जमीन खरेदीपोटी ४३ लाखांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:13 AM2021-08-26T04:13:24+5:302021-08-26T04:13:24+5:30

तिघांविरोधात गुन्हा दाखल बारामती : गडदरवाडी (ता. बारामती) गावच्या हद्दीतील ७२ गुंठे जमिनीच्या व्यवहारापोटी ४३ लाख ५९ ...

43 lakhs for land purchase | जमीन खरेदीपोटी ४३ लाखांची

जमीन खरेदीपोटी ४३ लाखांची

googlenewsNext

तिघांविरोधात गुन्हा दाखल

बारामती : गडदरवाडी (ता. बारामती) गावच्या हद्दीतील ७२ गुंठे जमिनीच्या व्यवहारापोटी ४३ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिकाने शहर पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी याबाबत विजय अनंतराव सावंत (रा. वसंतनगर, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक विठ्ठल महानवर (रा. खंडोबाचीवाडी, ता. बारामती), दिलीप विठ्ठल टेंगले (रा. म्हसोबाचीवाडी, पणदरे, ता. बारामती) व राहुल जगन्नाथ वाकुडे (रा. माळेगाव, ता. बारामती) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्च २०१९ मध्ये टेंगले यांच्या ओळखीने गडदरवाडी येथील अशोक महानवर यांची ७२ गुंठे जमीन खरेदी करण्याचे फिर्यादीने ठरवले. हा व्यवहार १० लाख रुपयांना ठरला. यातील एक लाखाची रक्कम धनादेशाद्वारे महानवर यांचे मेहुणे टेंगले यांच्या नावे देण्यात आली. तर उर्वरित नऊ लाखांची रक्कम धनादेश आणि रोख देण्यात आली. प्रत्यक्षात महानवर यांनी खरेदीखताने केवळ ३२ गुंठे जमीन दिली. जमिनीची नोंद लावण्यासाठी फिर्यादी तलाठ्याकडे गेले असताना अशोक महानवर यांनी चुलते शिवाजी महानवर यांना पाच वर्षे मुदत खरेदीने ही जमीन यापूर्वीच दिली असल्याचे दिसून आले. याबाबत फिर्यादीने विचारणा केली असता त्याने कबुली दिली. राहुल वाकुडे याने जमिनीची नोंद करून देतो, असे आश्वासन फिर्यादीला दिले. प्रत्यक्षात नोंद करून दिलीच नाही. शिवाजी महानवर यांनी खरेदीखत उलटून देण्यासाठी पैशाची मागणी केली. त्या व्यवहारातही फिर्यादीने ६ लाख रुपये भरले. परंतु या जमिनीवर दोन पतसंस्थांचा बोजा असल्याचे दिसून आले. तसेच अशोक याने खासगी देवस्थान ट्रस्टकडूनही या जमिनीवर पैसे घेतल्याचे दिसून आले. या नोंदी कमी करण्यासाठी फिर्यादीने ७ लाख ७५ हजार रुपये दिले. पतसंस्थेचे कर्ज भरण्यासाठीही वेळोवेळी मोठ्या रकमा दिल्या. परंतु आरोपींनी पतसंस्थेचे कर्ज न भरता या रकमा स्वत:साठीच वापरल्या.

उरलेल्या क्षेत्राच्या खरेदीखतासाठी केवळ १लाख ४७ हजार रुपयांचा सरकारी खर्च येत असताना त्यापोटी २ लाख ४५ हजार रुपये घेतले. याशिवाय वाकुडे याने २ लाख ५० हजार रुपये विश्वासाने घेत ते परत केले नाहीत. या प्रकरणात अशोक महानवर याने २७ लाख ४१ हजार, दिलीप टेंगले याला १ लाख, तर राहुल वाकुडे याने १५ लाख १८ हजारांची रक्कम घेत फिर्यादीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: 43 lakhs for land purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.