...त्यावेळी अनेकांनी दिला होता भाजप सोडण्याचा सल्ला; नितीन गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 17:52 IST2021-05-19T17:50:49+5:302021-05-19T17:52:31+5:30
कोरोना संकटावर भाष्य करताना गडकरींनी सांगितला चार दशकांपूर्वीचा किस्सा

...त्यावेळी अनेकांनी दिला होता भाजप सोडण्याचा सल्ला; नितीन गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा
मुंबई: धडाकेबाज निर्णय, अफाट कार्यक्षमता यामुळे केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी कायम चर्चेच असतात. कोरोना लढ्याचं नेतृत्त्व गडकरींकडे सोपवा, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी केली. त्यामुळे गडकरी पुन्हा चर्चेत आले. सर्वच पक्षांमध्ये गडकरी यांचे उत्तम संबंध आहेत. गडकरी यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांची टास्कमास्टर अशी ओळख आहे. मात्र एक काळ असा होता की नितीन गडकरींना अनेकांनी पक्ष सोडण्याचा सल्ला दिला होता. खुद्द गडकरींनीच हा प्रसंग देशातील विविध कुलगुरुंशी संवाद साधताना सांगितला.
काँग्रेसचा बडा नेता म्हणतो, "नरेंद्र मोदींना सोयरसुतक नाही; नितीन गडकरी पंतप्रधान हवेत"
कोरोना परिस्थितीचा सामना करताना आपल्याला संकटांना तोंड द्यायचं आहे. आपल्याला हा लढा लढायचा आहे असं म्हणताना गडकरींनी १९८० मधील एक आठवण सांगितली. “मी विद्यार्थी परिषदेमधून भाजपमध्ये आलो. १९८० चा कालवधी होता. अटलजी निवडणूक हरले होते. आमच्या पक्षाची परिस्थिती बिकट होती. तेव्हा सर्वजण निराश होते. जनता पार्टीनंतर एवढा मोठा पराभव झाल्यानं अटलजी, अडवाणीजींना काही भविष्य नाही. या पक्षालाही काही भविष्य नाही. हा पक्ष संपला आहे. या पक्षाला काही आधार नाही, अशी टीका करण्यास पत्रकारांनी सुरुवात केली होती,' असं गडकरींनी सांगितलं.
“नितीन गडकरी काय सांगतात, हे त्यांचे बॉस ऐकतायत का?” काँग्रेसची विचारणा
या सर्व परिस्थितीमध्ये मलाही अनेकदा निराशा झाल्यासारखं वाटायचं असंही गडकरी म्हणाले. 'तेव्हा मलाही अनेकदा निराश झाल्यासारखं व्हायचं. लोक म्हणायचे तू चांगला आहेस. पण पक्ष चांगला नसल्याने इथे तुझं भविष्य चांगलं नाही. त्यामुळे तू पक्ष बदल असा सल्ला काहींनी दिला. पण पक्ष आमचा आहे, विचार आमचे आहेत. त्यामुळे पक्षासोबतच राहण्याची भूमिका मी घेतली,' असं गडकरींनी सांगितलं.