पिंपरी चिंचवड जळीतकांड..! दिवाळीत पगार कापल्याने चालकानेच टेम्पो ट्रॅव्हलरला लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 19:41 IST2025-03-20T19:40:30+5:302025-03-20T19:41:56+5:30
या घटनेच्या पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पिंपरी चिंचवड जळीतकांड..! दिवाळीत पगार कापल्याने चालकानेच टेम्पो ट्रॅव्हलरला लावली आग
- किरण शिंदे
हिंजवडी : हिंजवडीतील व्योम ग्राफिक्स या ‘आयटी’ कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला (टेम्पो ट्रॅव्हलर) अचानक आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले. पुढील बाजूस बसलेले कर्मचारी आणि चालक पेटत्या बसमधून बाहेर पडले, मात्र मागील दरवाजा उघडला न गेल्याने अडकून पडलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. फेज एकमधील विप्रो सर्कलजवळ बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेच्या पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात नसून घात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. चालकाने केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला असल्याची माहिती समोर येत आहे. फेज १ मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता. चालकाचा दिवाळीत पगार कापला होता. तर गाडीतील सह कर्मचारी यांनी त्रास दिला होता म्हणून त्याने हे सर्व घडवून आणल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ट्रॅव्हल्सला आग लागली नाही तर चालकाने गाडी पेटवल्याचं तपासात निष्पन्न झालंय त्यामुळं चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी अन पाच जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चालक जनार्दन हंबर्डीकर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बेंझिन केमिकल आणले, वारजेतून काडीपेटी घेतली
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी माहिती दिली. त्यात घातपात असल्याचे उघड झाले आहे. विशाल गायकवाड म्हणाले, 'अपघात झाल्यानंतर पोलिसांनी आग कशामुळे लागली. याचा तपास सुरु केला. त्यावेळी शॉर्ट सर्किटने आग लागली नसल्याचे आढळून आहे. मग कामगारांशी आणि कंपनीत चौकशी केली त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. कामगारांशी असलेला वाद आणि दिवाळीमध्ये बोनस न दिल्याने आणि वेतन कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिली आहे, अशी माहिती उघड झाली आहे. नियोजनबद्द कट रचून त्याने हा प्रकार केला आहे. आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले. तसेच वारजे येथून काडेपेटी घेतली होती. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही गाडीतील सीट खाली आणून ठेवल्या होत्या. हिंजवडीजवळ आल्यावर कंपनी काही अंतरावर असताना त्याने काडीपेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या, उडी मारली. केमिकलमुळे बसमध्ये आगीचा भडका उडाला.
कशामुळे घडले ?
१) हंबर्डीकर यांचे कंपनीतील त्यांच्या सहकाऱ्यांशी सतत वाद होत होते. दररोजच्या प्रवासातील समस्या आणि सहकारी कर्मचाऱ्यांशी वैयक्तिक संघर्षांमुळे तणाव वाढत असल्याचे इतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी केलेल्या तपासात आढळले.
२) हंबर्डीकर याने काडी पेटवून रासायनिक स्फोट घडवून गाडीला आग लावली. स्फोट होण्यापूर्वीच चालक गाडीतून बाहेर उडी मारली होती.
यांचा गेला नाहक बळी
वाहन पेटवून झालेल्या अपघात सुभाष सुरेश भोसले (वय ४२, रा. वारजे), शंकर शिंदे (५८, रा. नऱ्हे), गुरुदास लोकरे (४०, रा. हनुमाननगर, कोथरूड), राजू चव्हाण (४०, वडगाव धायरी) यांचा मृत्यू झाला तर, जनार्दन हुंबर्डेकर (चालक, ५७, रा. वारजे), संदीप शिंदे (३७, रा. नऱ्हे), विश्वनाथ जोरी (५२, रा. कोथरूड), विश्वास लक्ष्मण खानविलकर (पुणे), प्रवीण निकम (३८), चंद्रकांत मलजी (५२, रा. दोघेही कात्रज) जखमी झाले. विश्वास कृष्णराव गोडसे, मंजिरी आडकर, विठ्ठल दिघे, प्रदीप बाबुराव राऊत बसमधून सुखरूप बाहेर पडले होते.