Kasba Bypoll Result, BJP: कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला 'जोर का झटका'! जाणून घ्या पराभवामागची ५ कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 01:59 PM2023-03-02T13:59:42+5:302023-03-02T14:01:12+5:30

गेल्या ३० वर्षांपासून कसब्यात होती भाजपाची सत्ता

Kasba Bypoll results BJP Hemant Rasane lost to Mahavikas Aghadi Ravindra Dhangekar know 5 reasons behind BJP loss in Kasba Pune | Kasba Bypoll Result, BJP: कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला 'जोर का झटका'! जाणून घ्या पराभवामागची ५ कारणं

Kasba Bypoll Result, BJP: कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला 'जोर का झटका'! जाणून घ्या पराभवामागची ५ कारणं

googlenewsNext

Kasba Bypoll Result, Pune BJP: महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अनपेक्षित विजय झाला. कसब्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव केला. कसबा विधानसभा मतदारसंघात मुक्ता टिळक हा आमदार होत्या. त्यांचे काही दिवसांपूर्वी कर्करोगाशी झुंज देताना निधन झाले. त्यानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष होते. त्यात भाजपाच्या पदरी अखेर निराशा आली. गेली ३० वर्षे या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व होते, पण यावेळी मात्र त्यांचा पराभव झाला. यापूर्वी १९९१ पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळाला होता. रविंद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत. जाणून घेऊया भाजपाच्या पराभवाची पाच महत्त्वाची कारणे- 

भाजपाच्या पराभवाची पाच कारणं...

१. रविंद्र धंगेकर स्ट्राँग आणि लोकप्रिय उमेदवार- भाजपाच्या ताब्यात असलेला कसब्याचा गड अखेर काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांनी काबीज केला. रविंद्र धंगेकर हे स्वत: पहिल्यापासूनच एक अतिशय सामर्थ्यवान आणि लोकप्रिय असे उमेदवार मानले जात होते. रविंद्र धंगेकर यांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख होती. मनसेमध्ये अनेक महत्वाची पदे भूषवलेले रविंद्र धंगेकर कसब्यात मागील २५ वर्षांपासून नगरसेवक होते. 'जनतेतला माणूस' या ओळखीचा त्यांना फायदा झाला आणि त्यामुळेच त्यांना आताही पाठिंबा मिळाला. नगरसेवक असताना कधीही मदतीला धावून जाणारे अशी त्यांची ओळख असल्याने ते या निवडणुकीत 'फेव्हरिट' होते. रवींद्र धंगेकर यांनी यापूर्वी दोन वेळा निवडणूक लढवली होती. त्यामुळे विरोधकांचे पुढचे उमेद्वार धंगेकर असणार, याचा भाजपला अंदाज होता. धंगेकर हे अत्यंत तगडे, लोकप्रिय उमेद्वार आहेत, हे भाजपलाही ठाऊक होते.

२. महाविकास आघाडी एकत्र लढली- पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड अशा दोन पोटनिवडणुकांचे निकाल एकाच दिवशी समोर आले. त्यातील कसबाचा महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली तर दुसरीकडे पिंपरीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला. पिंपरीत भाजपाच्या उमेदवाराला मिळालेल्या मतापेक्षा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि बंडखोर यांना मिळालेल्या मतांची बेरीज जास्त असल्याचे विश्लेषण विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केले. तसेच, पुढच्या वेळी बंडखोरी होऊ न देण्याची काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले. कसब्यात हाच फॅक्टर महाविकास आघाडीसाठी फायद्याचा ठरला. भाजपाला थेट महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्रितपणे येऊन भिडले. याऊलट भाजपचे दिग्गज नेते या निवडणुकीत उतरले हे खरे, पण त्यांची सरबराई करण्यातच कार्यकर्ते आणि नगरसेवकांचा वेळ गेला. त्यामुळे घरोघरी जाऊन प्रचार झाला नसल्याचे चित्र दिसले. त्यामुळेच, बड्या नेत्यांना प्रचाराला उतरवूनही या विभागात भाजपाचा पराभव झाला. 

३. दुरंगी लढत झाल्याचा भाजपला फटका- भाजपाचा कसब्यातील आतापर्यंतचा इतिहास पाहता, भाजपाकडे गेली ३० वर्षे हा गड होता. कसब्यात गेली २५ वर्षे गिरीष बापट हे आमदार म्हणून निवडून येत होते, तर गेल्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांना आमदारकीचे तिकीट देण्यात आले होते. या साऱ्या बाबतीत महत्त्वाची बाब ठरली ती भाजपा विरूद्ध महाविकास आघाडी हे थेट लढत. एका आकडेवारीनुसार, ब्राह्मण मतांची टक्केवारी निव्वळ 13% असतानाही कसब्यात आमदार ब्राह्मण राहिलेत. गिरीश बापट यांनी अठरापगड समाजाला सोबत घेऊन काम केले. नंतर मुक्ता टिळकांना तिकीट मिळाले असले तरी नियोजनात बापटांचा मोठा वाटा होता. पण मुक्ताताई टिळक या २८ हजार मतांनी म्हणजेच २० टक्के मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. त्याआधी २००९ ला गिरीश बापट हे अवघ्या पाच टक्के मतांनी निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यावेळच्या मनसेच्या रवींद्र धंगेकरांना तब्बल ३० टक्के म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. यानंतरच्या निवडणुकीत २०१४ लाही बापट जिंकले. त्यांचे मताधिक्य २० टक्क्यावर होते. पण बापटांना एकूण ४३ टक्के मते मिळाली होती आणि विरोधातल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेना यांच्या उमेदवारांच्या मतांची गोळाबेरीज ५० टक्क्यांवर जात होती. याच पॅटर्न लक्षात घेत, महाविकास आघाडीने येथे दुरंगी लढत केली आणि त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला झाला. त्यातच आजारी गिरीश बापट यांना प्रचारात आणले, पण उमेदवार ठरवताना त्यांना विश्वासात घेतले गेले नाही, अशीही चर्चा होती.

४. भाजपकडे लोकप्रिय चेहराच नव्हता- गेली ३० वर्षे जो विभाग भाजपाच्या ताब्यात आहे, तेथे भाजपाने गिरीष बापटांनंतर पुण्याचे महापौरपद भूषवण्याचा अनुभव असलेल्या मुक्ता टिळक यांना गेल्या वेळी मैदानात उतरवले होते. बापट आणि त्यानंतर टिळक हे दोनही चेहरे पुण्याच्या आणि कसब्याच्या लोकांच्या परिचयाचे होते. यांनी तळागाळातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली असल्यामुळे, ते त्या विभागात लोकप्रिय होते. पण मुक्ता टिळक यांच्या अकाली निधनानंतर भाजपाला त्या विभागात लोकप्रिय चेहरा देता आला नाही. त्यामुळे मतदारांनी महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकरांना पसंती दर्शवली. अनेक वर्षे नगरसेवक असलेले रविंद्र धंगेकर हे तुलनेने लोकप्रिय होते, त्याचा फायदा धंगेकर यांना आणि तुलनेने महाविकास आघाडीला झाला. भाजपकडे गिरीश बापट यांच्यासारखे सर्व स्तरात लोकप्रिय असणारे आमदार २५ वर्षे होते. गिरीश बापट अथवा मुक्ता टिळक यांच्यापैकी कोणीही २०२४चे उमेद्वार असू शकणार नाहीत, हे भाजपला ठाऊक होते. तरीही त्यांनी कोणतीही तयारी केली नाही. भाजपकडे उमेदवारच नव्हता, ही यातील सगळ्यात मोठी अडचण होती.

५. सरकार पडल्यामुळे महाविकास आघाडी आणि ठाकरेंना मिळालेली सहानुभूती- २०२२ मध्ये महाविकास आघाडीला मिळालेला 'जोर का झटका' हे देखील कसब्यातील भाजपाच्या पराभवाचे महत्त्वाचे कारण असू शकते. महाविकास आघाडीच्या आणि तत्कालीन शिवसेनेच्या मतदारांचा एकनाथ शिंदे यांच्या कृत्यावर काही अंशी अजूनही रोष आहे. 'एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून सत्ता ओरबाडून घेतली आणि त्यासाठी त्यांनी गद्दारी केली', अशा प्रकारचे चित्र महाविकास आघाडी आणि ठाकरे गट गेल्या ९-१० महिन्यांपासून उभं करू पाहत आहे. काही ठिकाणी या दाव्यांना भावनेची किनारही दिसून येते. अशा परिस्थितीत पुण्याच्या आणि विशेषत: कसब्यातील मतदारांना हा भावनिक मुद्दा जास्त रुचला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तशातच, ठाकरे यांनी मिळणारी सहानुभूती हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. उद्धव ठाकरे हे अतिशय संयमी आणि शांत स्वभावाचे असल्याने, एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय काही मतदारांना अजूनही पटलेला नाही. त्यामुळे असे मतदार, भाजपा समर्थक असले तरीही या तथाकथित 'गद्दारी'मुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपा-शिंदे गटाच्या उमेदवाराकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत असल्याचे अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे.

Web Title: Kasba Bypoll results BJP Hemant Rasane lost to Mahavikas Aghadi Ravindra Dhangekar know 5 reasons behind BJP loss in Kasba Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.