आठवडी बाजार बंद झाल्याने नुकसानीत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:18 AM2021-03-23T04:18:21+5:302021-03-23T04:18:21+5:30
वाळूची अवैध वाहतूक थांबेना परभणी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत आहे. याविरुद्ध पोलीस प्रशासन कारवाई करीत ...
वाळूची अवैध वाहतूक थांबेना
परभणी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत आहे. याविरुद्ध पोलीस प्रशासन कारवाई करीत असले तरी या वाहतुकीला अद्यापही लगाम लागलेला नाही. दररोेज जिल्ह्यात वाळूचे ट्रक पकडले जात आहेत. मात्र, ठोस मोठी कारवाई होत नाही. त्यामुळे वाळू माफियांचे मनोधैर्य उंचावत आहे. याशिवाय महसूल प्रशासनाचे नियंत्रण राहिले नसल्याने वाळू चोरी दिवसेंदिवस वाढत आहे.
बांधकाम साहित्याचा वाहतुकीला अडथळा
परभणी : शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याच्या कडेला टाकलेल्या वाळूमुळे वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
ग्रामीण रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था
परभणी : शहरातील ग्रामीण भागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमध्ये रस्त्यांची वाताहात झाली होती. त्यानंतर आतापर्यंत रस्ते दुरुस्त केले नाहीत. ग्रामस्थांना मात्र दररोज याच मार्गावरून वाहतूक करावी लागत असल्याने हे रस्ते डोकेदुखी ठरत आहेत.
शहरातील बाजारपेठेत गर्दी
परभणी : शहरातील बाजारपेठ भागातील नागरिकांची गर्दी अजूनही कमी झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने गर्दी कमी करण्याचे आवाहन केले असले तरी प्रत्यक्षात बाजारपेठेमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढतच आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असताना शहरात याविरुद्ध कारवाई केली जात नाही.
नव्या वसाहतीत टंचाईच्या झळा
परभणी : शहरात नव्याने स्थापन झालेल्या वसाहतीमध्ये नळ योजनेचे पाणी पोहोचत नसल्याने या भागातील नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असून, भूजल पातळीत घट झाल्याने बोअर बंद पडले आहेत. त्यामुळे नव्या वसाहतींमधील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.
रेल्वेस्थानकावर तपासणीला खो
परभणी : येथील रेल्वेस्थानकावरून दररोज हजारो नागरिक परभणी शहरात दाखल होत आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून स्थानकावर आरोग्य तपासणीला खो दिला आहे. मध्यंतरी रेल्वेस्थानकावर कोरोना तपासणी केंद्र सुरू केले होते; परंतु हे केंद्र आता बंद आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम रखडले
परभणी : परभणी ते मनमाड या रेल्वे मार्गावर दुहेरीकरणासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. परंतु केंद्र शासनाने या मार्गाच्या दुहेरीकरणास निधी उपलब्ध केला नाही. त्यामुळे हे काम ठप्प पडले आहे. अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर अनेकांनी दुहेरीकरण संदर्भात पाठपुरावा सुरू केला होता; परंतु आता हा पाठपुरावाही बंद झाला आहे.