मतदानाची टक्केवारी कमी झाल्यास भाजपला फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 04:37 IST2019-04-16T04:36:46+5:302019-04-16T04:37:04+5:30
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी झाली, तर भाजपला फटका बसणार असून, ती धोक्याची घंटा ठरणार आहे.

मतदानाची टक्केवारी कमी झाल्यास भाजपला फटका
जळगाव : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी झाली, तर भाजपला फटका बसणार असून, ती धोक्याची घंटा ठरणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मतदारांना बाहेर काढून टक्केवारी वाढवावे, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुसावळात केले.
भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ बैठकीत ते बोलत होते. पाटील म्हणाले, माझ्यावर पश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे एक दिवस तरी या जिल्ह्यात येणे आवश्यक असल्यामुळे आपण आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात मोदी शासनाविषयी अत्यंत चांगले मत असून, सर्वत्र उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला.
बारामती पाडली, तर पुस्तक लिहावे लागेल
सध्या आपण बारामतीवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. तिथे जोमाने प्रचार सुरू आहे, बारामतीची जागा जर आपण पाडली, तर आपण काय काय केले, या संदर्भात पुस्तक लिहावे लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.