BJP Maharashtra : मातोश्रीवर बसून तुम्हाला काय कळणार लॉकडाऊन काय असतं...?; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 15:19 IST2021-03-31T15:17:19+5:302021-03-31T15:19:20+5:30
BJP slams CM Uddhav Thackeray over thinking of lockdown : कोरोनाच्या Corona वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिले होते लॉकडाऊनचे संकेत.

BJP Maharashtra : मातोश्रीवर बसून तुम्हाला काय कळणार लॉकडाऊन काय असतं...?; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिक, लघु उद्योजक आणि गरीब वर्गामध्ये यामुळे काहीशी चिंता आणि भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. यासंदर्भात महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी राज्यातील ठाकरे सरकारला एक महत्त्वाचा सल्ला दिला होता. आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी पुन्हा लक्ष केंद्रित करूया आणि मृत्यू टाळूया, असा महत्त्वाचा सल्ला महिंद्रा यांनी दिला होता. यानंतर भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. BJP slams CM Uddhav Thackeray over thinking of lockdown
'उद्धव ठाकरे तुमच्या नाकर्तेपणामुळे सामान्य जनतेला बळीचा बकरा ठरवू नका...! मातोश्रीवर बसून तुम्हाला काय कळणार लॉकडाऊन काय असतं? तुमचे निर्बंध, नियमांमध्ये पोळणाऱ्या जनतेला विचारा लॉकडाऊनमध्ये जगता येईल काय...? कधी हे जाणून घेतलंत का, मुख्यमंत्रीसाहेब...?' असं म्हणत भाजपनं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. भाजपनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरू आनंद महिंद्रा यांच्या सल्ल्याचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली. 'लॉकडाऊनच्या पांघरूणाखाली अपयश लपवू नका ठाकरे सरकार, राज्यात कोणाचंही भविष्य उद्ध्वस्त करू नका. तुमच्या नाकर्तेपणानं कोणालाही बळी पडू देऊ नका,' असंही भाजपनं म्हटलं आहे.
काय म्हणाले होते आनंद महिंद्रा?
"उद्धवजी, समस्या अशी आहे की लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत. मूळ लॉकडाऊन मूलत: रुग्णालये / आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करण्यासाठी होते. त्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करूया आणि मृत्यू टाळूया," असा सल्ला आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत ठाकरे सरकारला दिला आहे.
लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट निर्देश दिले की, एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.