आठवणी पानशेत पुराच्या ! तो भयंकर दिवस आणि उध्वस्त शहर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 15:26 IST2018-07-12T15:25:32+5:302018-07-12T15:26:01+5:30
पानशेत धरण फुटून झालेल्या अपरिमित हानीला आज ६७वर्षे उलटली आहेत. पण अजूनही तो भयंकर दिवस आणि त्या काळरात्रीच्या आठवणी अनेक पुणेकरांच्या अंगावर काटा आणतात.

आठवणी पानशेत पुराच्या ! तो भयंकर दिवस आणि उध्वस्त शहर...
पुणे : पानशेत धरण फुटून झालेल्या अपरिमित हानीला आज ६७वर्षे उलटली आहेत. पण अजूनही तो भयंकर दिवस आणि त्या काळरात्रीच्या आठवणी अनेक पुणेकरांच्या अंगावर काटा आणतात.१२ जुलै, १९६१ला सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटले. बंड गार्डन पूल सोडून पुण्यातील तत्कालीन बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले होते.आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण शहरात होता तो अंधार, चिखल आणि उध्वस्त झालेल्या संसाराचे उरलेले अवशेष.या प्रलयातून पुणेकर सावरले पण त्याच्या आठवणी मात्र अजूनही ताज्या आहेत.
निर्मला केळकर म्हणाल्या की, मी १२ तारखेला पुण्यात नव्हते पण १४ तारखेला आले तेव्हा मात्र धक्का बसला.जे शहर आम्ही बघितले होते त्याचा लवलेशही शिल्लक नव्हता.आम्ही डेक्कन जिमखान्यावर माडीवर राहत होतो. त्यामुळे अनेक कुटूंबांनी आमच्या घरात आसरा घेतला होता.बाहेर तर फक्त चिखल आणि पाणीच दिसत होतं. जवळपास सात ते आठ दिवस आमच्याकडे अनेक जण राहायला होते.
आनंद सराफ म्हणाले की, पूर आला तेव्हा आम्ही लहान होतो. ही बातमी समजल्यावर माझे आजोबा तातडीने पुण्याला आले. मंडईतल्या आमच्या घरच्या घरी सर्व नातवंडांना घेऊन त्यांनी आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिलेली आठवण अजूनही आठवतेय. पुण्याचा चेहरामोहरा या घटनेने बदलून गेला होता. पूर्वी शहराबाहेर असणारी पर्वती शहराच्या केंद्रस्थानी आली.
शशीधर भावे म्हणाले की, त्याकाळी लकडी पुलाला पाणी येणे यात काही नावीन्य नव्हते. पण त्या दिवशी छातीपर्यंत पाणी वाढले आणि हे काहीतरी वेगळे असल्याचे जाणीव आम्हाला झाली.बघता बघता आमचे दुमजली घर या पुरात कोसळले.आमच्या लॉन्ड्रीच्या मशीन तर ओंकारेश्वरपासून वाहत वाहत काँग्रेस भवनपर्यंत गेल्या होत्या. ते सारे रुळावर येईपर्यंत मोठा कालावधी गेला पण आज इतक्या वर्षांनंतरही तो दिवस विसरणे कठीण आहे.