लग्न सोहळ्यातून सोनसाखळी, मोबाईलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:12 AM2020-12-27T04:12:46+5:302020-12-27T04:12:46+5:30
मुंबई येथील गणेश राजेभाऊ वाकळे (२३) हा तरुण मुंबई येथील शेजारच्या मुलीच्या लग्नासाठी १८ डिसेंबर रोजी गंगाखेड शहरात आला ...
मुंबई येथील गणेश राजेभाऊ वाकळे (२३) हा तरुण मुंबई येथील शेजारच्या मुलीच्या लग्नासाठी १८ डिसेंबर रोजी गंगाखेड शहरात आला होता. त्यानंतर या तरुणाचे पाहुणे असलेल्या वैभव काळे यांच्या घरी थांबला. लग्न दुसऱ्या दिवशी असल्याने या तरुणाने व वैभव काळे यांच्यासोबत पार्टी केली. १८ डिसेंबर रोजी रात्री ११.३० ते १२ वाजेच्या दरम्यान जायकवाडी वसाहतीमध्ये जावून झोपले. त्यानंतर त्या ठिकाणी वैभव काळे यांचे दोन मित्र आकाश जाधव व मुन्ना साळवे हे आले. १९ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता गणेश वाकळे याला जाग आली असता त्याच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची साखळी अंदाजे किंमत १ लाख २० हजार रुपये व ७ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण १ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले. तसेच वैभव काळे व त्याचे दोन मित्रही तेथे मिळून आले नाहीत. त्यामुळे वैभव मुरलीधर काळे, आकाश जाधव व मुन्ना साळवे यांनी १९ डिसेंबर रोजीच्या रात्री गळ्यातील सोन्याची साखळी व मोबाईल चोरी केल्याची फिर्याद २३ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव काळे व आकाश जाधव यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सपोउपनि टी.टी. शिंदे हे करीत आहेत.