लग्नाआधी एकत्र; राहून तर पाहू?

By Admin | Published: January 15, 2015 06:19 PM2015-01-15T18:19:48+5:302015-01-15T18:19:48+5:30

रणबीर-कतरिना, कोहली-अनुष्का नी आणखी स्टार सेलिब्रिटी ‘लिव्ह इन’मध्ये राहतात, त्याचं अप्रूप वाटतं. पण समाजाचा विरोध डावलून आपल्या अवती-भोवती काही जोडपी ‘लिव्ह इन’ मध्ये राहतात, तेव्हा कसं असतं त्यांचं जगणं? त्यांचं घर.? आणि त्यांचं स्वत:सह एकमेकांशी असलेली भांडणं?

Together before the wedding; What if I see? | लग्नाआधी एकत्र; राहून तर पाहू?

लग्नाआधी एकत्र; राहून तर पाहू?

googlenewsNext
> -असं म्हणत ‘लिव्ह इन’चा पर्याय स्वीकारणार्‍यांना, पारंपरिक वळणाचा ‘संसार’ चुकतो का?
 
अंधार्‍या, अरुंद जिन्यातून तुम्ही दोघं भेलकांडत, एकमेकांना सावरत, मध्येच उगाच हसत, चित्कारत तुम्ही शेवटी एकदाचे तुमच्या घराच्या दरवाजासमोर येऊन पोहोचलात. चावी शोधायची, ती लॅचच्या छिद्रात टाकून दार उघडायचं आणि मग आत जायचं.. महाकठीण टास्क आहे हा! तो एव्हाना जिन्यातच फतकल मारून बसलाय आणि ती पर्स एका खांद्यावर सांभाळत दुसर्‍या हातानं चावीचा अखंड शोध घेत आहे.. ‘‘ए अगं.जाऊ देत.. इथंच झोपून जाऊ..’’ तो पायरीवर जवळपास लोळत तुला म्हणाला.. ‘‘नाही तरी तीन दिवसांनी माझ्या राजवाड्यात मऊमऊ गाद्यांवरच लोळायचंय रात्रंदिवस.. पुन्हा कधी मिळणार अशी संधी आपल्याला. झोप इथे..’’ एका  कोपर्‍याकडे बोट दाखवत तो तिला म्हणाला. तेवढय़ात अपेक्षितपणे शेजारच्या घरातला दिवा लागलाच. ‘‘लवकर एकदाचं पळा आपल्या राजवाड्यात महाराज. नेहमीचा तमाशा!!! तरी बरं लग्नाची बुद्धी झाली शेवटी. नाही तर यांचं लिव्ह इन म्हणजे आम्हाला जागरण दर दिवसाआड!’’ जोशी काका नेहमीप्रमाणे फुल ऑन फॉर्ममध्ये होते. 
तेवढय़ात चावी सापडली आणि धसमुसळेपणाने दार ढकलत तू त्याला  घेऊन आत शिरलीस आणि दार लावून टाकलंस. बूटही न काढता तो तसाच अंधारात जमिनीवर पसरला लगेच. तू मात्र धडपडत स्वत:चे  सॅण्डल्स उतरवलेस. चाचपडत लाइटचं बटण दाबलंस आणि बाजूच्या खुर्चीत स्वत:ला झोकून दिलंस. डोकं प्रचंड गरगरतंय तुझंही. जरा जास्त झाली होती. तुला झोपायचंय खरंतर पण तू तरीही तशीच बसून आहेस रंग उडालेल्या भिंतीच्या टवक्यांकडे बघत. या घरातला तुझा हा शेवटचा दिवस. 
उद्यापासून लग्नाच्या दिवसापर्यंतचे मधले तीन दिवस  आईसोबत आणि नंतर पुढे कायमचं त्याच्या आणि त्याच्या आई-बाबांसोबत.अगदी मरेपर्यंत. एकदा का बाई सासुरवाशीण झाली की, एकदम चार खांद्यांवरच आडवं बाहेर यायचं, तोवर सुटका नाही हे आठवून तुला आपण एकदम तू माहेरची साडी मधली अलका कुबल असल्याचा भास झाला. स्वत:शीच कितीतरी वेळ हसत बसलीस तू.. 
