बॉम्बस्फोटांच्या ५ वर्षांनंतरही तारीख पे तारीख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:05 AM2017-08-01T04:05:10+5:302017-08-01T04:05:10+5:30

पुण्याला हादरवून सोडणा-या जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना मंगळवारी ५ वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या ५ वर्षांत न्यायालयामध्ये केवळ तारखा पडण्यापलीकडे या खटल्याची प्रगती होऊ शकलेली नाही.

Date date after 5 years of the bomb blasts | बॉम्बस्फोटांच्या ५ वर्षांनंतरही तारीख पे तारीख

बॉम्बस्फोटांच्या ५ वर्षांनंतरही तारीख पे तारीख

Next

लक्ष्मण मोरे ।
पुणे : पुण्याला हादरवून सोडणा-या जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना मंगळवारी ५ वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या ५ वर्षांत न्यायालयामध्ये केवळ तारखा पडण्यापलीकडे या खटल्याची प्रगती होऊ शकलेली नाही. इंडियन मुजाहिदीनच्या (आयएम) १३ दहशतवाद्यांचा या कटात सहभाग होता. यातील ९ जणांना अटक करण्यात आली होती. सध्या तीन जण जामिनावर आहेत, तर एका आरोपीला अटक होणे बाकी आहे. रियाज भटकळ, इकबाल भटकळ आणि फय्याज कागजी अद्यापही या गुन्ह्यात फरार आहेत.
आयएमचा दहशतवादी कतिल सिद्दिकी याच्या येरवडा कारागृहामध्ये झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी लष्करे-तैयबाचा फय्याज कागझी आणि इंडियन मुजाहिदीनच्या रियाज भटकळच्या इशाºयावरून पुण्यात बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचण्यात आला होता. २००६मध्ये दहशतवादी इरफान मुश्ताक लांडगे (वय ३२, रा. अहमदनगर), असद खान जमशेदखान (वय ३३, रा. औरंगाबाद) हे स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशनचे कार्यकर्ते औरंगाबादमध्ये एकत्र आले. समविचारी आणि जिहाद करण्यासाठी तयार असलेल्या तरुणांना त्यांनी तेव्हापासूनच एकत्र करायला सुरुवात केली. २००९मध्ये संशयित आरीफ अमिल ऊर्फ काशिफ सय्यद जफरुद्दीन बियाबनी (गणेश कॉलनी, व्हीआयपी रोड, औरंगाबाद) आणि फिरोज ऊर्फ हमजा अब्दुल हमीद सय्यद (वय ३८, रा. शुक्रवार पेठ, पुणे) हे या ग्रुपमध्ये सामील झाले. त्यानंतर ५ जणांनी सौदी अरेबियामध्ये जाऊन ‘लष्करे-तैयबा’चा आॅपरेटिव्ह असलेल्या कागझीची भेट घेतली होती. भारतात परतल्यावर त्यांनी कागझीसोबत फोन आणि इंटरनेटद्वारे संपर्क कायम ठेवला. कागझीने इंडियन मुजाहिदीनच्या रियाज भटकळचा ई-मेल आयडीही दहशतवादी कारवायांसाठी त्यांना दिला होता. त्यानंतर रियाजने या सर्वांना ‘स्पेशल टास्क’ दिले होते. यासाठी असद खान याला प्रमुख नेमून हल्ल्याच्या योजनेचे निरीक्षण आणि हवालाच्या पैशांसंदर्भातील काम त्याच्याकडे देण्यात आले होते. तर, इम्रान खान वाजीद पठाण (नांदेड) याला इरफान आणि फिरोजच्या मदतीला देण्यात आले होते. बियाबानी हा सर्वांना जिहादी साहित्य आणि साहित्य पुरविण्याचे काम करीत होता.
