असुरक्षित ऊसवाहतुकीकडे डोळेझाक

By admin | Published: February 28, 2015 02:20 AM2015-02-28T02:20:59+5:302015-02-28T02:20:59+5:30

ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ट्रक जात असल्यास प्रमाणाहून अधिक भरलेला ऊस कधीही ढासळणे, तोल गेल्याने संपूर्ण ट्रॅक्टर पलटी होण्याचे प्रकार सध्या

Disadvantages to unprotected cannibalism | असुरक्षित ऊसवाहतुकीकडे डोळेझाक

असुरक्षित ऊसवाहतुकीकडे डोळेझाक

Next

अंकुश जगताप, पिंपरी
ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ट्रक जात असल्यास प्रमाणाहून अधिक भरलेला ऊस कधीही ढासळणे, तोल गेल्याने संपूर्ण ट्रॅक्टर पलटी होण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. परिणामी ट्रॅक्टर, ट्रकपासून इतरांना जीव मुठीत घेऊनच मार्ग काढण्याची वेळ येत आहे. वाहतूक नियम धाब्यावर बसवून चालकांकडून बेदरकारपणे ऊसवाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडूनही याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याचे उघड झाले आहे. मोठी दुर्घटना झाल्यावरच जाग येणार का, असा प्रश्न चालकांमधून उपस्थित होत आहे.
परिसरामध्ये श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यासह लगतच्या इतर साखर कारखान्यांसाठी कार्यक्षेत्रातील मावळ, मुळशी, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर आदी तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या उसाचा पुरवठा केला जातो. हा ऊस नेताना संबंधित वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. मोटार व्हेईकल अ‍ॅक्टनुसार ट्रॅक्टर ते ट्रॉलीची लांबी १८ मीटर ठेवणे बंधनकारक असताना दोन ट्रॉली जोडण्याचा धोका पत्करला जात आहे. ट्रॉली व ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जादा ऊस लादला जात आहे. त्यामुळे अ‍ॅक्सल, पाटे तुटणे, चाक निखळण्याचे प्रकार होतात. ऊस बाहेर पडू नये यासाठी ट्रॉलीला बाजूने जोडावयाच्या लोखंडी डांबांचा अभाव दिसतो. तात्पुरते लाकडी खांब लावून ऊस रचला जात आहे. त्यामुळे हादरे बसून ढिला झालेला ऊस बहुधा रस्त्यावर ढासळतो. अनेकदा ऊस एका बाजूला कलल्यामुळे (विशेषत: चढणीच्या, खड्डेमय रस्त्यांवर) ट्रॅक्टर पलटी होण्याचे प्रकार वाढत आहे. त्यातच ट्रॅक्टरला एकामागे एक जोडलेल्या ट्रॉलीला मागील बाजूस इंडिकेटर नसतात. एखाद्या वळणावर, महामार्गावर ट्रॅक्टर अचानक वळविला जातो. अशा वेळी काहीच न कळल्याने मागून येणाऱ्यांना अपघाताचा धोका नित्याचा झाला आहे. याकडे वाहतूक पोलीस, तसेच परिवहन प्रशासनाने आजवर गांभीर्याने पाहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी ही वाहने रस्त्यावरून धोक्याची घंटा वाजवीत बिनदिक्कत धावत आहेत. अशा वाहनचालकांसाठी खास प्रशिक्षण देणे, वेळोवेळी मार्गदर्शनपर व्याख्यानांच्या आयोजनाबरोबरच प्रसंगी दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. देशभरातील रस्तेवाहतूक सुरक्षा मोहीम यशस्वी ठरण्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसानही होणार नाही असा सुवर्णमध्य साधत मार्ग काढण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Disadvantages to unprotected cannibalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.