बाहेर किंचित उजाडायला लागलं होतं. बहुतेक सातच्या ठोक्याला निर्मलाबाई येऊन उभ्या ठाकणार.. ‘‘ताई तुमी आजबी भांडे न्हाई काढून ठिवले’’ म्हणून कटकट सुरू करणार. त्यामुळे भाजी, आमटी छोट्या भांड्यात काढून कढया मोकळ्या करायला लागणार आधी. याला जमिनीवरून उठवून आत झोपवला पाहिजे, नाही तर त्यांना घर न झाडायचं आणखी एक निमित्त. पेपरवाल्याला पेपर बंद सांगायला पाहिजे. मेंटेनन्स चुकता करायचाय. याच्या लक्षात राहणं शक्य नाही. बॅग भरायची अजून. पण निम्मे कपडे गच्चीत टाकले होते, वाळायला. ते आणायची काही ताकद नाही आता, बघू नंतर ! 
हे सारं बदलायला हवं आता, त्यानंही बदलायला हवं. लग्न तर त्याचंही होतंय. पण त्याला कसली कामं माहिती नाही. हा फक्त आपले (अनेकदा त्याचेच खरं तर) मित्र आले की, एक कप विसळून ठेवणार आणि एखादा कांदा चिरू लागणार डोळ्यात अश्रू आणून..‘‘इजण्ट इट डॅम क्यूट व्हेन अ मॅन वर्क्‍स इन अ किचन?’’ असं कानांवर पडलं की, हा कृतकृत्य. कितीदा तरी वाद झाले यावरून.. ‘‘प्रश्न  स्त्रीवाद आणि स्त्री -पुरुष समानतेचा नाहीये, मुद्दा इतकाच आहे अजिबात आवड नसताना जर मी भाज्या आणू शकते आणि फोडण्या देऊ शकते, तर एखादा दिवस तू स्वत:चे मोजे स्वत: धुतलेस किंवा निदान स्वत:चे बूट जागेवर ठेवलेस, तर काय हरकत आहे??’’ यावर त्याचं उत्तर ठरलेलं.. ‘‘मी नाही सांगत तुला हे सगळं करायला.. राहू देत बूट तिथेच पडून. नको आणू भाज्या.. मेस लाऊ आपण..’’ झालं.. आता काय बोलणार? झालेत हे सगळे प्रयोग करून. कुठल्याच मेसचं जेवण दोन दिवसांच्यावर गिळावचं नाही. आणि किती दिवस असं घाणीत आणि पसार्‍यात राहायचं डुक्कर बनून?.. यावर तो दात काढणार आणि म्हणणार ‘‘चिडू नकोस गं, थोडेच दिवस. एकदा आपल्या घरी गेलो लग्न करून की काहीच टेन्शन नाही. तिथे लखन आहे, आई आहे, इथे तुझ्याशिवाय कोण आहे बरं?’’ 
‘‘तू आहेस ना इथे.. असं कसं कन्व्हिनियण्टली विसरतोस. हा आपलाच निर्णय होता ना दोघांचा एकत्र असं राहण्याचा? ‘‘लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी एकमेकांनी एकमेकांना पुरेसं ओळखलेलं असणं महत्त्वाचंय.. त्यामुळे लग्नाअगोदर काही काळ एकत्र राहण्याची तयारी असावी ’’ या आशयाचं आपल्या दोघांच्या प्रोफाइलवर लिहिलं होतं ना? तेच वाचून तू मला मेसेज टाकला होतास. आपण दोघांनी मिळून आपापल्या आई-बाबांना  कन्व्हीन्स केलं. आपण दोघांनी मिळून हे चाळवजा घर शोधलं होतं, मे मधल्या रण-रण उन्हात फिरून. आपण दोघं मिळून गेलो होतो, जोशी काकांशी बोलायला. आपण दोघांनी मिळून हे घर बनवलं. आणि दोघांनी मिळून गझली गुणगुणत अनेक रात्री जागवल्या याच घरात. पण दुसर्‍या दिवशी दोघांनाही