श्रीरामपूरच्या अस्लम शब्बीर शेख ऊर्फ बंटी जहागीरदार (वय ४०, रा. मदिना मशिदीजवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) याने शस्त्र पुरविण्याची जबाबदारी उचलली होत. फारूख शौकत बागवान (वय ३२, रा. औरंगाबाद) याच्याकडे बनावट कागदपत्रे तयार करण्याची आणि मुनीब मेननकडे सीम कार्ड खरेदी करण्याची जबाबदारी होती.
एप्रिल २०१२मध्ये इरफान आणि फिरोज यांनी कबीर देशमुख या बनावट नावाने संगमनेर रस्त्यावरील लोणी येथे एक खोली भाड्याने घेतली. शाकीर ऊर्फ असादुल्लाह अख्तर आणि अहमद ऊर्फ वकास हे दोघे या खोलीमध्ये राहत होते. जहागीरदारकडून इरफानने एक पिस्तुल आणि ३ काडतुसे मिळवली होती. रियाजने येरवडा कारागृह, शिवाजीनगर न्यायालय किंवा कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या घराजवळ बॉम्बस्फोट घडवून कतिलच्या खुनाचा बदला घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी हवालामार्फत ३ लाख रुपये पाठविले होते.
८ जुलै २०१२ रोजी सर्वांनी फिरोजच्या लष्कर परिसरातील ‘आॅप्शन्स बाय फिरोज’ या कापड दुकानामध्ये बैठक घेतली. बनावट नावाने सीम कार्ड खरेदी करणे आणि बॉम्ब तयार करण्यासाठी पुण्याजवळ खोली भाड्याने घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. १० जुलैला फिरोज आणि इरफानने कासारवाडीतील केशवनगरमध्ये एक खोली भाड्याने घेतली. १८ जुलैला अहमद आणि असादुल्लाह अख्तर आणि वकास हे दोघेही लोणीहून या खोलीवर आले. त्यांनी ३ तयार बॉम्ब (आयईडी) सोबत आणले होते. २३ जुलैला त्यांनी आणखी ३ आयईडी तयार केले. २४ जुलै रोजी या दहशतवाद्यांनी मुंबईतील बांद्रा, सांताक्रूझ, जुहू, अंधेरी आणि जोगेश्वरीमध्ये रेकी केली. २९ आणि ३० जुलैला रियाजने पुण्यातच बॉम्बस्फोट करण्याचे निश्चित केल्यावर फिरोजने जंगली महाराज रस्ताच स्फोटांसाठी योग्य असल्याचे सुचविले.
१ आॅगस्ट २०१२ रोजी फिरोज, वकास आणि असादुल्लाह यांनी कसबा पेठेतील दुकानातून कॅरिअर असलेल्या ३ सायकली खरेदी केल्या. या ३ सायकलींमध्ये ३ बॉम्ब पेरण्यात आले. जंगली महाराज रस्त्यावरील ६ ठिकाणांवर ३ सायकली उभ्या करून आरोपी पसार झाले होते. यातील पहिला बॉम्ब बालगंधर्व रंगमदिराच्या गेटजवळ संध्याकाळी साडेसातच्या सुमारास फुटला.
यामध्ये दयानंद पाटील नावाचा तरुण जखमी झाला होता. त्यानंतर ४ बॉम्बचे एकामागे एक स्फोट झाले, तर सहावा बॉम्ब बीडीडीएसने निकामी केला. बॉम्बस्फोट घडविण्यासाठी अमोनियम नायटेÑट आणि पेट्रोलियम हायड्रोकार्बन सॉफ्ट वॅक्स मिक्श्चरचा वापर करण्यात आला होता.
दरम्यान, असद, इमरान आणि मुनीर यांनीही जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आतापर्यंत न्यायालयामध्ये केवळ तारखांवर तारखा पडत आहेत. मात्र, प्रत्यक्ष सुनावनीला अद्याप सुरुवात झालेली नाही.

Web Title: Date date after 5 years of the bomb blasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.