वादळी वाऱ्याने तुटल्या विद्युत तारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:15 AM2021-03-22T04:15:37+5:302021-03-22T04:15:37+5:30
परभणी तालुक्यातील उजळांबा शिवारात गट क्रमांक ४३ मध्ये माधवराव साखरे यांची जमीन आहे. या जमिनीमध्ये शेत आखाडा व स्वामी ...
परभणी तालुक्यातील उजळांबा शिवारात गट क्रमांक ४३ मध्ये माधवराव साखरे यांची जमीन आहे. या जमिनीमध्ये शेत आखाडा व स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल आहे. मात्र याच आखाडा परिसरातून वीज वितरण कंपनीची ३३ केव्ही उपकेंद्राची विद्युत लाईन गेलेली आहे. या विद्युत लाईनच्या तारा जीर्ण झाल्यामुळे ९ मार्च रोजी माधवराव साखरे यांनी वीज वितरण कंपनीच्या परभणी येथील सहायक अभियंत्यांना निवेदन देऊन या तारा बदलून इतर ठिकाणी हलवाव्यात, यासाठी निवेदन दिले होते. मात्र सहायक अभियंत्यांकडून साखरे यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली. उलट या विद्युत तारा इतरत्र हलवायच्या असतील तर ८० हजार रुपयांचा खर्च तुम्हाला येईल, असे उत्तर देण्यात आले. त्यानंतर २० मार्च रोजी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे या विद्युत तारा तुटून शेत आखाड्यावर पडल्या. सुदैवाने या ठिकाणी कोणीही नसल्याने जीवित हानी टळली. मात्र वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असून, उजळांबा व परिसरातील ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याकडे अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.