वीस लाख मिळाल्यानंतर मुलगा मिळाला सुखरूप
By admin | Published: May 11, 2017 04:21 AM2017-05-11T04:21:54+5:302017-05-11T04:21:54+5:30
: खेड तालुक्यातील सोळू येथील पाचवर्षीय मुलाचे पाच दिवसांपूर्वी पैशांसाठी अपहरण करण्यात आले होते. २० लाखांची खंडणी
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : खेड तालुक्यातील सोळू येथील पाचवर्षीय मुलाचे पाच दिवसांपूर्वी पैशांसाठी अपहरण करण्यात आले होते. २० लाखांची खंडणी मिळाल्यानंतर त्या मुलाला अपहरणकर्त्यांनी मोशी येथे सोडून दिले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, याबाबत मुलाच्या पालकांनी अपहरणानंतर पोलिसांत तक्रार दिली नव्हती. मुलाची सुटका झाल्यानंतर त्याचे पालक पोलिसांत गेले असून आता अपहरणकर्त्यांचा पाोलीस शोध घेत आहेत.
चार - पाच दिवसांपूर्वी सोळू येथील एका सधन कुटुंबातील पाचवर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण झाले होते. मुलाला सुखरूप सोडण्यासाठी मुलाच्या आई-वडिलांकडे अपहरणकर्त्यांनी वीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानुसार कुटुंबीयांनी नातेवाइकांकडून रक्कम गोळा करून अपहरणकर्त्यांच्या सांगण्यानुसार मोशी येथील कांदाचाळ रस्त्यावर आणून ठेवली. मात्र अपहरणकर्ते पैसे घेण्यासाठी समोर आले नाहीत. त्यांनी मोबाईलवरून ‘पैसे ठेवून जा,’ असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने अपहरणकर्त्यांनी मुलाला मोशी येथील मुख्य चौकात सोडून दिले. मुलगा सुखरूप असल्याचे पाहून आई-वडिलांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. घरी आल्यानंतर घडलेल्या प्रकाराची माहिती त्यांनी आळंदी पोलिसांना दिली.