Maratha Reservation :"मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींना पत्र पाठवणार, गरज भासल्यास…” मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 21:40 IST2021-05-05T21:40:32+5:302021-05-05T21:40:32+5:30
Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करताना आरक्षणासाठीच्या लढाईच्या पुढील वाटचालीबाबत मोठे विधान केले आहे.

Maratha Reservation :"मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींना पत्र पाठवणार, गरज भासल्यास…” मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या सामाजिक आणि राजकीय विश्वात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला. (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण हे घटनाबाह्य ठरवत महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेले हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाजामध्ये निराशेचे वातावरण असून, मराठा समजामधून संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करताना आरक्षणासाठीच्या लढाईच्या पुढील वाटचालीबाबत मोठे विधान केले आहे. ( CM Uddhav Thackeray Says "will send a letter to the Prime Minister & President for Maratha reservation")
जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबतची लढाई संपलेली नाही, हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठीच्या पुढील लढाईबाबतही मार्गदर्शन केले आहे. आता कुठे न्याय मिळेल हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देण्याचा अधिकार हा केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबत मी सकाळी दिलेल्या निवेदनामधून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना आवाहन केले आहे. मात्र आता आरक्षणाच्या या मागणीसाठी मी उद्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिणार आहे. तसेच गरज भासल्यास आरक्षणाच्या या मुद्द्यावर मी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचीही भेट घेईन.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम ३७० हटवताना जी हिंमत दाखवली होती. तशी हिंमत आणि संवेदनशीलता मराठा आरक्षणाबाबत दाखवावी. यापूर्वीदेखील सर्वोच्च न्यायालयाने दिलेले काही निर्णय संसदेमधून बदलले गेले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने जास्त वेळ न घालवता मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
दरम्यान, मराठा आरक्षणााबाबत सर्वोच्च न्यायालाने दिलेल्या निर्णयानंतर मराठा समाजाने दाखवलेला संयम कौतुकास्पद आहे. मी त्यासाठी मराठा समाजाचे आभार मानतो. सध्या आपण कोरोनाच्या अत्यंत धोक्याच्या वळणावर उभे आहोत, आतापर्यंत जो संयम आणि शांतता दाखवली, तसाच संयम दाखवा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे.