राजाभाऊ तांबे यांचा मनसेला रामराम
By Admin | Published: July 9, 2015 02:14 AM2015-07-09T02:14:56+5:302015-07-09T02:14:56+5:30
दौंड तालुका मनसेचे अध्यक्ष राजाभाऊ तांबे यांनी मनसेला रामराम ठोकून आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पारगाव (ता. दौंड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.
केडगाव : दौंड तालुका मनसेचे अध्यक्ष राजाभाऊ तांबे यांनी मनसेला रामराम ठोकून आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पारगाव (ता. दौंड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार रमेश थोरात यांनी राजाभाऊ तांबे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
या वेळी अजित पवार म्हणाले, की भाजपा आणि शिवसेना सध्या कलगीतुऱ्यात गुंतले असून, त्यांना सर्वसामान्य जनतेच्या
विकासाचे भान राहिलेले नाही. राज्य सरकारामधील काही मंत्री बोगस पदवी, चिक्की घोटाळा यांसह अन्य भ्रष्टाचारात अडकलेले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांशी निगडित शेती उत्पादनाबाबत त्यांना महत्त्व वाटत नाही ही खेदाची बाब आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभवानंतर नव्याने झालेल्या जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला चागले दिवस आले. राजाभाऊ तांबे यांना १७ हजार मते विधानसभेला मिळाली, हे कौतुकास्पद आहे. आगामी काळात त्यांना सन्मानाने राष्ट्रवादीत वागणूक दिली जाईल़
राजाभाऊ तांबे म्हणाले की, माझ्या ६ वर्षांच्या कारकिर्दीत मनसेत मला राज ठाकरे यांनी फक्त दोन मिनिटे भेट दिली. पक्षाने कुठलीही ताकद न दिल्याने मला राष्ट्रवादीत प्रवेश घ्यावा लागला.
या प्रसंगी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामटे, अप्पासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
सभापती रोहिणी पवार, राजेंद्र कोरेकर, वैशाली नागवडे, अॅड. अजित बलदोटा, वीरधवल जगदाळे, सत्त्वशील शितोळे, अनंद थोरात, महेश भागवत, रामदास दिवेकर, मधुकर दोरगे, अशोकराव खळदकर, जीवन तांबे, भाऊसाहेब ढमढेरे,
सयाजी ताकवणे, किरण मोरे, सुभाष बोत्रे, संभाजी ताकवणे व मान्यवर उपस्थित होते. माऊली शेळके यांनी सूत्रसंचालन केले. नितीन जगताप यांनी आभार मानले.