वाहतूक नियम तोडाल तर खबरदार !
By admin | Published: June 17, 2015 12:45 AM2015-06-17T00:45:11+5:302015-06-17T00:45:11+5:30
रस्त्यावर वाहने उभी करून हॉटेलमध्ये नाश्ता करत बसणे, त्यामुळे रस्त्यात ट्रॅफिक जाम होणे, वेळोवेळी अपघात होणे, वादविवाद होणे हे नित्यातेच झाले आहे.
आव्हाळवाडी : पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली-आव्हाळवाडी फाटा येथे लोणीकंदचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी अवैध पार्किंग, विरुद्ध दिशेने येणारी वाहने, बेशिस्त वाहनचालक यांच्या वर कारवाई केली.
सततच्या वाहतूककोंडीमुळे व वाहनचालकांच्या चुकांमुळे लहान-मोठे अपघात घडतात. वाघोली येथे मोठ्या प्रमाणावर वाहने पार्किंग केल्याने प्रवास करणे जिकिरीचे होत आहे. यावर उपाय म्हणून लोणीकंद पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
रस्त्यावर उभी केलेली वाहने, विरुद्ध दिशेने येणारी वाहने, एका गाडीवर तिघे जण बसणे, लायसन नसणे, बेफाम वेगाने वाहन चालविणारे तरुण अशा अनेक वाहनांवर कारवाई केली. यामुळे बेशिस्त वाहनचालकांना चांगलाच चाप बसणार आहे.
रस्त्यावर कोणीही वाहने लावू नये आणि विरुद्ध दिशेने येऊ नये; असे केल्यास कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. वाहनांवर कारवाई केल्याने वाघोली, पुणे-नगर रस्ता वाहतूककोंडी मुक्त झाला की काय, असा प्रश्न अनेक नागरिकांनी केला. (वार्ताहर)