रस्त्याच्या कडेला साचला कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:16 AM2020-12-24T04:16:34+5:302020-12-24T04:16:34+5:30
प्रवासी निवारा ठरला कुचकामी परभणी : जिंतूर रस्त्यावर विरुद्ध बाजूला नव्याने प्रवासी निवारा उभारण्यात आला आहे. शहरातून जिंतूरकडे जाणाऱ्या ...
प्रवासी निवारा ठरला कुचकामी
परभणी : जिंतूर रस्त्यावर विरुद्ध बाजूला नव्याने प्रवासी निवारा उभारण्यात आला आहे. शहरातून जिंतूरकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या प्रवासी निवाऱ्यावरच प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. या ठिकाणी महामंडळाने आणखी सुविधा विकसित करणे आवश्यक होते. मात्र, या रस्त्याच्या विरुद्ध बाजूला नवीन प्रवासी निवारा उभारण्यात आला आहे. त्या ठिकाणाहून एकही प्रवासी बसमध्ये चढत नसल्याने हा निवारा कुचकामी ठरला आहे.
ऊस गाळपाला देण्यासाठी धावपळ
परभणी : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून जिल्ह्यातील उत्पादकांनी आपला ऊस कारखान्याला गाळपासाठी लवकर न्यावा यासाठी धावपळ सुरू केली आहे. यावर्षी जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे आपला ऊस लवकरात लवकर गाळपासाठी जावा, या प्रयत्नात ऊस उत्पादक आहेत.
मोंढा बाजारपेठेत वाढली आवक
परभणी : खरीप हंगामात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले असले तरी शिल्लक राहिला शेतीमाल विक्रीसाठी बाजारपेठेत आणला जात आहे. त्यामुळे आठ महिन्यांपूर्वी ठप्प असलेली मोंढा बाजारपेठेतील उलाढाल आता वाढली आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्यांची समस्या गंभीर
परभणी : शहरातील सर्वच वसाहतींमध्ये अंतर्गत रस्त्यांची समस्या गंभीर झाली आहे. रस्ते खड्डेमय झाले असून नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. सध्यातरी शहरामध्ये रस्त्यांची कामे ठप्प आहेत.
असोला ते झीरो फाटा रस्त्याची दुरवस्था
परभणी : राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग असलेल्या असोला ते झीरो फाटा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तीन किलोमीटर अंतराचा हा रस्ता असून तो पार करण्यासाठी २० ते २५ मिनिटे वेळ लागत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्यावर खोदकाम केल्याने एकाच बाजूने प्रवाशांना वाहतूक करावी लागत आहे.
पूर्णा नदीवरील पुलाचे काम रेंगाळले
परभणी : पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे पूर्णा नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम मागील अनेक दिवसांपासून रेंगाळले आहे. या नदीवरील जुना पूल कमी उंचीचा असल्याने तो धोकादायक झाला आहे. त्याचप्रमाणे डिग्रस बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी अडविण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुलाची उंची वाढविल्यास डिग्रस बंधाऱ्यात शंभर टक्के पाणीसाठा करणे शक्य होणार आहे. तेव्हा या पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे
जिल्हा कचेरीत वाहनांचा गराडा
परभणी- येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच मोठ्या प्रमाणात वाहने लावली जात आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहनांचे अडथळे पार करूनच प्रवेश करावा लागत आहे. या भागात नो पार्किंगचा फलक लावलेला असतानाही वाहनधारक बिनधास्तपणे वाहने उभी करतात. याविरुद्ध कारवाई होत नसल्याने हा प्रकार वाढला आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीला लागेना लगाम
परभणी- जिल्ह्यात वाळूघाटांचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे एकाही घाटातून अधिकृत वाळूउपसा होत नसला तरी काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध होत आहे. रात्रीच्या वेळी ही वाळू बांधकामांच्या ठिकाणी पोहोचविली जाते. अवैध प्रवासी वाहतुकीला पायबंद बसत नसल्याने प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. मागील चार महिन्यांपासून महसूल प्रशासनाने तर अवैध वाळू वाहतुकीची कारवाई गुंडाळून ठेवली आहे. त्यामुळे वाळूतस्करांचे फावत आहे.
गंगाखेड रस्त्यावरील पुलाच्या कामाला सुरुवात
परभणी- गंगाखेड रस्त्याचे काम परभणी शहराजवळ सुरू झाले आहे. खोदकाम करण्यात आले असून या मार्गावरील पूल आता अधिक रुंदीचा होणार असल्याने वाहनधारकांची समस्या दूर होणार आहे. सध्या या कामाने वेग घेतला आहे.