महापालिका निवडणुका एकत्रित की स्वबळावर? सुनील तटकरे यांनी दिल उत्तर..
By नितीन चौधरी | Updated: February 8, 2025 19:13 IST2025-02-08T19:12:15+5:302025-02-08T19:13:59+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत परिस्थितीनुसार निर्णय; सुनील तटकरे यांची माहिती

महापालिका निवडणुका एकत्रित की स्वबळावर? सुनील तटकरे यांनी दिल उत्तर..
पुणे : महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रित की स्वबळावर लढायच्या हे त्या-त्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अप) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केली. राज्यात पक्षाची ताकद वाढत आहे. काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. मात्र, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या त्या संदर्भात बैठकाही होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या इतर मागासवर्ग (ओबीसी) व सामाजिक न्याय विभाग यांच्या राज्यस्तरीय बैठक पुण्यात पार पडली. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस व आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, महेश शिंदे, शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आखाडे उपस्थित होते.
ते म्हणाले, महायुतीतील घटक पक्ष म्हणून जबाबदारीचे भान ठेवत पक्ष विस्तार आणि पक्ष संघटन मजबूत करण्यावर आमचा भर राहणार आहे. महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्ष प्रवेश होणार आहे. त्यामध्ये मराठवाडा, कोकण, मुंबई आणि विदर्भातील नेत्यांचा समावेश आहे. काही महत्त्वाच्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम त्यांच्या जिल्ह्यात जाऊन करणार आहोत. प्रदेशाध्यक्ष म्हणून लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहोत. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचाही महाराष्ट्राचा दौरा निश्चित केला जाणार आहे. शिवजयंतीनिमित्त राज्यभर स्वराज्य सप्ताहाचे, तर मराठी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.
राजकीय दृष्ट्या अडचणीत आलेल्या अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणात तीन प्रकारच्या चौकशा सुरू आहे. त्यातून दोषी समोर येतील. दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हे शोधून काढून त्यालाही शिक्षा झाली पाहिजे, अशीच भूमिका आपण सातत्याने मांडली आहे. मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सक्षम आहेत.