निवडणुका असल्या तरी दहावी- बारावीचा निकाल वेळेत जाहीर करू; राज्यमंडळाचे स्पष्टीकरण
By प्रशांत बिडवे | Updated: February 29, 2024 17:43 IST2024-02-29T17:42:43+5:302024-02-29T17:43:54+5:30
निवडणुकीसाठीचे प्रशिक्षण कालावधी काही तासांपुरताच असताे ते उरकून उर्वरित वेळेत शिक्षक पेपर तपासणीचे काम करू शकतात

संग्रहित छायाचित्र
पुणे: राज्यात शिक्षकांना लाेकसभा निवडणुकीची कामे दिली जातात. मात्र, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परीक्षेचे कामकाज तसेच उत्तरपत्रिका तपासणीवर काेणताही परिणाम हाेणार नाही. राज्य मंडळ समर्थ असून आम्ही दहावी- बारावीचा निकाल वेळेत जाहीर करू असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी स्पष्ट केले.
गाेसावी म्हणाले, देशात प्रत्येक पाच वर्षांनी निवडणूक हाेतात तसेच दरवर्षी परीक्षाही हाेत असतात. शिक्षकांना निवडणूकीची कामे असली तरी ते दिवसभरातील विशिष्ट कालावधीत पूर्ण करता येतात. आचारसंहिता लागण्यापूर्वी परीक्षेचे बहुतेक कामकाज पूर्ण हाेईल. निवडणूकीपूर्वी सुरूवातीस महसूल विभागाच्या बैठका हाेतात. परीक्षेचे कामकाज पाहून शिक्षक त्यामध्ये सहभागी हाेऊ शकतात तसेच परीक्षेच्या काळात वर्गावर पर्यायी व्यवस्था केली जाते. निवडणुकीसाठीचे प्रशिक्षण कालावधी काही तासांपुरताच असताे ते उरकून उर्वरित वेळेत शिक्षक पेपर तपासणीचे काम करू शकतात. निवडणूक आणि परीक्षा वेगवेगळे भाग आहेत. एसएससी बाेर्डाचा निकाल वेळेतच लागेल.