भाजपावर नाराज? नितीशकुमार सरकार लवकरच कोसळणार; राजदचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 22:20 IST2020-12-26T22:17:21+5:302020-12-26T22:20:30+5:30
Bihar Politics: केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या आईचे निधन झाल्याचे भाजपानेही ट्विटरवर पोस्ट केले होते. यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोकही व्यक्त केला.

भाजपावर नाराज? नितीशकुमार सरकार लवकरच कोसळणार; राजदचा दावा
रांची : बिहारचे माजी आरोग्य मंत्री आणि राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी आज मोठे वक्तव्य केले आहे. आज ते लालूप्रसाद यांना भेटण्यासाठी रांचीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये आल होते. यानंतर त्यांनी नितीशकुमार यांचे सरकार लवकरच कोसळणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
राजदचे आमदार तेजप्रताप यांनी सांगितले की, भाजपा एक असा पक्ष आहे जो आपल्या मित्रपक्षांना गिळून टाकतो. अरुणाचल प्रदेशमध्ये जदयूच्या सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. आता तिथे एकच आमदार जदयूमध्ये राहिला आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या आमदारांना भाजपाच्या उमेदवारांना हरविले होते.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर नितीशकुमार सरकार अडचणीत आली आहे. कृषी कायद्यांवरून नितीशकुमार सरकार लवकरच पडणार आहे., असे ते म्हणाले.
दरम्यान, नितीश कुमार यांनी भाजपाने पक्ष फोडल्याने नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी शब्दांत नसून कृतीमधून आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यांना सांत्वन देण्यासाठी नितीशकुमार गेलेले नाहीत. आमदार फोडल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
प्रसाद यांच्या आईचे निधन झाल्याचे भाजपानेही ट्विटरवर पोस्ट केले होते. यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोकही व्यक्त केला. प्रधान यांना फोनही केला. पाटन्यामध्ये असूनही काही अंतरावर प्रधान यांचे घर असूनही ते न गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नितीशकुमार नेहमी अशावेळी जवळच्या व्य़क्तींना भेटण्यास जातात. त्यांच्या या वागण्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.