महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यातून परस्पर ५० हजार रुपये लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:10 AM2020-12-28T04:10:01+5:302020-12-28T04:10:01+5:30
पाथरी : पाथरी शहरातील रहिवासी असणाऱ्या एका महिलेच्या बँक खात्यातील ५० हजार रुपये औरंगाबाद येथील दोन एटीएममधून ...
पाथरी : पाथरी शहरातील रहिवासी असणाऱ्या एका महिलेच्या बँक खात्यातील ५० हजार रुपये औरंगाबाद येथील दोन एटीएममधून परस्पर काढत आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने २६ डिसेंबर रोजी पाथरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
पाथरी शहरातील माळीवाडा येथे राहणाऱ्या व सध्या जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे कार्यरत असलेल्या जयश्री सुभाष नाईक असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. जयश्री नाईक यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हिंगोली येथील स्वतःच्या खात्यातील ९ हजार ५०० रुपये पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरात असणाऱ्या एटीएममधून १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास काढले होते. यानंतर १२ डिसेंबर रोजी औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात असणाऱ्या एटीएममधून अज्ञात व्यक्तीकडून सकाळी ७.१५ ते ७.३० च्या दरम्यान तीनवेळा प्रत्येकी दहा हजार रुपयांची रक्कम काढण्यात आली. यानंतर १३ डिसेंबर रोजी पुन्हा औरंगाबाद येथील जवाहर कॉलनी परिसरात असलेल्या एटीएममधून सकाळी ८.१५ ते ८.३० वाजेदरम्यान २० हजार रुपये काढण्यात आले. यासंदर्भात सदरील महिलेला मोबाईलवर एसएमएस आल्यानंतर माहिती कळाली. तोपर्यंत अज्ञात व्यक्तीने या महिलेच्या खात्यातून सुमारे ५० हजार रुपये लंपास केले होते. विशेष म्हणजे, या महिलेचे एटीएम कार्ड या दरम्यान तिच्या जवळच होते व कोणीही कॉल करत ओटीपीसंदर्भात विचारणा केलेली नव्हती. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदरील महिलेने यासंदर्भात हिंगोली येथील बँक प्रशासनाकडे पैसे कपात झाल्याबद्दल विचारणा करत लेखी तक्रारही दिली होती. दरम्यान, या खात्याचे एटीएम ब्लॉक केले होते. यानंतरही २२ डिसेंबर रोजी ३ वाजेच्या सुमारास पुन्हा अज्ञात व्यक्तीने खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याचा मेसेज आल्यानंतर सदरील महिलेने यासंदर्भात पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अधिक तपास पाथरी पोलीस करत आहेत.