Ashadhi Wari: दिंडयांना २० हजार अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा, देवस्थानांकडून स्वागत, दिंड्यांचा विरोध

By विश्वास मोरे | Published: June 17, 2024 08:00 PM2024-06-17T20:00:04+5:302024-06-17T20:01:58+5:30

शासनाने दिंड्यांसाठी जाहीर केलेल्या अनुदानाबाबत काही वारकरी करत असलेला विरोध व्यक्तिगत आहे, देवस्थानची प्रतिक्रिया

20 thousand grant to Dindi Chief Minister eknath shinde announcement welcome from temple trusty oppose by varkari | Ashadhi Wari: दिंडयांना २० हजार अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा, देवस्थानांकडून स्वागत, दिंड्यांचा विरोध

Ashadhi Wari: दिंडयांना २० हजार अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा, देवस्थानांकडून स्वागत, दिंड्यांचा विरोध

पिंपरी : पंढरीची आषाढी वारी (Ashadhi Wari) समीप आली आहे. तर प्रशासकीय तयारी सुरु झाली आहे. राज्य शासनाने सोहळ्यातील तीन हजार दिंडयांना २० हजार अनुदानाची घोषणा दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे.  त्यावरून वारकरी संप्रदायात मत- मतांतरे सुरु झाली आहेत. आक्षेप -प्रति आक्षेप होऊ लागले आहेत. शासनाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या  देवस्थानांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे. तर 'अखंडपूर्ण वारीची वाट चालणाऱ्या संतांच्या पायिकांनी विरोध दर्शविला आहे. दिंड्याना अनुदान नको, वारी आणि तीर्थक्षेत्रावर सेवासुविधांचे सक्षमीकरण करा, तसेच काही दिंड्या अनुदान मिळतेय ते घ्या अशी संमिश्र भूमिका आणि सूर वारकरी संप्रदायातून उमटत आहे.
 
"पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरि" वारी म्हणजे वारकरी संप्रदायाचा गाभा आणि विठ्ठलचरणी तल्लीन होऊन नाचत गात पंढरीच्या विठूरायाला भेटण्याची ओढ या वारकरी संप्रदायातल्या प्रत्येकाला असतेच. वारीची ओढ सुरु झाली आहे. स्थानिक प्रशासनापासून तर जिल्हा राज्य शासनाच्या वतीने सोहळ्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे बैठका सुरु झाल्या आहेत. त्यावेळी मुंबई येथील बैठकीत 'पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्याना २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. यंदाची आषाढी वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी नियोजन करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याबैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होते. 

 'भिक्षा पात्र अवलंबणे । जळो जिणे लाजिरवाणे॥' शासनाच्या २० हजार मदतीवर वारी म्हणजे वारी या भक्तीरसपूर्ण शब्दावर आणि परंपरेवरच आघात आहे. यामुळे निष्कामवारीपासून दिंडी आणि वारकरी दुरावणार आहे. पंढरीची वारी ही एक साधना आणि व्रत आहे. त्यामुळे पंढरीची वारी आहे माझे घरी, पण ती शासनाच्या २०हजारी उपकारावर, अशी लाजीरवाणी परिस्थिती निर्माण होणार आहे. स्वकमाईतून दिंडीला ५०० ते काही हजार त्या वारकऱ्याकडून भिशी दिली जाते.अनेक ठिकाणी दिंड्यांच्या पंगती ठरलेल्या असतात. अनेक ठिकाणी अन्नदात्यांकडून अन्नदान केले जाते. त्यामुळे पंढरीच्या वारकऱ्यांना या २० हजाराच्या मदतीची आवश्यकता नाही. तो निधी सरकाराने वारीच्या वाटेवर सोई सुविधांसाठी किंवा इतर मदतीसाठी खर्च करावा. खऱ्या आचार, विचार आणि उच्चार करणाऱ्या पंढरीच्या वारकऱ्यांनी ही मदत स्विकारु नये. किंवा शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. -प्रशांत महाराज मोरे (संत तुकाराम महाराजांचे  ११ वे वंशज ) 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. नियोजना संदर्भात पुण्यात तसेच मुंबई येथे बैठक झाली. त्यामध्ये प्रशासनाची तयारी आणि शासनाकडून होणारे सहकार्य याबाबत माहिती देण्यात आली. शासनाने दिंड्यांसाठी जाहीर केलेल्या अनुदानाबाबत काही वारकरी विरोध करत आहेत, हा त्यांचा विरोध व्यक्तिगत आहे. वारी सोहळ्यास आणि दिंडयांना बळ देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे, ही चांगली बाब आहे. आम्ही निर्णयाचे स्वागत करतो. - पुरुषोत्तम महाराज मोरे (देहू देवस्थानचे अध्यक्ष ) 

अशा आहेत  वारकऱ्यांच्या अपेक्षा  

१) पालखी मार्ग रुंदीकरण काही भागात अपूर्ण आहे. पालखी तळ जागाचा प्रश्न आहे. जागांचा प्रश्न सोडवायला हवा. 
२) वारीमार्गावर आता वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची मोहीम, पर्यावरणाची वारी करण्याची गरज. निर्मलवारी संकल्पनेस बळ द्यायला हवे. वारीकाळात वैद्यकीय सुविधा सक्षम कराव्यात. 
३) देहू, पंढरपूर आणि आळंदी या तीर्थ क्षेत्रमध्ये इंद्रायणी आणि चंद्रभागा नदी आहे. तिचे प्रदूषण थांबलेले नाही. प्रदूषण रोखण्याची गरज आहे.

Web Title: 20 thousand grant to Dindi Chief Minister eknath shinde announcement welcome from temple trusty oppose by varkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.