पोलिसांनी सुनावले कारखाना व्यवस्थापनाला खडे बोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:16 AM2020-12-24T04:16:27+5:302020-12-24T04:16:27+5:30
पाथरी तालुक्यात रेणुका शुगर्स आणि योगेश्वरी शुगर्स या दोन खाजगी साखर कारखान्यांनी यावर्षीचा गळीत हंगाम सुरू केला आहे. ...
पाथरी तालुक्यात रेणुका शुगर्स आणि योगेश्वरी शुगर्स या दोन खाजगी साखर कारखान्यांनी यावर्षीचा गळीत हंगाम सुरू केला आहे. तसेच जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील इतर पाच साखर कारखाने या भागातून ऊस गाळपास घेऊन जात आहेत. बहुतांश तोडणी यंत्रणा ट्रॅक्टरवर अवलंबून आहे. डबल ट्रॉली ट्रॅक्टरने ऊस वाहतूक केली जात आहे. तालुक्यात जवळपास १२ हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. तालुक्यातील मुख्य रस्ते तसेच ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. पाथरी -आष्टी रस्त्याचे काम सुरू आहे. सेलू- पाथरी रस्त्यावर रहदारी करता येत नाही तर गावाला जोडणारी रस्ते खराब आहेत. या भागातील ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टर चालक वाहतुकीचे कोणतेही नियम पाळत नाहीत. भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवत असताना कर्णकर्कश आवाजासह रात्रीच्या वेळी वाहतूक केली जात आहे. बहुतांश ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर बसविण्यात आले नाहीत, याबाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक जी. डी. सैदाने यांनी पाथरी येथील रेणुका शुगर्स साखर कारखान्याला पत्र पाठवले आहे. कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाहतुकीबाबत नियम पाळण्याच्या सूचना दिल्या असून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे कळवले आहे.
बैठक घेऊन सूचना द्या
पाथरी - माजलगाव रस्त्यावर रामपुरी फाट्याजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या डबल ट्राॅली ट्रॅक्टरला ट्रॅव्हलने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला होता. त्यामुळे कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या यंत्रणेच्या चालक- मालक यांची बैठक घेऊन सूचना कराव्यात असे पोलिसांनी कारखाना व्यवस्थापनास कळवले आहे.