लेखी आश्वासनानंतर नवव्या दिवशी उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:23 AM2020-12-30T04:23:01+5:302020-12-30T04:23:01+5:30
वाहनावर फायनान्सचे कर्ज नसतानाही परभणी येथील फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ७ नोव्हेंबर रोजी राणीसावरगाव येथील सुरेखा बलभीम कासले यांच्या ...
वाहनावर फायनान्सचे कर्ज नसतानाही परभणी येथील फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ७ नोव्हेंबर रोजी राणीसावरगाव येथील सुरेखा बलभीम कासले यांच्या सोबत असभ्य वर्तन करत गंगाखेड येथून वाहन ओढून नेले होते. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार देऊनसुद्धा पोलीस निरीक्षक बोरगावकर यांच्यासह ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल न करता उलट सुरेखा कासले यांनाच खडे बोल सुनावले. त्यामुळे फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षक बोरगावकर व पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध निलंबनाची कार्यवाही करावी, या मागणीसाठी २१ डिसेंबरपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. यात फायनान्स कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांवर कार्यवाही झाली नसल्याने सुरेखा कासले यांनी उपोषण सुरूच ठेवले. २९ डिसेंबर रोजी तहसीलदार स्वरुप कंकाळ व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपान शेळके यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करत विनयभंगाच्या गुन्ह्यात फायनान्स कंपनीच्या अन्य व्यक्तींची नावे चौकशीअंती समाविष्ट करू व गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचीही चौकशी करून कार्यवाही करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविला जाईल. तसेच वरिष्ठांमार्फत त्यांच्यावर कार्यवाही होईल, असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषणाच्या नवव्या दिवशी सुरेखा कासले यांनी उपोषणाची सांगता केली.