निवडणुकीचं तंत्रच ठरणार महत्त्वाचं

By admin | Published: December 26, 2016 03:58 AM2016-12-26T03:58:46+5:302016-12-26T03:58:46+5:30

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष तसेच उमेदवारांकडून निवडणुकीच्या तंत्राचा कितपत योग्य व प्रभावी वापर

It will be important for elections | निवडणुकीचं तंत्रच ठरणार महत्त्वाचं

निवडणुकीचं तंत्रच ठरणार महत्त्वाचं

Next

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष तसेच उमेदवारांकडून निवडणुकीच्या तंत्राचा कितपत योग्य व प्रभावी वापर केला जातो, यावर विजयाची संपूर्ण गणिते अवलंबून असणार आहेत.
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसांमध्ये लागू होऊन निवडणूक प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात होणार आहे. त्यानंतर महिनाभरातच इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकीचे अर्ज भरणे, माघार, प्रचार, मतदान आणि निवडणुकीचे निकाल आदी कार्यक्रम पार पडतील. निवडणुकीत विजय मिळवायचाच या त्वेषाने सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. निवडणुकांची ही तयारी वर्षभर अगोदरपासूनच सुरू झाली आहे. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मोठमोठी भूमिपूजने, उद्घाटने, आश्वासने यांचा पाऊस पडू लागलेला आहे. मात्र या सगळ्या कोलाहालात शहराच्या पातळीवर ज्या राजकीय पक्षाचं आणि प्रभागाच्या पातळीवर ज्या उमेदवाराचं निवडणूक तंत्र अधिक प्रभावी ठरेल त्याच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडणार, हे निश्चित आहे.
निवडणुका लढविणे हे एक शास्त्रशुद्ध तंत्र आहे. गेल्या काही वर्षांतील निवडणुकांचा अभ्यास केला असता प्रभावी निवडणूक तंत्राचा वापर करणाऱ्या राजकीय पक्षालाच यश मिळाल्याचे दिसून येत आहे.
लोकसभेच्या २०१४मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी व भाजपाच्या विजयाचे रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर हे नाव देशभर चर्चेत आले. त्यानंतर बिहारमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदावर बसविले. निवडणुकीसाठी उमेदवाराची इमेज बिल्डिंग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, धारणानिर्मिती ही खूप महत्त्वाची असल्याचे किशोर यांनी दाखवून दिले आहे.
सध्या कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान करायचे या द्विधा मन:स्थितीमध्ये असलेल्या मतदारांचे मत निश्चित करण्यात सोशल नेटवर्किंग साईट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. प्रचंड वेगाने आणि प्रभावी पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल नेटवर्किंगसारखे दुसरे माध्यम नाही. लहान-मोठा मजकूर, छायाचित्रे, आॅडिओ-व्हिडिओ एका क्षणात हजारो मतदारांच्या मोबाईलवर पोहोचविता येतात, ते संदेश जर मनाला पटणारे व खूपच प्रभावी असतील तर पुढच्या काही क्षणातच ते वेगाने ‘व्हायरल’ होतात. त्यामुळे सोशल मीडियावरील प्रचार हे एक प्रमुख तंत्र आहे.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने ७०पैकी ६७ जागा जिंकत एक इतिहास निर्माण केला आहे. विशेष म्हणजे त्या निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘आप’ला दिल्लीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतरही पाय रोवून उभे राहात आपने प्रचंड यश मिळविले. त्यांच्या संपूर्ण यशाचे गमक हे केवळ त्यांनी अवलंबलेले निवडणूक तंत्र हेच आहे. त्या वेळी दिल्लीच्या प्रत्येक मतदारसंघांमध्ये घरोघरी, दुकानांमध्ये, टपऱ्यांवर जाऊन ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्यासाठी सूक्ष्म पातळीवर तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची (भाडोत्री किंवा पैसे देऊन आणलेल्या माणसांची नव्हे) यंत्रणा उभी केली. कार्यकर्ते घरोघरी गेल्यानंतर मिळणारे फिडबॅक एकत्र करून त्यानुसार प्रचाराच्या पद्धतीमध्ये सातत्याने बदल केले. हे दुसरे महत्त्वाचे तंत्र आहे.
आपचा जाहीरनामा तयार करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात लोकांच्या बैठका, कॉर्नर सभा घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये लोकांनी मांडलेल्या प्रस्तावांचा समावेश पक्षाच्या जाहीरनाम्यात केला गेला. हा प्रयोग अत्यंत परिणामकारक ठरला. तो पुढे ‘दिल्ली डायलॉग’ या नावाने प्रसिद्ध झाला. आपच्या कार्यकर्त्यांनी लाखो मतदारांना थेट फोन कॉल्स करून त्यांना गळ घातली. प्रमुख चौक, रस्ते, गल्लीबोळ यातून नियोजनबद्ध रॅली काढल्या. यातूनच आपला मोठे यश मिळू शकले.
महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदाचे निकाल तर अवघ्या काही मतांमुळे बदलात, हे यापूर्वीच्या निकालांवरून अनेक वेळा दिसून आले आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा एक परंपरागत मतदार असतो, या मतदाराच्या मतामध्ये क्वचितच बदल होतो. त्यानंतर प्रभागातील स्थानिक उमेदवाराचे त्या भागातील नागरिकांशी असलेला जनसंपर्क, मैत्रीसंबंध व नातेसंबंध महत्त्वाचे ठरतात. यातून उरलेल्या मतदारांकडून अजून कोणाला मत द्यायचे ते निश्चित झालेले नसते. तो बहुदा नवमतदार असतो तसेच तो प्रौढ किंवा वयस्कर मतदारही असू शकतो. यांचे मत खूपच अस्थिर असून निवडणुकांनुसार बदलत राहते. हा मतदार ज्या पक्षाकडे, ज्या उमेदवाराकडे वळेल त्यांचा विजय सोपा होतो. या मतदाराला आपल्याकडे वळविणे हेच राजकीय पक्षांसमोरील आव्हान असणार आहे - दीपक जाधव

Web Title: It will be important for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.