परभणी : ४५ कोटीचे वितरण, ३५ कोटी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:39 AM2019-12-19T00:39:15+5:302019-12-19T00:40:55+5:30

परभणी शहरातील अनुसुचित जातीतील लाभार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेंतर्गत महानगरपालिकेला आतापर्यंत ७० कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यापैकी ४४ कोटी ९३ लाख रुपये लाभार्थ्यांना वितरित झाले आहेत. अजूनही ३४ कोटी ९५ लाख रुपये लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे बाकी असून या योजनेला गती देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना तातडीने अनुदान वितरित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Parbhani: 1 crore distribution, 2 crore balance | परभणी : ४५ कोटीचे वितरण, ३५ कोटी शिल्लक

परभणी : ४५ कोटीचे वितरण, ३५ कोटी शिल्लक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: परभणी शहरातील अनुसुचित जातीतील लाभार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेंतर्गत महानगरपालिकेला आतापर्यंत ७० कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यापैकी ४४ कोटी ९३ लाख रुपये लाभार्थ्यांना वितरित झाले आहेत. अजूनही ३४ कोटी ९५ लाख रुपये लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे बाकी असून या योजनेला गती देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना तातडीने अनुदान वितरित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरी भागातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी राज्य शासनाच्या वतीने रमाई आवास योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत शहरातील लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देऊन तातडीने घरकुल उभारण्याचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे; परंतु, प्रशासकीय दफ्तरी लाभार्थ्यांची निवड, प्रस्तावांना मंजुरी, टप्प्याअंतर्गत वितरित अनुदान यासाठी वेळ खाऊ धोरण अवलंबिले जात असल्याने लाभार्थ्यांची इच्छा असतानाही अनेकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या दारात खेटे मारावे लागत आहेत. गोरगरीब लाभार्थ्यांच्या अडचणी समजून त्यांना घरकुल उभारणीसाठी प्रशासकीय अधिकाºयानेच पुढाकार घेण्याची आवश्यक आहे; परंतु, या ठिकाणी चित्र उलटे होत असून लाभार्थ्यांनाच आपल्या हक्कासाठी झगडावे लागत आहे.
परभणी शहरामध्ये २०१०-११ पासून रमाई आवास योजना राबविली जाते. पहिल्याच वर्षी १६२ घरकुलांचे उद्दिष्ट महापालिकेला देण्यात आले. दुसºया वर्षात २०५ आणि तिसºया वर्षात ८२२ घरकुलांचे उद्दिष्ट दिले होते. यासाठी राज्य शासनाने १० कोटी ९३ लाख रुपये २०११-१२ मध्ये आणि ६ कोटी ४५ लाख रुपये २०१२-१३ मध्ये मंजूर केले. मात्र या तीनही वर्षामध्ये सर्व्हेक्षण समितीची मंजुरी मिळाली नसल्याने प्रत्यक्ष घरकुलांच्या कामांना सुरुवात झाली नाही. २०१३-१४ मध्ये सर्वप्रथम महापालिकेने ६७९ घरकुलांना मंजुरी दिली आणि त्याच वर्षात ५५२ घरकुले पूर्ण झाली. १२४ घरकुले प्रगतीपथावर आहेत. महानगरपालिकेकडे सद्यस्थितीला ७० कोटी ३८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मागच्या दहा वर्षात घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट ४ हजार ७८९ घरकुलांवर येऊन ठेपले असून त्यापैकी केवळ २ हजार ४८२ घरकुलांना मंजुरी मिळाली असून ८६२ घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. १ हजार ५९२ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले जात आहे; परंतु, ते अद्याप पूर्ण झाले नाही.
महानगरपालिकेने रमाई आवास योजनेवर आतापर्यंत ४४ कोटी ९३ लाख ९० हजार ९२५ रुपयांचा खर्च केला आहे. अजूनही मनपाकडे ३४ कोटी ९५ लाख ६० हजार ४१८ रुपयांचा निधी शिल्लक आहे. घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध असतानाही शहरात उदासिनता दिसून येत आहे. लाभार्थ्यांच्या अनेक तक्रारी आहेत.
एकाच रांगेत असलेल्या घरकुलांपैकी काही घरकुलांना निधी मिळतो तर काही घरकुलांना मिळत नाही, अशाही तक्रारी आहेत. तर घरकुल बांधकामाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणीसाठी उदासिनता दिसून येते. त्यामुळे गोरगरिबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुुढाकार घेऊन तातडीने हे उद्दिष्ट पूर्ण करणे आणि गोरगरिबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
टप्प्या टप्प्याने मिळाले अनुदान
४रमाई घरकुल योजनेंतर्गत निश्चित करुन दिलेले अनुदान लाभार्थ्यांना टप्प्या टप्प्याने दिले जाते. त्यामध्ये खोदकाम पूर्ण करणे, लेंटल लेव्हलपर्यंत बांधकाम, छत बांधकाम आणि संपूर्ण घरकुल बांधकाम झाल्यानंतर अनुदानाचे हप्ते दिले जातात.
४प्रत्येक टप्प्यावर महापालिकेचे अधिकारी पाहणी करुन त्यानुसार अनुदान वितरित करतात. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामासाठी पुढाकार घेतला आहे, त्यांचे अनुदान तातडीने वितरित करावे, अशी मागणी होत आहे.
८६२ घरकुले बांधून पूर्ण
४महानगरपालिकेला ४ हजार ७८९ घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट असले तरी आतापर्यंत केवळ ८६२ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १ हजार ५९२ घरकुलांचे बांधकाम अजूनही प्रगतीपथावर आहे.
४ विशेष म्हणजे शहरात २०१३-१४ मध्ये सर्वाधिक ५५२ घरकुलांचे बांधकाम झाले. त्यानंतर २०१६-१७ मध्ये १५३ आणि २०१८-१९ मध्ये १५७ घरकुले बांधून पूर्ण झाली. मागच्या दोन वर्षांमध्ये शहरात वाळूची समस्या निर्माण झाली आहे. कमी किंमतीत वाळू उपलब्ध नसल्याने अनेक बांधकामधारकांनी आखडता हात घेतला आहे.
तक्रारींसाठी निश्चित केला वार
४रमाई घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्याच्या तक्रारी वाढल्या असल्याने या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी बुधवार हा दिवस निश्चित केला आहे. प्रत्येक बुधवारी रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांनी त्यांच्याकडील तक्रारी मनपाकडे दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
९ कोटी रुपयांचे व्याज
४महानगरपालिकेतर्फे रमाई घरकुल योजनेंतर्गत मागील १० वर्षात ७० कोटी ३८ लाख रुपये रुपयांचा निधी प्राप्त झाला असून शिल्लक रकमेवर ९ कोटी ५१ लाख ५१ हजार ३४३ रुपयांचे व्याज मिळाले असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.

Web Title: Parbhani: 1 crore distribution, 2 crore balance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.