Lockdown:“नियम न पाळता कोणी रस्त्यावर आला तर त्याला किंमत मोजावी लागेल”; मंत्री जयंत पाटलांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 18:12 IST2021-05-01T18:11:01+5:302021-05-01T18:12:41+5:30
निवडणूक आयोगाने तारतम्य बाळगणे आवश्यक होते, रुग्णवाढीवरून जयंत पाटलांची निवडणूक आयोगावर टीका

Lockdown:“नियम न पाळता कोणी रस्त्यावर आला तर त्याला किंमत मोजावी लागेल”; मंत्री जयंत पाटलांचा इशारा
सांगली : संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरत आहे. असे वातावरण असताना निवडणूक आयोगाने कोणत्याही निवडणूक घेणे चुकीचे होते. ज्या ठिकाणी निवडणूक झाल्या आहेत तिथे कोरोनाचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे निवडणुकांचे नियोजन करताना निवडणूक आयोगाने तारतम्य बाळगणे आवश्यक होते अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील म्हणाले, देशात कोरोनाची लाट वेगाने वाढत आहे. संसर्ग टाळण्यासाठी देशभरात कोणत्याही निवडणूका घेणे उचित नव्हते मात्र निवडणूक आयोगाने देशभरात निवडणुका घेतल्या. निवडणूक आयोगाने जरा तारतम्य बाळगले असते तर परिस्थिती गंभीर बनली नसती. ज्या राज्यात निवडणूका झाल्या तिथे करोनाचे परिमाण दिसून येत आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच राज्यात कोरोना नियंत्रणासाठी राज्य शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. आता जनतेनेही निर्बंध पाळले पाहिजेत. पोलिसी खाक्या दाखवून कोणालाही बंधनात ठेवायचे नाही, मात्र नियम न पाळता कोणी रस्त्यावर आला तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशाराही जयंत पाटलांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दिला आहे. त्याचसोबत रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे. पोलिसांनी याआधी दोघाना अटक केली आहे याप्रकरणात आणखी कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर ही कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.