Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पुढील ३ दिवसांसाठी मान्सूनचा जोर कमी होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 13:34 IST2024-07-29T13:33:48+5:302024-07-29T13:34:14+5:30
मराठवाडा तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १५ जिल्ह्यांत जोरदार तीव्रतेच्या पावसाची शक्यता कमी होईल

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पुढील ३ दिवसांसाठी मान्सूनचा जोर कमी होणार!
पुणे: राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे. दि. २९ ते ३१ जुलैपर्यंतच्या तीन दिवसात संपूर्ण मराठवाडा तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १५ जिल्ह्यांत जोरदार तीव्रतेच्या पावसाची शक्यता कमी होईल. तर केवळ मध्यम पावसाची शक्यता ह्या जिल्ह्यात जाणवते, असा अंदाज सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला.
राज्यामध्ये गुरुवार दि.१ ऑगस्टपासून मात्र पुन्हा जोरदार पावसाची शक्यता मात्र ह्या जिल्ह्यात जाणवते. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात तर केवळ मध्यम पावसाची शक्यता आठवडाभर म्हणजे शनिवार दि. ३ ऑगस्टपर्यंतही टिकून राहू शकते, असे जाणवते.
छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली या ३ जिल्ह्यात तर सध्या पेरपिके जरी ठिक वाटत असली तरी जोरदार अशा पावसाची ह्या जिल्ह्यात अजूनही फार मोठी प्रतीक्षा आहे. ऑगस्टमधील मान्सूनचे वर्तनच येथील भवितव्य ठरवेल, असे वाटते.
नंदुरबार, धुळे, जळगावसहित संपूर्ण विदर्भातील अशा एकूण १४ जिल्ह्यात उद्यापासून आठवडाभर म्हणजे शनिवार दि. ३ ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मात्र अजूनही कायम आहे. मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात अति जोरदार पावसाच्या शक्यतेला अजून वातावरणीय उतरतीचा धक्का लागलेला नाही.
धरणे जरी ओसंडून वाहत असली तरी, मराठवाड्यातील लघु प्रकल्प व जायकवाडीत समाधानकारक साठा करणाऱ्या, तसेच महाराष्ट्रातील शेतजमिनीची पूर्णपणे भूक शमवणाऱ्या व विहिरींना पाणी-पाझर फोडणाऱ्या जोरदार पावसाची संपूर्ण महाराष्ट्राला अजूनही प्रतीक्षा ही आहेच. कदाचित शेतकऱ्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत ह्यासाठी वाट पाहावी लागू शकते, असा अंदाज खुळे यांनी दिला.
राज्यातील रविवारचा पाऊस
पुणे : ७.३ मिमी
जळगाव : ४ मिमी
कोल्हापूर : ४ मिमी
महाबळेश्वर : ४३ मिमी
सातारा : २७ मिमी
मुंबई : ०.३ मिमी
छ. संभाजीनगर : ४ मिमी
परभणी : १ मिमी
अकोला : २० मिमी
अमरावती : २० मिमी
चंद्रपूर : २४ मिमी
वर्धा : २३ मिमी
यवतमाळ : ११ मिमी