मुदत संपूनही ३२ लाखांची वसुली होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:13 AM2020-12-26T04:13:47+5:302020-12-26T04:13:47+5:30
केंद्र शासनाने १ डिसेंबर २०१८ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात ...
केंद्र शासनाने १ डिसेंबर २०१८ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आल्या. नंतर केंद्र सरकारकडून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यात प्रत्येकी २ हजार अशी ६ हजार रुपये रक्कम या काळात जमा केली आहे. योजनेत कोणते लाभार्थी पात्र आणि अपात्र याची माहिती शासनाने पूर्वीच कळविली होती. त्यात आयकर भरणा करणारे आणि शासकीय सेवेत असणारे शेतकरी वगळण्यात आले होते. असे असले तरी नोंदणी करताना या शेतकऱ्यांनी शासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करत बनवेगिरी करून नोंदणी केली. शासनाने केलेल्या सोशल ऑडिटमध्ये करदाते शेतकरी आढळून आल्याने या शेतकऱ्यांकडून रक्कम वसुलीची मोहीम हाती घेतली.
नोव्हेंबर महिन्यात संबंधित शेतकऱ्यांना नोटीस पाठवून १५ डिसेंबरपर्यंत रक्कम भरण्याचे कळविण्यात आले होते. पाथरी तालुक्यातील ५६ महसूल गावांत या योजनेत २७ हजार शेतकऱ्यांनी नोंदनी केली होती. त्यातील ४५८ शेतकरी हे करदाते निघाले. या शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आली होती. तालुक्यातील ४५८ अपात्र शेतकऱ्यांपैकी १०८ शेतकऱ्यांनी ९ लाख ३३ हजार ९०१ रुपये रक्कम १५ डिसेंबर पर्यन्त भरणा केली आहे. यामध्ये ३५० अपात्र शेतकऱ्यांनी ३२ लाख २० हजार ९९ रुपये रक्कम अध्यपही भरली नाही.
नोडल अधिकाऱ्यांकडून शोध सुरू
करदाते, अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल केली जात आहे. दुसऱ्या टप्प्यात आता यादीत योजनेचा लाभ घेतलेल्या शासकीय सेवेत नोकरी असणाऱ्या शेतकऱ्यांचा गावपातळीवर असणाऱ्या ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांच्यामार्फत शोध घेतला जात आहे.