मित्राच्या खूनप्रकरणी फरारीस अटक
By admin | Published: June 29, 2015 11:39 PM2015-06-29T23:39:45+5:302015-06-29T23:39:45+5:30
दीड महिन्यापूर्वी अनैतिक संबंधातून मित्राचा खून करून फरार झालेल्या मुख्य आरोपीला नारायणगाव पोलीसांनी शिताफीने अटक केली आहे़
नारायणगाव : दीड महिन्यापूर्वी अनैतिक संबंधातून मित्राचा खून करून फरार झालेल्या मुख्य आरोपीला नारायणगाव पोलीसांनी शिताफीने अटक केली आहे़ लक्ष्मण तुळशीराम कारंडे यांच्या खून प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे़ या सर्वांना जुन्नर न्यायालयात हजर केले असता जुन्नर न्यायालयाने त्यांना २ जुलै २०१५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली़
लक्ष्मण तुळशिराम कारंडे (वय ४५, मुळ गाव साकुर मांडवा (दरेवाडी) ता़संगमनेर सध्या रा़येडगाव (गणेशनगर) ता. ज़ुन्नर) यांचा खून केल्याप्रकरणात मुख्य आरोपी असलेला पिराजी भाऊ कारंडे (वय ४७) यास नारायणगाव पोलिसांनी सापळा रचून कादंळी येथे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अटक केली़ यापूर्वी नारायणगाव पोलिसांनी २४ जूनला राहुल भिमाजी औटी (वय २३, रा़ साळवाडी, ता. ज़ुन्नर) आणि समीर अशोक कोल्हे (वय २१, रा़ कोल्हेमळा नारायणगाव, ता़ ज़ुन्नर) यांना अटक करण्यात आली होती़
या संदर्भात नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात यांनी सांगितले, की लक्ष्मण तुळशिराम कारंडे यांच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेला पिराजी कारंडे हा गेल्या दीड महिन्यापासून बेपत्ता होता़ त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके पाठविली होती. पिराजी हा साकुर मांडवे येथून भाडयाचे गाडीने वडगाव कांदळी येथे त्याची पत्नी व मुलांना भेटण्यास येणार असल्याची खबर मिळाल्याने नारायणगाव पोलिसांनी आळेफाटा येथे सापळा रचून त्याचा माग काढत पुणे नाशिक महामार्गावरील कादंळी फाटा येथे पोलीस हवालदार आबा चांदगुडे, शंकर भवारी यांनी पिराजी कारंडे यास अटक केली़ या तिघांनी संगनमताने लक्ष्मण तुळशिराम कारंडे यांचा नारायणगावातील कोल्हे मळयाजवळील गायकवाड मळयात डिंभा कालव्याजवळ गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला होता़ त्यावेळी लक्ष्मण हा बेशुध्द झाला होता़ त्याला या तिघांनी गाडीत टाकून जांबूत फाटा मार्गे शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे नेत असताना लक्ष्मण याने थोडी हालचाल केली़ त्यावेळी पिराजी कारंडे याने मफलरच्या साहयाने त्याचा गळा दाबून खून केला व त्याचा मृतदेह कुकडी नदीत फेकून दिला होता़