११ हजार क्विंटल सोयाबीनची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:09 AM2020-12-28T04:09:58+5:302020-12-28T04:09:58+5:30
दरवर्षी शेतकऱ्यांचे अर्थचक्र खरीप व रबी हंगामावर अवलंबून असते. त्यानुसार शेतकरी पेरणीसाठी नियोजन करतात. यावर्षी सोनपेठ तालुक्यात ३५ हजार ...
दरवर्षी शेतकऱ्यांचे अर्थचक्र खरीप व रबी हंगामावर अवलंबून असते. त्यानुसार शेतकरी पेरणीसाठी नियोजन करतात. यावर्षी सोनपेठ तालुक्यात ३५ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. पेरणीनंतर पावसाने योग्य हजेरी लावल्याने पिके जोमात आली होती. मात्र, सोयाबीन, कपाशी काढण्याच्या अवस्थेत असतानाच बदलत्या वातावरणाचा फटका या पिकांना बसला. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका काढणीसाठी आलेल्या कापूस, सोयाबीन या पिकांना बसला. यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही. अशाही परिस्थितीमध्ये सोयाबीन व कपाशीचे पीक घेतले आहे. त्याची आवक येथील बाजार समितीमध्ये झाली असून, ऑक्टोबर महिन्यात ४ हजार ३०९ क्विंटल, नोव्हेंबर महिन्यात ५ हजार २२५ क्विंटल तर २१ डिसेंबरपर्यंत ८०४ क्विंटल अशी एकूण ११ हजार ५७५ क्विंटलची आवक झाली आहे. सोयाबीनचा उठाव वाढल्याने सोयाबीनच्या भावात वाढ झाल्याचे दिसून आले. केंद्र शासनाने सोयाबीनला ३ हजार ८८० रुपयांचा हमीभाव घोषित केलेला आहे; परंतु व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची हमीभावापेक्षा जास्त भावाने खरेदी केली जात आहे. आतापर्यंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४ हजार ३०० रुपयांपर्यंत सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.
मागील वर्षी १८ हजार क्विंटलची आवक
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षात १८ हजार ५२५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. यावर्षी मात्र खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक निसर्गाच्या तडाख्यात भुईसपाट झाले. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी तब्बल ७ हजार क्विंटल सोयाबीनची आवक घटली आहे.