जय जवान... २०१८ मध्ये भारतमातेच्या रक्षणासाठी जिवाची बाजी लावणारे महाराष्ट्राचे सुपुत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 18:39 IST
1 / 6देशातील आपल्या भावा-बहिणींना सुखानं, शांततेत, निर्धास्तपणे राहता यावं म्हणून लष्कराचे जवान आपल्या जिवाची पर्वा न करता देशाच्या सीमांचं रक्षण करत असतात. भारतमातेच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतात. शत्रूशी लढताना हौतात्म्य पत्करायलाही ते मागे-पुढे पाहत नाहीत. सरत्या वर्षात महाराष्ट्रातील जे वीर जवान सीमेवर शहीद झाले, त्यांचं स्मरण न करता नव्या वर्षात पाऊल ठेवणं हा कृतघ्नपणा ठरेल. या शहिदांना सलाम करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तेच नम्रपणे पूर्ण करण्याचा हा छोटासा प्रयत्न... 2 / 6१३ जानेवारी २०१८... काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबन सेक्टरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राचे सुपुत्र लान्स नायक योगेश मुरलीधर भदाणे (२८) शहीद झाले. शहीद भदाणे हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खलाणे गावचे रहिवासी होते.3 / 6३ एप्रिल २०१८... परभणीच्या पालम तालुक्यातील कोनेरवाडी येथील २१ वर्षीय शुभम सूर्यकांत मुस्तापुरे हे जम्मू काश्मीरमध्ये कृष्णा घाटीत कर्तव्यावर असताना पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद झाले होते. सप्टेंबर २०१७ मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या भरती प्रक्रियेत शुभम यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली होती.4 / 6११ एप्रिल २०१८... जम्मू-काश्मिरात पूंछ व राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता. यात वैजापूर तालुक्यातील फरीदाबाद येथील जवान किरण थोरात यांना वीरमरण आलं होतं.5 / 6७ ऑगस्ट २०१८... उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईत महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना वीरमरण आलं होतं. 34 वर्षीय मेजर कौस्तुभ राणे हे ठाणे जिल्ह्यातील मीरारोडचे राहणारे होते. देशासाठी लढताना आईने आपला एकुलता एक मुलगा गमावला तर अडीच वर्षाच्या चिमुकल्याने आपले वडील गमावले.6 / 6१५ सप्टेंबर २०१८... तब्बल १९ वर्षांपासून सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले जवान सुनील विठ्ठलराव धोपे यांचा मृतदेह मेघालय राज्यातील सिलाँग येथे कर्तव्याच्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता.