काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्याचा काहीच फरक पडला नाही; पंडितांची तीव्र नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 14:54 IST2023-01-08T14:53:59+5:302023-01-08T14:54:08+5:30
राजकीय पदाधिकाऱ्यांकडून काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत असल्याबाबत खोटी माहिती दिली जात असल्याची टीका संघटनेच्या सदस्यांनी केली

काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्याचा काहीच फरक पडला नाही; पंडितांची तीव्र नाराजी
पुणे: काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या सामाजिक किंवा राजकीय स्थितीत आजही कोणताही फरक पडलेला नाही, असा दावा यूथ फॉर पनून काश्मीर या संघटनेच्या वतीने करण्यात आला. सरकारजवळ या पीडित पंडितांच्या पुनर्वसनासाठी कसलीही ठोस योजना नसल्याची टीका त्यांनी केली.
संघटनेच्या काही सदस्यांनी काश्मीरचा दौरा केला. त्याविषयी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सरकार चुकीचे सांगत असल्याचे आम्हाला आढळले असे राहुल कौल याने सांगितले. त्याच्यासमवेत संघटनेचे राहुल भट, सुनील रैना अन्य सदस्य होते. कौल यांनी सांगितले की, या दौऱ्यात अनेक काश्मिरी पंडितांबरोबर संवाद साधण्यात आला. त्यांच्याकडून सरकारविषयी तीव्र नाराजीच आढळली. ३७० कलम रद्द केले असले तरी परिस्थिती मात्र पूर्वी होती तशीच आहे, असे त्यांनी सांगितले असल्याची माहिती संघटनेने पत्रकार परिषदेत दिली.
कौल म्हणाले की, पंतप्रधान पॅकेज योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेच वेतन मागील ५ महिन्यांपासून झालेले नाही. पीडित कुटुंबांच्या तेथील परंपरागत जमिनींच्या नोंदी दिल्या जात नाहीत. सरकारी अधिकारी, तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांकडून काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत असल्याबाबत खोटी माहिती दिली जात असल्याची टीका संघटनेच्या सदस्यांनी केली. संघटनेच्या या दाव्याला काही हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.