जे रोबोटला येतं, तेवढंच तुम्हालाही येतं, मग तुमची नोकरी जाणार..
By admin | Published: February 8, 2017 03:46 PM2017-02-08T15:46:55+5:302017-02-08T15:46:55+5:30
रोबोट ट्रक चालवू लागले, बातम्या लिहू लागले, बॅँकांचे व्यवहार करू लागले, कर्जप्रकरणात तगादा लावू लागले, लोकांचे दरमहिन्याचे पगार काढू लागले, आॅफिस कामाचे हिशेब ठेवू लागले, लोकांवर देखरेख करू लागले तर माणसं काय करणार? त्यांच्या तर नोकऱ्या जाणारच.. त्या जात आहेतच आजही कारण आॅटोमायझेशन नावाचा एक मोठा शब्द आपल्या आयुष्यात दाखल झाला आहे..
- विनोद बिडवाईक
गेल्या महिन्यात एका बातमीनं उद्योगजगतात बरीच खळबळ उडाली..
इन्फोसिसच्या एचआर विभागानंच दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात त्यांनी ९,००० कर्मचारी कामावरून कमी केले. जे कमी कौशल्याआधारित काम करायचे, ज्याला लोअर एण्ड जॉब्ज म्हणतात असे हे कर्मचारी..
दर तीन महिन्यांनी त्यांनी २००० लोक कमी केले. अर्थात कमी करताना त्यांना अन्य काही स्किल्स शिकवले गेले, ज्यातून त्यांना बाहेर रोजगारसंधी मिळतील याची काळजी त्यांनी घेतली.
पण एवढे कर्मचारी त्यांनी वर्षभरात कमी केले त्याचं कारण काय?
-आॅटोमायझेशन!
जगभरातल्या उद्योग-व्यवसाय-रोजगार विश्वात सध्या आॅटोमायझेशन हा परवलीचा शब्द आहे. आणि कंपन्या भराभर आॅटोमायझेशन स्वीकारत असल्यानं येत्या काळात बरेच रोजगार माणसांच्या हातून जाणार आहेत अशी चर्चा आहे.
अमेरिकेत ड्रायव्हरलेस ट्रकची चर्चा आहे. आॅटोमॅटिक ट्रक, आपलेआप यंत्रानं धावतील, ट्रक ड्रायव्हरची गरजच नाही. नुकत्याच झालेल्या रिओ आॅलिम्पिकच्या वार्तांकनाच्या कामाचा प्रयोग म्हणून वॉशिंग्टन पोस्टने रोबोटकडून बातम्या लिहून घेतल्या. अनेक बॅँकांनी तर कर्जप्रकरणं निकाली काढण्यासाठीचं काम आधीच रोबोटकडे देऊन टाकलं आहे.
जे तिकडे दूर घडतं आहे ते आपल्याकडेही घडतं आहे. अनेक नवीन सॉफ्टवेअर्स आल्यानं त्याचप्रकारची एकसाची काम करणाऱ्या माणसांचं काम जातं आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसारत २०२१ पर्यंत म्हणजे येत्या पाच वर्षांत भारतातले आयटी क्षेत्रातले ६.४ लाख लो स्किल जॉब जाणार आहेत. कारण ती कामं यंत्र करायला लागतील. पण हाच अहवाल असंही म्हणतो की उच्च कौशल्य आधारित ५६ % जॉब्ज याच काळात वाढतील.
वॉल स्ट्रिट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्राच्या ताज्या लेखानुसार आॅटोमायझेशन जगाचा चेहराच बदलून टाकत आहे. सगळ्या रोजगारांचा, नोकऱ्यांचा, कामांचा चेहरा बदलेल. त्यातून कामगार आणि कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्य शिकावी लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपन्यांचं उत्पादन वाढेल. यांत्रिकीकरण झाल्यानं रिपिटेटिव्ह कामांमधल्या चुका संपतील. उत्पादन, अचूकता, नेमकेपणा वाढेल.
आणि या काळात जे टिकतील, काम बदलतील, नवीन कौशल्य स्वीकारतील ते टिकतील. जे विशेष कौशल्य दाखवून नवीन कामगिरी करतील त्यांचं करिअर भरभराटीला येईल. पण ज्यांना एकच एक काम येतं, मी तेवढंच काम करीन असं जे लोक म्हणतील त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळू शकते.
म्हणजे काय तर जी कामं यंत्र करायला लागतील त्या कामांसाठी माणसांची गरजच उरणार नाही. आणि जी कामं यंत्र करू शकणार नाहीत त्या कामांना सुगीचे दिवस येतील..
या प्रश्नाकडे आपण कसं पहायचं?
संधी म्हणून की संकट म्हणून?
त्याचीच एक चर्चा...