Maharashtra: वय पूर्ण होण्याआधीच मतदार नोंदणी, राज्यात ६० हजार जणांनी केला अर्ज

By नितीन चौधरी | Published: October 4, 2023 04:37 PM2023-10-04T16:37:05+5:302023-10-04T16:39:01+5:30

राज्यात अशी सर्वाधिक मतदार नोंदणी करण्यात ठाणे जिल्हा आघाडीवर असून नागपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे...

60 thousand people applied for voter registration before reaching the age of majority | Maharashtra: वय पूर्ण होण्याआधीच मतदार नोंदणी, राज्यात ६० हजार जणांनी केला अर्ज

Maharashtra: वय पूर्ण होण्याआधीच मतदार नोंदणी, राज्यात ६० हजार जणांनी केला अर्ज

googlenewsNext

पुणे : राज्यात ५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीपूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण न झालेल्या युवकांना आता आगाऊ मतदार नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा ६० हजार ७४८ जणांचे एक जानेवारीनंतर वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाणार आहे. राज्यात अशी सर्वाधिक मतदार नोंदणी करण्यात ठाणे जिल्हा आघाडीवर असून नागपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पुण्याचा क्रमांक आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार पडताळणीची मोहीम सुरू आहे. यात नवमतदारांच्या नोंदणीसह दुबार व मृत मतदारांची नावे वगळणे, तसेच नाव, पत्ता किंवा फोटोमधील बदल यावर कार्यवाही करण्यात येत आहे. यंदा प्रथमच पुढील वर्षी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना आतापासूनच आगाऊ मतदार नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यांनी आताच आगाऊ नोंदणी केल्यास पुढील वर्षातील चार त्रैमासिकांत त्यांच्या जन्मतारखेनुसार १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. यानुसार राज्यात आतापर्यंत ६० हजार ७४८ जणांनी आगाऊ मतदार नोंदणी केली आहे. सर्वाधिक ६ हजार ३७८ जणांनी ठाणे जिल्ह्यातून नोंदणी केली आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये ४ हजार ४११ तर त्या खालोखाल पुणे जिल्ह्यामध्ये ४ हजार ३६१ जणांनी अशी आगाऊ मतदार नोंदणी केली आहे. सर्वात कमी २७७ जणांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आगाऊ मतदार नोंदणी केली आहे.

जुलै ते सप्टेंबर या त्रैमासिकातील मतदार कार्यवाहीत १८ सप्टेंबरपर्यंत राज्यात ९ लाख ८१ हजार ४६३ मतदारांची वाढ नोंदविण्यात आली. तर दुबार व मृत मतदारांची ४ लाख ६१ हजार ८१४ नावे वगळण्यात आली. त्यामुळे मतदार यादीत एकूण वाढ ५ लाख १९ हजार ६४९ इतकी झाली आहे. यात २ लाख ४० हजार ११९ पुरुष तर २ लाख १९ हजार २९७ महिला व १७३ तृतीयपंथीयांचा समावेश आहे. तर याच काळात ५ लाख ५० हजार ७४ दिव्यांग मतदारांची भर पडली आहे. तसेच ५ हजार ४२५ अनिवासी भारतीयांनी देखील मतदार नोंदणी केली आहे.

अशी आहे आगाऊ मतदार नोंदणी-

नंदुरबार ६५३, धुळे १४४७, जळगाव २४९५, बुलढाणा ११०८, अकोला ८७०, वाशिम ४३३, अमरावती ८६५, वर्धा १२६३, नागपूर ४४११, भंडारा ११२०, गडचिरोली ३६६, चंद्रपूर ८७५, यवतमाळ ११३८, नांदेड २३३८, हिंगोली ९९९, परभणी १४८५, जालना १०९७, छत्रपती संभाजीनगर १७१९, नाशिक १९७५, ठाणे ६३७८, मुंबई उपनगर १४८८, मुंबई शहर ३५५, रायगड १०२१, पुणे ४३६१, नगर २५११, बीड ११९३, लातूर २८३६, धाराशीव ३८७६, सोलापूर २३१३ सातारा ११८८, रत्नागिरी ६२९, सिंधुदुर्ग २७७, कोल्हापूर २०१८, सांगली १५१३, पालघर ५३२ एकूण ६०७४८

राज्यात २७ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे त्यानंतर २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत पुन्हा मतदार नोंदणी केली जाणार आहे व त्याची अंतिम मतदार नोंदणी मतदार यादी ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. आगाऊ मतदार नोंदणीचा पर्याय खुला केल्याने राज्यातून त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

- श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

Web Title: 60 thousand people applied for voter registration before reaching the age of majority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.