ऑफिसला जायची घाई असताना मीच नास्ता का बनवायचा? बुधवारी थालीपीठ, रविवारी चिकन, संकष्टीला खिचडी, लाइट बिल, निर्मलाबाईंचे हिशोब, गाडीची आणि घराची चावी.. तुझा या सगळ्यातला सहभाग किती नगण्य असत आलाय हे कळतंय का तुला?? म्हणजे घर दोघांच, पण संसार (येस, दॅट्स द वर्ड!!) मात्र एकटीचा? जबाबदार्‍या कधीच शेअर नाही का करायच्या?? आणि लग्न झाल्यावर काय असं बदलणार आहे? तुझ्या त्या एकमेव लखन का कोणा नोकरावर सगळ्या घराची जबाबदारी दिलेली माझी सासू खपवून घेईल? मी दारूचा घोट जरी घेतला तुझ्यासोबत तरी खपेल तिला? एक दिवस मी नाही गेले किचनमध्ये तर तुला सांगेल ती फोडण्या घालायला? ‘‘कितीही मोठी नोकरी करत असलीस बाहेर तरी घरावरून बाईचं लक्ष ढळता कामा नये’’ असं एक तासाभराचं लेक्चर झाडेल तुझी प्रोफेसर आई मला..’’
यातलं बरंच काही याआधी बर्‍याचदा तुम्ही बोलला आहात आणि  त्याची परिणती ही भांडण आणि मनस्ताप यातच होत आलीये. मग तू हा विषय हळूहळू कमी करायचं ठरवलं. एकत्र राहायचं ठरवलं तेव्हा ‘‘आपल्यात गोष्टी वर्कआउट नाही झाल्या तर वर्कआउट करायची तयारी ठेवली पाहिजे’’ असं तुम्ही स्वत:ला आणि एकमेकांना समजावलं होतंच. पण वर्षभर एकत्र राहिल्यानंतर आता माघार घेणं नको वाटतंय तुला आणि हे कारण फारच क्षुल्लक. तुझी आई तर तिच्या ३0 वर्षांच्या संसाराची यशोगाथा वाचून दाखवेल. ‘‘कधी ऐकलंय का असं? कशाला उगाच नको ती थेरं?? असले कुठलेही लीवीन-बिवीन नव्हते आमच्या काळी तरी टिकली आमची लग्न. यांनी तर आधीच शस्त्र टाकली.’’ जोशी काकांची जीभ जास्तच तळपायला लागेल. पण या सगळ्यात त्याचं काय? त्यानं आधीच हे स्पष्ट केलं होतं ना की, त्याला त्याच्या फॅमिली सोबतच राहायचंय?  म्हणून त्यानं ऑस्ट्रेलियात मिळत असलेला जॉब नाकारला. आणि या त्याच्या गोष्टींवरच तू भाळली वगैरे होतीस ना?  मग तू जर त्याला हिंदी सीरिअल टाइप कुटुंब आणि पत्नीमध्ये निवड करण्याच्या घोर धर्मसंकटात वगैरे ढकललंस आणि तो दुरावला तुझ्यापासून तर? हे तुला कधीच नको होतं व्हायला..
सहा वाजले या सगळ्यात.. तासाभरात पुन्हा चक्र  सुरू..
दिवसभर पुन्हा आईसोबत साड्या आणि सराफांची दुकानं पालथी घालायची आहेत. शिवाय तेच सगळं पुन्हा चघळण्यात फारसा अर्थ नाही. आणि ही ती वेळही नाही. कदाचित उशीर झालाच आहे. होतीलही गोष्टी खरंच वर्कआउट. आणि नाही झाल्या तर. प्रेमात पडल्याची लग्न नामक किंमत आपणही  चुकती केली बाकी अनेकांसारखीच असं समजायचं..
आता के सेरा सेरा. व्हाट एव्हर वील बी, वील बी.
 
- सागर पांढरे

Web Title: Together before the wedding; What if I see?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.