1 / 9नांदेड : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून संततधार पावसाने नद्या-नाल्यांना पूर आला आहे. त्यात विष्णूपुरी प्रकल्पाच्या वरील भागातून पाण्याचा येवा सुरूच असल्याने विष्णूपुरीचे सहा गेट उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सध्या विष्णूपुरी प्रकल्पात ९०.३८ टक्के पाणीसाठा आहे.2 / 9नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. सर्वदूर असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना पूर आला आहे. 3 / 9जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. परिणामी शेतीशी संबंधित सर्व कामे खोळंबली असून, सततच्या पावसामुळे पिकांचेही नुकसान होत आहे. 4 / 9उमरी तालुक्यातील बळेगाव बंधाऱ्याचे १६ दरवाजे उघडण्यात आले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. 5 / 9दरम्यान पैनगंगेला पूर आल्यामुळे शेकडो हेक्टर शेतामध्ये पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील माहूर, किनवट, हदगाव, कंधार, देगलूर आदी तालुक्यात पावसाने मोठे नुकसान केले आहे.6 / 9कंधार तालुक्यातील भोजूचीवाडी येथील पूल वाहून गेल्याने काही वाडी-तांड्यांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, या पुरामध्ये अडकलेल्या ४० जणांची सुखरूप सुटका करण्यात आणि त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात गावकऱ्यांना यश आले आहे.7 / 9कंधार तालुक्यातील फुलवळ सर्कलमधील भोजूचीवाडी, मानसिंगवाडी, लिंबातांडा, चोळीतांडा या वाडी-तांड्याला जोडला जाणारा रस्त्यावरील पूल अतिपावसाच्या पाण्यामुळे खरडून गेल्यामुळे रहदारीसाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. 8 / 9पुलाअभावी बुधवारी सायंकाळपासून शेतकरी, विद्यार्थी व रुग्ण यांचा संपर्क तुटल्यामुळे रात्र शेतातील आखाड्यावर काढावी लागली. जवळपास ४० लोक अडकून पडले होते. त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविले असल्याचे सरपंच प्रतिनिधी सतीश देवकते यांनी सांगितले. दरम्यान, या रस्त्यावरील पुलाची पाहणी पं. स. सदस्य उत्तम चव्हाण, सतीश देवकते यांनी केली.9 / 9विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील पैनगंगेला संततधार पावसामुळे पूर आला असून, किनवट तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या सहस्त्रकुंडचा धबधबा ओसंडून वाहत आहे. त्यामुळे पर्यटक पडत्या पावसातही निसर्ग साैंदर्य पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.