शनिवारी लिंबा येथे झाली गारपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:15 AM2021-03-22T04:15:39+5:302021-03-22T04:15:39+5:30
‘नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा’ परभणी : १९ व २० मार्च रोजी झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील ...
‘नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा’
परभणी : १९ व २० मार्च रोजी झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील हरभरा, गहू व ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुरता खचला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्यावतीने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
आठ दिवसांपासून खंडाळी अंधारात
खंडाळी : गंगाखेड तालुक्यातील खंडाळी येथील वीज महावितरण कंपनीच्यावतीने थकीत बिलाच्या वसुलीसाठी आठ दिवसांपासून वीज खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. थकीत बिलाच्या ३० टक्के रक्कम ग्रामस्थांनी भरावी, असे आवाहन सहाय्यक अभियंता गिरी यांनी केले आहे.
ढगाळ वातावरणाने शेतकरी चिंताग्रस्त
खंडाळी : गंगाखेड तालुक्यातील खंडाळी व परिसरात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व पाऊस होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
कृषी कार्यालय बंद; ग्रामस्थांची गैरसोय
ताडकळस : पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील कृषी मंडळ निरीक्षक कार्यालयाच्या इमारतीची दूरवस्था झाल्याने हे कार्यालय मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे ताडकळस व परिसरातील शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
हरभऱ्याचे चुकारे देण्याची मागणी
परभणी : जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रांवर आतापर्यंत २०८ शेतकऱ्यांचा २ हजार ८४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. मात्र, आतापर्यंत एकाही शेतकऱ्याचे चुकारे हमीभाव खरेदी केंद्र प्रशासनाकडून अदा करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
‘कोविड-१९ चे लसीकण सुरू करा’
परभणी : तालुक्यातील पेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी अद्यापही कोविड-१९ चे लसीकरण सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे पेडगाव व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे लसीकरण सुरू करावे.