मैत्रिणीला बांगलादेशातून आणले, तुळशीबागेत एका खोलीत ठेवले, बुधवार पेठेत ३ लाखांत विकले
By नितीश गोवंडे | Updated: April 12, 2025 18:11 IST2025-04-12T18:11:44+5:302025-04-12T18:11:57+5:30
‘तू परदेशी नागरिक आहेस, खोलीबाहेर गेलीस तर, पोलिस तुला पकडतील’ असे तिला सांगितले जात होते

मैत्रिणीला बांगलादेशातून आणले, तुळशीबागेत एका खोलीत ठेवले, बुधवार पेठेत ३ लाखांत विकले
पुणे : बांगलादेशमधून मैत्रिणीसोबत ‘ती’ ७-८ महिन्यांपूर्वी पुण्यात आली. मैत्रिणीने भोसरी येथे काही दिवस तिला आपल्या सोबत ठेवले. आठ ते दहा दिवस तिला पुण्यात फिरवले. त्यानंतर तुळशीबाग परिसरातील एका खोलीत तिला नेऊन ठेवले. काही दिवसांनी बुधवार पेठेत तिची विक्री करून मैत्रिणीने बांगलादेशात पळ काढला. तीने काही दिवसांपूर्वी तेथून पळ काढत हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
हडपसर पोलिसांनी ‘शून्य’ ने गुन्हा दाखल करत तो फरासखाना पोलिसांकडे वर्ग केला. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेला अटक केली असून उर्वरीत २-३ जणींचा पोलिस शोध घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्ष ३ महिन्यांची एक अल्पवयीन मुलगी तिच्या सुमय्या नामक मैत्रिणीसोबत बांगलादेश येथून पुण्यात आली. मैत्रिणीने तिला काही दिवस सोबत ठेवून तिची ३ लाखांत विक्री केल्याचे पीडिता सांगत आहे. सुरूवातीला तुळशीबाग परिसरात त्यानंतर बुधवार पेठेतील एका रूममध्ये तिला डांबून ठेवण्यात आले होते. तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले जात होते. पीडितेला आरोपी महिलांनी पोलिसांची धमकी दिली. ‘तू परदेशी नागरिक आहेस, खोलीबाहेर गेलीस तर, पोलिस तुला पकडतील’ असे तिला सांगितले जात होते. २ एप्रिल रोजी पीडितेने बुधवार पेठेतून पळ काढला. त्यानंतर ती शहरात घाबरून फिरत होती. अखेर पीडितेने हिंमत करत हडपसर पोलिस ठाणे गाठले. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शून्य ने गुन्हा दाखल करून तो आधी विश्रामबाग आणि नंतर फरासखाना पोलिसांकडे वर्ग केला. फरासखाना पोलिसांनी लगेचच पीडितेने दिलेल्या माहितीनुसार तिला ज्याठिकाणी डांबून ठेवले होते, तेथे जात एका महिलेला अटक केली. तसेच पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून एकूण ४ ते ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उर्वरीत आरोपींचा
पोलिस शोध घेत आहेत. आरोपींनी आणखी कुणा मुलीची अशाप्रकारे विक्री केली आहे का? याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे शहरात मानव तस्करीचे प्रकार होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.