सचिवांच्या आदेशानंतरही अतिक्रमण हटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:22 AM2020-12-30T04:22:05+5:302020-12-30T04:22:05+5:30
शहरातील जिंतूर रोड भागातील ईदगाह मैदानावर काही व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणातून आर्थिक वसुली केली जात आहे. त्यामुळे ...
शहरातील जिंतूर रोड भागातील ईदगाह मैदानावर काही व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणातून आर्थिक वसुली केली जात आहे. त्यामुळे हे अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या सचिवांकडे शहरातील काही नागरिकांनी केली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या सचिवांनी औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना १ ऑक्टोबर रोजी पत्र पाठविले आहे. त्यात परभणी शहरातील ईदगाह मैदानावरील अतिक्रमण हटविण्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश देऊनही अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. तसेच या प्रकरणी कार्यवाही न करता जाणीवपूर्वक वेळकाढूपणा होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. यास्तव सदरील प्रकरणी आपल्या स्तरावरून कार्यवाही करून त्याबाबत संबंधितास अवगत करावे, असेही या पत्रात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सचिव एस. सी. तडवी यांनी म्हटले आहे. हे पत्र येऊन जवळपास ३ महिन्यांचा कालावधी होत आला तरी याप्रकरणी कसल्याही प्रकारची कारवाई प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वक्फ बोर्डाच्या जागेवर केलेले अतिक्रमण हटविण्यास प्रशासनाचे एवढी उदासीनता का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.