कदाचित त्यांची गरज नाही. नळाला पाणी, मुलांना शिक्षण या गोष्टी त्यांना गरजेच्या आहेत. पण त्या पूर्ण होण्याच्या आधी त्यांच्या आयुष्यात हा हायवे आला आहे. आणि दुसरीकडे हेही दिसलं की, असे हायवे काही ठिकाणी आर्मीची महत्त्वाची गरज आहे. त्यांचे ट्रक वेगानं आता त्या हायवेवरून पळताना दिसतात.
हायवे एकच, पण त्याची गरज असलेले आणि नसलेले एकत्र नांदताहेत हे मला फार ग्रेट वाटलं. हायवे हे या देशात आलेल्या आणि येऊ घातलेल्या समृद्धीचंही लक्षण आहे. नक्कीच !
परतीच्या वाटेवर मी काढलेले माझे फोटो पाहताना मलाच वाटलं की, पुण्यात जन्मलो, मध्यमवर्गीय घरात वाढलो, शिकलो, मनासारखं काम करतोय हे केवढं माझं नशीब !
ही रोडट्रिप आता आयुष्यभर माझ्या कॅमेऱ्यात तर राहीलच, पण त्यापेक्षा डोक्यात, मनात राहील.
...आता मी लोकांना सांगतो,
वाइल्ड लाइफपेक्षा माझ्या कॅमेऱ्याला ह्यूमन लाइफ जास्त चॅलेजिंग वाटतं !

 

digianirudha@gmail.com
(लेखक लोकमतच्या पुणे आवृत्तीत छायाचित्रकार आहेत.)

Web Title: Shooting Human Life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.