पहिला दिवस निरंकच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:16 AM2020-12-24T04:16:38+5:302020-12-24T04:16:38+5:30
परभणी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला बुधवारपासून सुरुवात झाली असून, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकाही तालुक्यात उमेदवारी अर्ज ...
परभणी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला बुधवारपासून सुरुवात झाली असून, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकाही तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिवसभर बसून राहावे लागले.
जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ करण्यात आला. परभणी तालुक्यात ८८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. एकूण ७३६ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. येथील कल्याण मंडपम् परिसरात उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ३३ टेबल तयार केले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून, बुधवारी सकाळपासून अर्ज स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली. गंगाखेड, सेलू, सोनपेठ, मानवत, पूर्णा, जिंतूर, पाथरी या तालुक्यांतही एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.