कोरोना रुग्णांचा जेवणावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:17 AM2021-03-23T04:17:57+5:302021-03-23T04:17:57+5:30
जिंतूर : येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना जेवणाच्या व्यवस्थेबरोबरच स्वच्छता नसल्याने रुग्णांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत सोमवारपासून जेवणावर बहिष्कार ...
जिंतूर : येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना जेवणाच्या व्यवस्थेबरोबरच स्वच्छता नसल्याने रुग्णांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत सोमवारपासून जेवणावर बहिष्कार टाकला आहे. जिंतूर शहरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये सद्य:स्थितीला ५२ रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु, या रुग्णांना सुविधा देण्यासाठी प्रशासनाला वेळ नाही. निकृष्ट जेवणाबरोबरच अवेळी जेवण मिळत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे सकाळचा नाष्टा, चहा आणि वेळेवर जेवण मिळत नाही. जे काही देण्यात येत आहे ते निकृष्ट व दर्जाहीन असल्याने अनेकांनी जेवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांवर उपासमोरीची वेळ आली आहे. सोमवारपासून या सर्व रुग्णांनी एकत्र येत जेवणावर बहिष्कार टाकला आहे. एकीकडे जेवण मिळत नसताना दुसरीकडे स्वच्छतेचाही अभाव दिसून येत आहे. नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष झाल्याने कोरेाना रुग्णांचा जीव मेटाकुटीला आला आहे.
प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत
जिंतूरच्या रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत असताना प्रशासन मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जेवणाची सर्व व्यवस्था महसूल व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येते. परंतु, नेमकी याची जबाबदारी घ्यायची कोणी? या बाबतीत एकमत नाही. याचा परिणाम रुग्णांवर होत आहे. रुग्णांना आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याने रुग्णांनी एकत्र येत जेवणावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान प्रशासनाने तातडीने या संदर्भात पावले उचलली नाही तर आम्ही क्वारंटाईन सेंटर सोडून जाऊ असे अनेक रुग्णांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.