पैशांमुळे नव्हे तर ‘या’ कारणामुळे नातेवाईकांना ससूनला जाण्याचा सल्ला दिलेला; दीनानाथच्या अहवालात दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:24 IST2025-04-04T17:23:47+5:302025-04-04T17:24:43+5:30
दीनानाथ रुग्णालयाच्या समितीच्या अहवालात महत्त्वाचा खुलासा

पैशांमुळे नव्हे तर ‘या’ कारणामुळे नातेवाईकांना ससूनला जाण्याचा सल्ला दिलेला; दीनानाथच्या अहवालात दावा
पुणे : शहरातील एका नामांकित रुग्णालयाच्या पैशाच्या हव्यासाने एका गर्भवती तरुणीला जीव गमावावा लागला असल्याची धक्कादायक घटना सुसंस्कृत पुण्यात घडली आहे. पैशांअभावी गर्भवतीला वेळीच उपचार मिळाले नाही. हॉस्पिटलने गेटवरूनच परत पाठविल्याने ऐन वेळी ॲम्ब्युलन्सही मिळाली नाही. तीव्र प्रसूती वेदना होत असताना वेळीच खाजगी गाडीने २५ किलोमीटवरील रुग्णालयात गर्भवतीला नेण्यात आलं. तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला मात्र वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली.
तनिषा भिसे यांना प्रसूतीपूर्व वेदना सुरू झाल्याने त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्याआधी २० लाख रुपयांचा खर्च सांगितला आणि त्यातील १० लाख रुपये तातडीने भरण्याची अट घातली. कुटुंबीयांनी तत्काळ ३ लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली, तसेच उर्वरित रक्कम काही वेळाने भरण्याचं आश्वासन दिलं. मात्र, रुग्णालयाने पूर्ण रक्कम भरण्याच्या मागणीवर ठाम राहत, आर्थिक ऐपत नसेल तर ससून रुग्णालयात जावं, असा सल्ला दिला. असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला होता. यावर आज दीनानाथ रुग्णालयाने अहवाल सादर करत आपली बाजू मांडली आहे. या अहवालात २८ मार्च च्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले याबद्दल डॉ. घैसास व रुग्णालय प्रशासन यांना काहीच कल्पना नव्हती.असेही स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णालयाची बदनामी करण्यात आल्याचा आरोपही रुग्णालयाने केला आहे. डॉक्टर घैसास ह्यांना असे वाटत होते की रुग्ण पैश्याची तजवीज करत आहे. तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून आईची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व होणाऱ्या अपुऱ्या वाढीच्या गर्भाची शुश्रूषा ससून येतील NICU मध्ये व्यवस्थित होईल. असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
दीनानाथ रुग्णालयाने अहवाल लिहिले आहे की,' २८ मार्च २०२५ शुक्रवार रोजी सकाळी ११.३० वाजता सदर रुग्ण, पती व नातेवाईक डॉक्टर घैसास यांच्या बाह्यरुग्ण विभागात आले. ते Emergency किंवा Labour Room मध्ये आले नव्हते, याची कृपया नोंद घ्यावी. डॉक्टर घैसास यांनी तिची तपासणी केली. ती पूर्णपणे नॉर्मल होती व तिला कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती. परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेता observation साठी भरती होण्याचा सल्ला दिला. त्याच बरोबर pregnancy a caesarean section मधील धोक्याची माहिती देण्यात आली. तसेच नवजात अर्भक कक्षाच्या (NICU) डॉक्टरांशी त्यांची भेट करून देण्यात आली. कमी वजनाची, ७ महिन्याची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी २ ते २.५ महिने NICU चे उपचार लागतील हे समजावून सांगितले व रुपये १० ते २० लाख खर्च एकंदर येऊ शकतो याची कल्पना देण्यात आली. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या व मी प्रयत्न करतो असे सांगितले.
रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला व आपली अडचण सांगितली. त्यावर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा (नातेवाईकांप्रमाणे रुपये २ ते २.५ लाख), म्हणजे मी डॉक्टर घैसास यांना सांगतो, असे सांगितले.
असाच सल्ला एका दूरच्या नातेवाईकांना श्री सचिन व्यवहारे यांनी फोनवर दिला. रुग्णाचा कोणीही नातेवाईक प्रशासन अथवा चॅरिटी डिपार्टमेंट इथे प्रत्यक्ष भेटला नाही याची कृपया नोंद घ्यावी. जेव्हा डॉक्टर केळकर यांचे ऑपेरेशन संपले व त्यांनी डॉक्टर घैसास यांना फोन केला तेव्हा त्यांनी रुग्ण न सांगता निघून गेल्याचे कळवले.
डॉक्टर घैसास ह्यांना असे वाटत होते की रुग्ण पैश्याची तजवीज करत आहे. तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून आईची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व होणाऱ्या अपुऱ्या वाढीच्या गर्भाची शुश्रूषा ससून येतील NICU मध्ये व्यवस्थित होईल. दरम्यानच्या काळात एका नर्सने रुग्ण /नातेवाईक आपली बॅग उचलून चालत गेल्याचे सांगितले. थोड्या वेळाने रुग्णाच्या नातेवाईकांकडून काहीच हालचाल न झाल्याने डॉ. घैसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन केला, तो त्यांनी उचलला नाही. त्यामुळे २८ मार्च च्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले याबद्दल डॉ. घैसास व रुग्णालय प्रशासन यांना काहीच कल्पना नव्हती.
यानंतर एका वृत्तपत्रातमध्ये आलेल्या बातमीनंतर सर्वांना कळले की रुग्णाचा सिझेरियनमध्ये झालेल्या गुंतागुंती मुळे मृत्यू झाला. वृत्तपत्रातील माहिती प्रमाणे, २८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता सूर्या हॉस्पिटल वाकड येथे भरती झाली व २९ मार्च राजी सकाळी सिझेरियन झाले. दीनानाथमधून सदर रुग्ण ससून व तिथून सूर्या हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या गाडीने गेला व सिझेरियन सुद्धा दुसऱ्या दिवशी झाले ह्याची नोंद घ्यावी. तसेच सूर्या हॉस्पिटल मधील माहितीनुसार आधीच्या operation ची व कॅन्सर संबंधीची व तिच्या नातेवाईकांनी माहिती लपवून ठेवली असे समजते.'
सदर चौकशांती व रुग्णालयातील इतर सीनियर च्या ओपिनियन नुसार आमच्या समितीचा निष्कर्ष खालील प्रमाणे...
-सदर रुग्णासाठी Twin Pregnancy धोकादायक होती.
-माहितीचे रुग्णालय असून सुद्धा ANC चेकप पहिले सहा महिने रुग्णालयात आल्या नाहीत.
-आडवांस मागितल्याचा रागातून सदर तक्रार केलेली दिसते.
-रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मानले नाही तसे वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पण त्यांनी पाळला नाही.
- रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा व ॲडव्हान्स मागितल्यामुळे आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारे तक्रार करण्यात आली आहे असे समितीचे मत आहे.